भक्तीयोगाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि अन्य योगमार्गियांच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यामुळे संतपद प्राप्त करणार्‍यांची संख्या अधिक असण्यामागील कारणे ! 

‘अध्यात्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत. ९ जुलै २०२३ या दिवशी या योगमार्गांविषयीचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

(भाग ३)

भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/699619.html

भक्तीयोग आणि ज्ञानयोग

भक्तीयोगात मनाला आनंद जाणवतो, तर ज्ञानयोगात मिळालेल्या ज्ञानामुळे बुद्धीला आनंद जाणवतो.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.६.२०२३)

५. भक्तीयोगाचे अनन्यसाधारण महत्त्व

महर्षि व्यासांनी ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ग्रंथांची निर्मिती करून वेदांचे चार भागात विभाजन केले, ‘महाभारत’ हा जगातील सर्वांत मोठा काव्यरूपी ग्रंथ लिहिला.

श्लोक : ‘व्यासोच्छिष्ठम् जगत् सर्वम् ।’

अर्थ : याचा अर्थ ‘महर्षि व्यासांनी सर्व जग उष्टे केले आहे.’ अर्थात् त्यांनी इतक्या विविध विषयांवर लिखाण केले आहे की, त्यापेक्षा अधिक कुणी काही लिहूच शकत नाही. असे महर्षि व्यासांचे महत्त्व असल्यामुळे महर्षि व्यास संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत.

असे असूनही महर्षि व्यासांना मन:शांती लाभत नव्हती. तेव्हा देवर्षि नारदांनी त्यांना ज्ञानयोगाच्या तात्त्विक ज्ञानामुळे केवळ बौद्धिक समाधान मिळते; परंतु भक्ती केल्यामुळे मन:शांती मिळते’, हा मोलाचा उपदेश केला. त्यानुसार महर्षि व्यासांनी भक्तीरंगात रंगलेल्या श्रीविष्णूच्या लीलांचे वर्णन करणारा ‘श्रीमद्भागवत’ हा अद्वितीय ग्रंथ लिहिला. तसेच विविध देवतांच्या लीलांचे वर्णन करणारी १८ पुराणेही लिहिली होती. भक्तीमय वाङ्मयाच्या निर्मितीमुळे महर्षि व्यासांच्या मनातील कोरडेपणा संपुष्टात येऊन त्यामध्ये परम पवित्र असणार्‍या भक्तीच्या झर्‍याचा उगम झाला आणि त्यांना मन:शांती लाभली. या उदाहरणातून भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येते.

कु. मधुरा भिकाजी भोसले

६. भक्तीयोगाला श्रीगुरुकृपेची जोड मिळाल्याने भक्तांना झालेला सूक्ष्म अहंकार श्रीगुरुकृपेने किंवा देवरूपी गुरुतत्त्वाने नष्ट होणे !   

भक्तीमार्गाने साधना करणार्‍या जिवाला भक्तीचा अहंकार होऊ शकतो, तसेच तो गुरु किंवा देव यांच्या सगुण रूपात अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे भक्तीमार्गी जिवावर जेव्हा श्रीगुरूंची कृपा होते, तेव्हा त्याचा सूक्ष्म अहंकार नष्ट होतो.

६ अ. श्रीविष्णूने नारदाला वानरमुखी बनवून त्याचा अहंकार नष्ट करणे : एकदा नारदाला त्याच्या ब्रह्मचर्यव्रताचा अहंकार झाला होता. तो नष्ट करण्यासाठी श्रीविष्णूने एक लीला केली. श्रीविष्णूच्या कृपेमुळे देवर्षि नारदाच्या मनात ‘विश्वमोहिनी’ या राजकुमारीचे स्वयंवर जिंकून तिच्याशी विवाह करण्याचे विचार प्रबळ झाले. त्यासाठी त्याला अन्य राजकुमारांपेक्षा सुंदर रूप प्राप्त होण्यासाठी त्याने श्रीविष्णूला प्रार्थना केली. श्रीविष्णूने त्याच्यावर कृपा केली आणि त्याचे गर्वहरण करण्यासाठी त्याला वानरमुख प्रदान केले. त्यामुळे स्वयंवराच्या ठिकाणी नारदाची सर्वांनी उपेक्षा करून त्याची टिंगल केली. त्यानंतर तो रागारागाने वैकुंठात आल्यावर श्रीविष्णूने त्याला वानरमुख देण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावर त्याचा राग शांत झाला आणि तो निरहंकारी झाला.

