रसायनयुक्त सांडपाणी सोडणार्‍या आस्थापनांवर गुन्हा नोंदवा !  

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी केली पावसाळी अधिवेशनात मागणी

रत्नागिरी – खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतींमधील आस्थापनांनी (कंपन्यांनी) गेल्या ४ दिवसांपासून रसायनयुक्त दूषित सांडपाणी सोडल्यामुळे दाभोळ खाडीतील १० गावांमधील मासे मृत झाले आहेत. या प्रकरणी शासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि रसायनयुक्त दूषित सांडपाणी सोडणार्‍या संबंधित आस्थापनांवर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

या वेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, गेले अनेक वर्षे दाभोळ खाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामचंद्र पडवळ याविषयी प्रशासनाकडे तक्रारी करत आहेत; मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. याविषयी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईसह मासे मृत झाल्याबद्दल भोई समाजाला शासन आणि संबंधित आस्थापने यांजकडून हानीभरपाई मिळावी.