राहुल गांधी यांना मणीपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांत जाण्यापासून पोलिसांनी रोखले !

इंफाल (मणीपूर) – जवळपास २ मासांपासून हिंसाचार चालू असलेल्या मणीपूरच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर जाणारे राहुल गांधी यांना पोलिसांकडून इंफाळजवळ रोखण्यात आले. येथून २० किमी अंतरावरील विष्णुपूर जिल्ह्यात होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी राहुल गांधी यांना पुढे जाण्याची अनुमती दिली नाही. गांधी हे हिंसाचारग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आलेल्या चुराचांदपूर येथील आश्रयगृहांना भेट देण्यासाठी जात होते.

पोलिसांनी सांगितले की, उटलू गावाजवळील महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि राहुल गांधी यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. अशा घटना पुढे   घडू नयेत, यासाठी त्यांना जाण्यापासून रोखण्यात आले.