६ आ. श्रीकृष्णाच्या कृपेने गोपींचा सूक्ष्म अहं नष्ट होणे : रासलीलेच्या वेळी श्रीकृष्णाने प्रत्येक गोपीसमवेत एक रूप धारण करून प्रत्येक गोपीसह रासलीला केली. त्यामुळे प्रत्येक गोपीला वाटले की, श्रीकृष्ण केवळ तिच्या समवेतच होता. गोपींना अहंकार झाल्याचे लक्षात येताच, त्यांच्या समवेत असणारे श्रीकृष्णाचे रूप लुप्त झाले. गोपी श्रीकृष्णाला संपूर्ण वृंदावनात शोधू लागल्या; परंतु त्यांना श्रीकृष्ण कुठेच दिसला नाही. शेवटी त्या थकून यमुनाकिनारी बसून विलाप करू लागल्या आणि आर्ततेने श्रीकृष्णाला आळवू लागल्या. त्यानंतर श्रीकृष्ण त्यांच्यावर कृपावंत झाला आणि त्याने पुन्हा प्रत्येक गोपीसमवेत रूप धारण केले अन् उर्वरित रासलीला पूर्ण केली.

६ इ. गुरुदेव विसोबा खेचर यांच्या कृपेमुळे संत नामदेवाचे गर्वहरण होणे :  एकदा सर्व विठ्ठलभक्त संत हे संत गोरोबांच्या घरी जमतात. तेव्हा ‘प्रत्येक संत साधनेत कितपत मुरलेला आहे ?’, हे पहाण्यासाठी संत गोरा कुंभार ज्याप्रमाणे भट्टीत भाजून निघालेले मडके नीट भाजले आहे का ? हे पडताळण्यासाठी त्याच्यावर काठी ठोकून पहातात, तसे ते प्रत्येक संताच्या डोक्यावर काठी ठोकून पहात होते. इतर संतांच्या संदर्भात संत गोरोबांनी ‘तुमचे मडके पक्के आहे,’ असे सांगितले; परंतु संत नामदेवांना ते थेठ विठ्ठलाशी बोलतात याचा त्यांना सूक्ष्म अहं असल्यामुळे संत गोरोबांनी सांगितले ‘तुमचे मडके कच्चे आहे.’ तेव्हा संत नामदेवांना पुष्कळ राग आला आणि ते तेथून निघून थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आले. तेव्हा श्री विठ्ठलाने त्यांना सांगितले, ‘‘ संत गोरोबांचे निदान योग्य आहे. तुला भक्तीचा अहंकार झाला आहे. तो दूर करण्यासाठी तू औंढा नागनाथ येथील शिवमंदिरात जा.’’ त्याप्रमाणे तेथे संत नामदेवांची भेट संत विसोबा खेचर यांच्याशी झाली आणि त्यांनी संत विसोबांना त्यांचे गुरु मानले. त्यानंतर संत नामदेवांवर गुरुदेव विसोबा खेचर यांची कृपा झाल्यामुळे संत नामदेवांचा भक्तीचा सूक्ष्म अहंकार नष्ट झाला.

६ ई. शिवाच्या सगुण रूपात अडकलेल्या संत नरहरी सोनार यांच्यावर झालेल्या शिवकृपेने त्यांचा सूक्ष्म अहंकार गळून पडणे आणि त्यांची श्री विठ्ठलावर भक्ती जडणे : संत नरहरी सोनार हे पंढरपुरातील संत परम शिवभक्त होते. त्यांना वाटत होते की, या जगात केवळ शिवच सर्वस्व आहे. त्यामुळे ते अन्य कोणत्याच देवाचे दर्शन घेत नव्हते आणि त्यांना मानत नव्हते. संत नरहरी सोनार यांचा हा सूक्ष्म अहं नष्ट करण्यासाठी शिवकृपेने एक लीला झाली. एका व्यक्तीने श्री विठ्ठलाला सोन्याचा कडदोरा अर्पण करण्याचा नवस केला होता. तो नवस पूर्ण करण्यासाठी संत नरहरी सोनार यांच्याकडे येतो. हा नवस फेडण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्तीच्या कंबरेचे माप घेणे आवश्यक होते ; परंतु नरहरी यांचा पण होता की, ते शिवाशिवाय अन्य कोणत्याच देवाचे दर्शन घेणार नाहीत. त्यामुळे त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आणि ते श्री विठ्ठलाच्या मंदिरात गेले. तेथे जेव्हा ते श्री विठ्ठलाच्या कंबरेचे माप दोरीने घेत होते, तेव्हा त्यांना असे जाणवले की, ते शिवपिंडीलाच स्पर्श करत आहे. असे ३ – ४ वेळा झाल्यावर त्यांनी डोळ्यांची पट्टी बाजूला केली, तेव्हा श्री विठ्ठल दिसत होता आणि डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर पुन्हा शिवपिंडी दिसायची. त्यानंतर त्यांना शिवकृपेने ज्ञान झाले की, ‘शिव आणि विष्णु (श्रीविष्णूचे एक रूप श्री विठ्ठल) हे निराळे नसून एकच आहेत. त्यानंतर संत नरहरी सोनार यांचा सूक्ष्म अहंकार गळून पडला आणि त्यांची श्री विठ्ठलावर भक्ती जडली.

७. भक्तीयोगाला श्रीगुरुकृपायोगाची सांगड घातल्यास भक्तीमार्गी जिवाच्या संपूर्ण जीवनाचे परम कल्याण होणे

अशा प्रकारे वरील उदाहरणांतून लक्षात येते की, भक्तीमार्गी जीव जरी भाव किंवा भक्ती यांच्या बळावर भगवंताशी थेट अनुसंधान साधून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करत असला, तरी भक्तीमार्गियांचा सूक्ष्म अहंकार नष्ट होण्यासाठी त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळेच कलियुगात ‘नामची एक आधार’ असणारा भक्तीमार्ग साधनेच्या दृष्टीने श्रेष्ठ असला, तरी त्याला श्रीगुरुकृपायोगाची जोड मिळाली, तरच भक्तीमार्गी जीव मोक्षप्राप्ती करू शकतो; अन्यथा त्याला भक्तीचाच सूक्ष्म अहं होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती खुंटते किंवा अधोगती होऊ शकते. यावरून कलियुगामध्ये ‘श्रीगुरुकृपायोगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे’, हे आपल्या लक्षात येते.

८. अन्य योगमार्गांच्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करून संतपद गाठलेले अधिक प्रमाणात असण्यामागील विविध आध्यात्मिक कारणे

अशा प्रकारे भक्तीमार्गी साधकाचा प्रवास अनेकातून एकात येणे(अनेक देवांच्या उपासनेतून एका देवाची उपासना करणे), स्थूलातून सूक्ष्माकडे जाणे (कर्मकांडातून उपासनाकांडाकडे आणि उपासनाकांडातून भक्तीकांडाकडे), भक्तीच्या माध्यमातून मनोलय, बुद्धीलय, अहंलय आणि चित्तलय लवकर होणे, सकाम साधनेतून निष्काम साधनेकडे वाटचाल करणे (सापेक्ष म्हणजे ‘सकाम’ भक्ती न करता निरपेक्ष, म्हणजे ‘निष्काम’ भक्ती करणे) आणि सगुणातून निर्गुणाकडे जाणे (गुरु किंवा देव यांच्या सगुण रूपात न अडकता त्यांच्या निर्गुणरूपाकडे, म्हणजे तत्त्वरूपाकडे वाटचाल होते. बालकाप्रमाणे ‘निरागसभाव’ किंवा ‘भोळाभाव’ हा भक्तीयोगाचा स्थायीभाव आहे. या भावावस्थेत भक्त बुद्धीने विचार न करता केवळ भावाच्या स्तरावर विचार करत असतो. त्यामुळे त्याची वृत्ती, विचार आणि कृती यांमध्ये कोणत्याही अपेक्षा नसून त्याची वृत्ती, विचार आणि कृती निरपेक्ष अन् शुद्ध असतात. त्यामुळे भक्ताचा भोळाभाव पाहून भगवंत त्याच्यावर कृपा करून त्याची आध्यात्मिक उन्नती करवून घेऊन त्याला संतपद बहाल करतो.

श्रीगुरुचरणी कृतज्ञता आणि प्रार्थना

श्रीगुरुकृपेनेच भक्तीयोगाचे आध्यात्मिक स्तरावरील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे. ‘आम्हा अज्ञानी जिवांवर श्रीगुरूंची कृपा अशीच अखंड राहो’, हीच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ८.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक