गोव्यात ५० इंच पावसाचा टप्पा पार : जनजीवन विस्कळीत

जनजीवन विस्कळीत !

पणजी, ७ जुलै (वार्ता.) – राज्यात पावसाचे उशिरा आगमन झाले असले, तरी २५ जूनपासून चालू झालेल्या पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. राज्यात आतापर्यंत ५०.६ इंच पाऊस पडला आहे. राज्यात दरड कोसळणे, झाडे पडणे, घर आणि इतर संसाधने यांची हानी होणे असे प्रकार चालूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने पुढील ६ दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची (ऑरेंज अलर्ट) चेतावणी दिली आहे.

मोरजी येथील ५० वर्षे जुना पूल कोसळण्याच्या स्थितीत आहे. मडगाव येथील ‘एस्.जी.पी.डी.ए.’ मार्केट सलग तिसर्‍या दिवशीही पाण्याने तुंबलेले आहे. आडपई आणि बस्तोडा येथे एका घरावर झाड पडून मोठी हानी झाली आहे.

मागील २४ घंट्यांत पेडणे येथे सर्वाधिक,तर वाळपई आणि सांखळी येथे अल्प पाऊस

राज्यात मागील २४ घंट्यांमध्ये सरासरी ७९.६ मि.मी. पाऊस पडला आहे, तर आतापर्यंत चालू हंगामातील सरासरीपेक्षा ९.८ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मागील २४ घंट्यांमध्ये सांगे येथे ८२.१ मि.मी., मडगाव – ८१.३ मि.मी., मुरगाव – ४७.६ मि.मी., पेडणे – १३०.८ मि.मी., फोंडा – ७३.४ मि.मी., दाबोळी – ७९.२ मि.मी., म्हापसा – ७६.२ मि.मी., जुने गोवे – ६९.७ मि.मी., केपे – ८०.८ मि.मी., वाळपई – ६९ मि.मी., सांखळी – ६४.४ मि.मी. आणि पणजी येथे ७९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे वाळपई आणि सांखळी परिसरात अजूनही पावसाने एकूण ४० इंच टप्पा गाठलेला नाही. वाळपई येथे आतापर्यंत एकूण २९.९९ इंच पाऊस पडला आहे. एरव्ही वाळपई येथे सर्वाधिक पाऊस पडत असतो.

(सौजन्य : TV9 Marathi) 

१२ दिवसांत अग्नीशमन केंद्राला आले ४५० आपत्कालीन ‘कॉल’ !

राज्यात गेले १२ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे किंवा विजेचे खांब पडणे आदी अनेक घटना घडल्या आहेत. अग्नीशमन केंद्राने २५ जून ते ६ जुलै या कालावधीत रस्ता, विजेचे खांब, घरे, वाहने आणि संरक्षक कठडा यांवर झाड पडल्याचे एकूण सुमारे ४५० ‘कॉल’ हाताळले आहेत. पडझडीमुळे ७५ लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला आहे.

वीज खात्याला आतापर्यंत २ कोटी रुपयांची हानी

झाड पडल्याने वीज खात्याचे २०० खांबे मोडले आहेत, तसेच अनेक ‘ट्रान्सफॉर्मर’ खराब झाले आहेत. यामुळे वीज खात्याची २ कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मागील १५ दिवसांत वीज खात्याने दुर्घटनांचे ४ सहस्र ५०० ‘कॉल्स’ हाताळले आहेत.