सत्र आणि उच्च न्यायालयाने २७ वर्षांपूर्वीच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने ठरवले निर्दोष !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली –  सर्वोच्च न्यायालयाने २७ वर्षांपूर्वीच्या एका हत्येच्या प्रकरणात पिता आणि पुत्र यांना निर्दोष घोषित केले. त्यांना यापूर्वी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना फिर्यादी पक्षाकडून त्यांच्यावरील आरोप स्पष्ट न करता आल्याने आणि संशयाचा लाभ यांमुळे निर्दोष मुक्त केले.

उत्तरप्रदेशातील एका गावात अल्ताफ हुसेन याची भूमीवरून महंमद मुस्लिम आणि शमशाद यांच्याशी वाद होता. वर्ष १९९५ मध्ये एक दिवस अल्ताफ हुसेन त्याचा मुलगा आणि पुतण्या यांच्यासह सायकल वरून जात असतांना महंमद मुस्लिम आणि शमशाद यांनी हुसेन याची कर्‍हाडीने वार करून हत्या केली. या प्रकरणी सत्र न्यायालयाने हुसेन याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि नंतर ती उच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मृत हुसेन याचा मुलगा आणि पुतण्या यांनी हुसेन याला वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही किंवा आक्रमणात घायाळ झाल्यानंतर हुसेन याला रुग्णालयात नेले नाही. यावरून संशय निर्माण होतो. पोलिसांनी सायकल आणि आरोपींकडील कथित ब्लँकेट न्यायालयात सादर केले नाही. अन्य लहान लहान गोष्टींविषयी संदिग्दधा असल्याने याचा लाभ आरोपींना देत त्यांना निर्दोष ठरवत आहोत.

संपादकीय भूमिका

  • सत्र आणि उच्च न्यायालयांचा निर्णय सर्वोच्च न्यायालय चुकीचा ठरवतो, यावरून जनतेने काय समजायचे ? अशा घटनांमुळे जनतेला न्यायाविषयी संभ्रम निर्माण होत असेल, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • २७ वर्षांनंतर एखाद्या प्रकरणात अंतिम निकाल मिळत असेल, तर तो न्याय नाही, तर अन्यायच म्हणावा लागेल !