जम्मू-काश्मीरमध्ये भीतीच्या छायेत जगणारे लोक आता शांततेत जगत आहेत !

कलम ३७० हटवल्याविषयी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !

नवी देहली – जम्मू-काश्मीरमध्ये एकेकाळी भीतीच्या छायेखाली जगणारे लोक आता शांततेत जगू लागले आहेत. कलम ३७० हटवल्यामुळे या भागातील लोकांच्या जनजीवनावर चांगला परिणाम दिसू लागला आहे. ३ दशकांच्या उलथापालथीनंतर राज्यात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य दिसू लागले आहे. या निर्णयामुळे राज्यात संप, शाळा बंद करणे, दगडफेक या गोष्टी भूतकाळ झाल्या आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्याविरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. यावर न्यायालयाच्या आदेशावरून केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले.

या प्रतिज्ञापत्रात सरकारने पुढे म्हटले की, मे २०२३ मध्ये श्रीनगरमध्ये ‘जी-२० टुरिझम वर्किंग ग्रुप’च्या बैठकीचे आयोजन, ही खोर्‍यातील पर्यटन इतिहासात महत्त्वाची घटना होती; कारण कलम ३७० हटवल्यानंतर येथे आंतरराष्ट्रीय व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले होते. आता तेथे आतंकवादाचे वातावरण राहिलेले नाही. काश्मीरमध्ये शाळा, महाविद्यालये, उद्योग आदी सुरळीत चालू आहेत.

संपादकीय भूमिका

असे असले, तरी अद्याप काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. याकडेही सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !