६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर हिच्या मनात ‘संतसेवा मिळावी’, असा विचार आल्यावर गुरुकृपेने तिची झालेली विचारप्रक्रिया !

कु. शर्वरी कानस्कर

१. ‘संतांची सेवा करायला मिळावी’, असे वाटणे आणि नंतर ‘स्वतःचे काहीतरी चुकत आहे’, याची जाणीव होणे

‘एकदा सेवा करतांना माझ्या मनात ‘मला संतसेवा किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करायला मिळावी’, असा विचार आला. नंतर मला जाणीव झाली, ‘परात्पर गुरुदेव सर्वांवर समान प्रीती करतात. तेव्हा एका साधकाला संतसेवा सेवा दिली आणि अन्य साधकांना दिली नाही’, असे ते करणार नाहीत. माझेच कुठेतरी चुकत आहे.’

२. संतांची सेवा करणार्‍या एका साधिकेशी बोलत असतांना ‘तिला मिळालेले संतांचे चैतन्य स्वतःलाही मिळत आहे’, असे जाणवणे आणि ‘कुठलीही सेवा ‘गुरुसेवा’ या भावाने केल्यास त्या सेवेचा लाभ संतांची सेवा केल्याप्रमाणेच होतो’, याची जाणीव होणे

मी संतसेवा करणार्‍या एका साधिकेशी बोलत होते. तेव्हा ‘त्या साधिकेला संतांची सेवा करतांना त्या संतांचे पुष्कळ चैतन्य मिळाले आहे आणि तिच्याशी बोलतांना संतांचे चैतन्य मलाही अनुभवायला मिळत आहे’, असे मला जाणवले.

या प्रसंगानंतर मला जाणीव झाली, ‘कुठलीही सेवा ‘गुरुसेवा’ या भावाने केल्यास त्या सेवेचा लाभ संतांची सेवा केल्याप्रमाणेच होतो. सेवा हे गुरुदेवांच्या चरणांपर्यंत जाण्याचे माध्यम आहे. ‘प्रत्येक सेवा गुरुदेवांची सेवा आहे’, असा भाव ठेवल्यास सेवेतील आनंद अधिकाधिक घेता येतो. केवळ गुरुदेवांच्या कृपेने संतांची सेवा करणार्‍या साधिकेशी सहज बोलूनही संतांचे चैतन्य मिळते.’

३. प्रार्थना आणि कृतज्ञता

हे गुरुदेवा, माझ्या मनात ‘मला संतसेवा मिळावी’, असा अयोग्य विचार आला. तुम्ही लगेच मला त्याची जाणीव करून देऊन मला शिकवले. ‘गुरुदेवा, माझ्या मनाला ईश्‍वराच्या विचारांमध्ये गुंतवूून आपल्या चरणी अर्पण होण्यासाठी आपणच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या. देवा, हा प्रत्येक श्‍वास सेवा आणि साधना करण्यासाठी उपयोगी पडू दे’, अशी मी प्रार्थना करते. कृतज्ञता !’

– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)

प्रत्येक प्रसंगात स्थिरता अनुभवणारी आणि आनंदाची अनुभूती घेणारी कु. शर्वरी कानस्कर !

प्रसंगांत अधिक वाईट न वाटता किंवा अधिक आनंद न होता स्थिर राहून निर्विचार स्थिती अनुभवता येणे : ‘एखादा आनंददायी प्रसंग घडल्यास मला थोडा वेळ आनंद होतो. नंतर पुन्हा मी स्थिर होते. एखाद्या प्रसंगात मला वाईट वाटल्यास प्रसंग घडल्यानंतर मला थोडाच वेळ वाईट वाटते. नंतर मी पुन्हा स्थिर होते. मला कोणत्याही प्रसंगात अधिक आनंद किंवा वाईट वाटत नाही. प्रत्येक प्रसंगात माझे मन स्थिर असते. मी मधून मधून मनाची निर्विचार स्थिती अनुभवते. तेव्हा माझ्या मनात देवाचेे विचार असतात आणि माझे मन आनंदी असल्याचे जाणवते. ‘मी आनंदी असल्यामुळे मला सूक्ष्मातील स्पंदने अनुभवायला साहाय्य होते’, असे माझ्या लक्षात आले.’

– कु. शर्वरी कानस्कर (१५.८.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक