वारकरी विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळेच माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट !

४ पानांचे लेखी पत्र देत ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’चा खुलासा !

वारकरी विध्यार्थी आणि पोलीस 

पिंपरी (जिल्हा पुणे) – वारकरी संप्रदायाच्या भावनेइतकाच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व्यवस्थापनाचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊनच यंदा नियोजन करण्यात आले. प्रतिवर्षी पालखी प्रस्थान सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन सोहळ्याच्या सर्व संबंधितांशी सतत विचारविनिमय करून संस्थान कमिटीने यंदा दिंड्यांमधील वारकर्‍यांची संख्या मर्यादित करण्याचा प्रयोग केला. मुख्य म्हणजे फडकरी, दिंडीकरी आणि ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याशी संबंधित सर्व घटकांनी याला सहकार्य केले; मात्र आळंदीमध्ये शिकणार्‍या वारकरी विद्यार्थ्यांच्या ४०० जणांच्या गटाने प्रवेशासाठी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी गोंधळ घातला. या गोंधळामुळेच माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागले. विद्यार्थ्यांनी पोलिसांचे कडे भेदून मंदिराकडे धाव घेतली. मंदिराकडे नियंत्रित प्रवेश देण्याच्या हेतूने उभे केलेले बॅरिकेड्स बळाने दूर करून प्रस्थानासाठी मंदिराकडे धाव घेणार्‍या वारकरी विद्यार्थ्यांना आवरण्याकरता त्या वेळी बंदोबस्तासाठी तिथे उभ्या असणार्‍या पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, असा खुलासा ‘आळंदी संस्थान कमिटी’ने केला आहे. ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ने ४ पानांचे लेखी पत्र देत प्रस्थानाच्या दिवशी काय घडले ? त्यापूर्वी संस्थान कमिटीने व्यवस्थापनाच्या संदर्भात घेतलेले निर्णय यांविषयी माहिती देत खुलासा दिला आहे.

‘संस्थान कमिटी’चे आवाहन

प्रस्थान सोहळ्यासाठी यंदा मंदिरात प्रवेश देण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे सर्व संबंधितांशी चर्चामसलत करून निश्चित करण्यामागे ‘संस्थान कमिटी’चा कोणताही स्वार्थ नाही अथवा कुणालाही ज्ञानोबारायांच्या सेवेपासून वंचित करावे, भेदभाव करावा, असा हेतू अजिबातच नाही आणि कधीच नव्हता. दिंड्यांमधील वारकर्‍यांसह मंदिरात जमणार्‍या भाविकांची सुरक्षा, संप्रदायाची प्रतिमा आणि व्यापक सामाजिक सलोखा अन् हित यांचा विचार या सगळ्यांत मुख्य होता. वारकरी विद्यार्थ्यांसह सर्वच संबंधितांनी या सगळ्यांचा विचार करत कोणताही किंतु मनात न ठेवता संस्थान कमिटीस यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन कमिटीने केले आहे.

संस्थान कमिटीने केलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की,

१. प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ जून या दिवशी दुपारी श्रींचा नैवेद्य झाल्यानंतर संपूर्ण मंदिर रिकामे करण्यात आले. त्यानंतर दुपारी २.३० वाजल्यापासून परंपरेनुसार मंदिरात प्रवेश करणार्‍या ४७ दिंड्या त्यांच्या ठरलेल्या मार्गाने मंदिर परिसरात येण्यास आरंभ झाला. दिंडीतील वारकर्‍यांचे ‘पास’ बघून त्यांना मंदिराकडे रवाना करण्याचे काम पोलीस करत होते.

२. याच वेळी मोठ्या संख्येने काही वारकरी विद्यार्थी जोगमहाराजांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेची जुनी इमारत असलेल्या बोळात जमले असून ‘आम्हांला प्रस्थानासाठी मंदिरात प्रवेश मिळावा’, अशी मागणी करत असल्याचे संस्थानचे विश्वस्त आणि सोहळाप्रमुख अधिवक्ता विकास ढगे-पाटील यांना संस्थानच्या कर्मचार्‍याकडून कळले. विद्यार्थ्यांची ती संख्या ३०० ते ४०० इतकी असावी. संबंधित विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारीही त्याच वेळी करत होते.

३. प्रस्थान सोहळ्यासाठी आवश्यक असणारा पास नसलेल्यांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही, ही गोष्ट पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करत होते; परंतु ‘मंदिरात प्रतिगुरुवारी आयोजित करण्यात येणार्‍या पालखीमध्ये आमचा नित्य सहभाग असतो, तसेच मंदिरात साजर्‍या होणार्‍या सप्ताहामध्येही आमची वर्षभर सेवा चालू असते. त्यामुळे पास जरी नसले, तरी प्रस्थानासाठी मंदिरात प्रवेश मिळणे, हा आमचा सेवेचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांना मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे’, असा जमलेल्या विद्यार्थ्यांचा आग्रह होता.

४. संस्थान कमिटीचे विश्वस्त आणि सोहळाप्रमुख अधिवक्ता विकास ढगे-पाटील यांनी मंदिरातून बाहेर येत पोलिसांकडे असलेल्या ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे जमलेल्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला; मात्र संबंधित विद्यार्थी शांतपणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तिथे जमलेल्या सगळ्या म्हणजे सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये प्रस्थान सोहळ्यासाठी प्रवेश मिळालाच पाहिजे, असा विद्यार्थ्यांचा पवित्रा कायम होता.

५. गोंधळ करणार्‍या विद्यार्थ्यांना संयम आणि सहकार्य यांचे आवाहन करून सोहळाप्रमुख पुन्हा मंदिरात परतले. राजाभाऊ चोपदार यांनीही विद्यार्थ्यांना समजावले; पण विद्यार्थी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सोहळाप्रमुख मंदिराकडे परतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांनी पोलिसांचे कडे भेदून मंदिराकडे धाव घेतली. हा प्रसंग सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय खेदकारक आणि अनुचित होता. थोडे सामंजस्य दाखवल्याने तो टाळताही आला असता.