भारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही अविरत चालू ! – डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर

बीसीए महाविद्यालयाच्या वतीने कडवाडकर संकुलात डब्ल्यू – २० परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

रत्नागिरी – भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य संस्थेने आज पुढे अविरत चालू ठेवले आहे. सामाजिक दायित्व, महिला सक्षमीकरणाचे काम संस्था करत आहे. डब्ल्यू-२० अंतर्गत महिला बचत गटांचे मार्केटिंग, सक्षमीकरणाचे काम चालू झाले आहे. आज महिला बचत गटांनी त्यांची उत्पादने आणली आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. या परिषदेचा अहवाल केंद्रशासनापर्यंत पोचेल, असे प्रतिपादन एस्.एन्.डी.टी. विद्यापिठाचे असिस्टंट डीन ऑफ स्टुडंट आणि एन्.एस्.एस्. समन्वयक डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर यांनी केले. एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापीठ लवकरच सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून घोषित होईल. राज्यशासनाकडून केंद्रशासनाकडे प्रस्ताव गेला असून वर्षभरात सेंट्रल युनिव्हर्सिटीची घोषणा होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए महाविद्यालयाच्या वतीने कडवाडकर संकुलात डब्ल्यू – २० परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

डॉ. प्रभूतेंडोलकर म्हणाले की, अण्णा कर्वेंच्या कार्याला तोड नाही. त्यांनी प्रसिद्धीपराङ्मुख काम केले आहे. १९०० च्या शतकात त्यांनी जपानला भेट दिली. तिथे महिला विद्यापीठ होते. महिलांसाठी शिक्षणाची वेगळी सोय पाहून त्यांनी भारतात असे का असू नये ? या विचारातून वर्ष १९०५ मध्ये संस्था चालू केली. आज डब्ल्यू-२० अंतर्गत महिलांचे बचत गट त्यांना पुढे कसे आणायचे आणि मार्केटिंगचे काम चालू  झाले आहे. आज महिला बचत गटांनी विविध वस्तू, प्रक्रियाविरहित वस्तू विक्रीसाठी आणल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांनी सांगितले की, महिला ही एक शक्ती आहे. महिलांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे. केवळ ऐकून नव्हे, तर कृतीत आणणे आवश्यक आहे. त्याकरता डब्ल्यू-२० चे आयोजन केले आहे. याचे आयोजन करण्याची संधी संस्थेला मिळाल्याचा अभिमान वाटतो.

डब्ल्यू- २० मधून महिला सक्षम ! – सौ. दया भिडे

योजक फूड्सच्या उद्योजिका सौ. दया भिडे यांनी सांगितले की, माझ्याकडे महिला कर्मचारी आहेत. तरुणी ते ज्येष्ठ महिला अत्यंत धडाडीने काम करते. संसारासाठी काही करायचे आहे; म्हणून ती नेटाने करते. डिजिटलचे ज्ञान तिच्याकडे आहे. काही वेळेला नक्की कुठच्या दिशेने जावे ? हे कळत नाही, मार्ग मिळत नाही. आज डब्ल्यू- २० अंतर्गत हे ज्ञान मिळेल. पुढच्या वेळेस आणखी मोठ्या संख्येने महिला येतील. स्वतःचा विकास करताना राष्ट्र आणि समाज यांचा विकास करतील.

ग्रामीण महिलांकडे व्यवस्थापन कौशल्य ! – डॉ. तोरल शिंदे

आयएमए रत्नागिरी शाखाध्यक्ष, स्त्रीरोगतज्ञ डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या की, भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशभरात विविध प्रकारचे उपक्रम होत आहेत. या अनुषंगाने महर्षी कर्वे संस्थेला डब्ल्यू-२० आयोजनाचा मान मिळाल्याबद्दल अभिमान वाटत आहे. काही वर्षांपूर्वी कोकणचे लोक मुंबईत चाकरी करतात. त्यामुळे त्यांची पत्नी गावी राहून घरसंसार चालवते. या कोकणी महिलेचे व्यवस्थापन कौशल्य (मॅनेजमेंट स्कील) मोठे आहे. कारण ती असलेल्या पैशांत घर चालवते आणि मुलांना शिक्षण देते. महिलांनी तब्बेतीकडे अधिक पाहिले पाहिजे. आर्थिक सुबत्ता येत रहाते; मात्र तब्बेत सुधारणे शक्य नसते.