समृद्धी महामार्गावर ८ मासांत ७२९ अपघात : १०१ जणांचा मृत्यू !

  • २६२ हून अधिक जण घायाळ !

  • वाहनचालकांच्या चुका कारणीभूत !

नागपूर – समृद्धी महामार्गावर गेल्या ८ मासांत लहान-मोठे असे एकूण ७२९ अपघात झाले असून यांतील ९९ अपघातांत २६२ हून अधिक जण गंभीर घायाळ झाले आहेत. जीवघेण्या ४७ अपघातांत १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य पोलिसांच्या महामार्ग सुरक्षा दलाने समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा विशेष अभ्यास केला असून त्या आधारावर सिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

या संदर्भात महामार्ग सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल म्हणाले की, समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी चालकांना येणारी झोप आणि अतीवेगाने वाहन चालवणे, हीच अपघात होण्यामागील प्रमुख कारणे आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातात सर्वाधिक बळी हे चालकाला येणार्‍या झोपेमुळे गेल्याचे अहवालात समोर आले आहे. चालकाला आलेल्या झोपेमुळे १२ अपघात घडले असून त्यांमध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. अतीवेगाने वाहन चालवल्यामुळे २१ अपघात झाले असून त्यांत ३३ जणांचा, तर गाडीचे टायर फुटल्यामुळे ४ अपघात होऊन त्यांत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

संपादकीय भूमिका 

वाहनचालकांनी नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने सतत प्रबोधनाची मोहीम राबवावी !