महाराष्‍ट्राचे वर्ष २०२४-२५ पर्यंत २ सहस्र ७९५ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्‍ट !

मुंबई, ९ ऑगस्‍ट (वार्ता.) – राज्‍यात वर्ष २०२४-२५ पर्यंत २ सहस्र ७९५ मेगावॅट क्षमतेचे सौर वीजनिर्मितीचे प्रकल्‍प उभारण्‍याचे उद्दिष्‍ट राज्‍यशासनाने ठेवले आहे. त्‍यादृष्‍टीने राज्‍यात ५ प्रकल्‍पांची कामे वेगाने चालू आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक प्रकल्‍पाची वीजनिर्मितीची क्षमता निश्‍चित करण्‍यात आली असून वर्ष २०२४-२५ पर्यंत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हे उद्दिष्‍ट पूर्ण करण्‍यात येणार आहे.

यामध्‍ये ‘मुख्‍यमंत्री सौर कृषी योजने’तून ५८८ मेगावॅट, ‘ई.पी.सी.’ पद्धतीच्‍या प्रकल्‍पाद्वारे ६०२ मेगावॅट वीज, दोंडाई (धुळे) येथील सोलर पार्क येथील प्रकल्‍पाद्वारे २५० मेगावॅट, यु.एम्.आर्.ई.पी.पी. या प्रकल्‍पातून १ सहस्र २५०, तर ईराई धरणावरील तरंगत्‍या सौर प्रकल्‍पातून १०५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्‍यात येणार आहे. ३१ मार्च २०२२ नुसार राज्‍यात महानिर्मितीची स्‍थापित क्षमता १२ सहस्र ९७२ मेगावॅट विजेची होती. यामध्‍ये औष्णिक वीज ९ सहस्र ५४० मेगावॅट, वायूद्वारे ६७२ मेगावॅट, जलविद्युत् २ सहस्र ५८०, तर सौर वीजप्रकल्‍पांची क्षमता १८० मेगावॅट होती. यामध्‍ये आता वाढ होणार आहे.