राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा अंतिम आराखडा सिद्ध !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा अंतिम आराखडा राष्‍ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्रसिद्ध केला आहे. त्‍याअन्‍वये १० वी आणि १२ वी च्‍या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्‍या जाणार असून अकरावी आणि बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांना किमान दोन भाषा सक्‍तीने शिकाव्‍या लागणार आहेत. त्‍यातील एक भाषा ही स्‍थानिक भाषा असेल. एप्रिलमध्‍ये घोषित केलेला मसुदा आणि अंतिम आराखडा यांतील काही शिफारशी वगळता त्‍यामध्‍ये विशेष पालट झालेला नाही. शालेय शिक्षणाचा आराखडा तयार करण्‍यासाठी केंद्र सरकारने नियुक्‍त केलेल्‍या सुकाणू समितीचे ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. के. कस्‍तुरीरंगन हे अध्‍यक्ष होते.

राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्‍ये भारतीय भाषांतील शिक्षणावर भर दिला आहे. यासाठी ३ ते ८, ८ ते ११, ११ ते १४ आणि १४ ते १८ वर्षे असे वयोगटांनुसार ५-३-३-४ असे ४ स्‍तर निश्‍चित केले आहेत. दहावी-बारावीच्‍या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्‍यास विद्यार्थ्‍यांना चांगली कामगिरी करण्‍यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळेल, असे आराखड्यात स्‍पष्‍ट केले आहे.