मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला वेग

गणेशोत्सवापूर्वी एका मार्गिकेचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य देणार ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणास वेग घेतला

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पावसाळ्यातही वेग घेतला असून कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे टाळण्यासाठी बोगदा तयार केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक मार्गिका (सिंगल लेन) चालू करण्याला प्राधान्य देणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

आज १४ जुलै या दिवशी सकाळपासून पनवेल ते सिंधुदुर्गपर्यंत मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी मंत्री चव्हाण यांनी चालू केली. या महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी संबंधित यंत्रणेला दिल्या. दोन पैकी एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यास यंदा गणेशोत्सवाला येणारे गणेशभक्त घाटाऐवजी बोगद्यातून येतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

गणेशोत्सवापर्यंत बोगद्यातील एक मार्गिका पूर्ण झाल्यास प्रवाशांचा सुमारे ४५ मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘पावसाळ्याात महामार्गाच्या कामांमध्ये हलगर्जीपणा नको, तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे.’’  त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी भर पावसात कशेडी बोगदा, परशुराम घाटासह अन्य ठिकाणच्या महामार्गाच्या कामाची पहाणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम  विभागाचे, तसेच महामार्गाशी संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते .