सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. अशोक रेणके (वय ६४ वर्षे) यांनी अनुभवलेले भावक्षण !

१. तिरुपतीप्रमाणे साजरा केलेला गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव सहजतेने पहायला मिळणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘तिरुपति बालाजी येथे व्यंकटेश्वराचा ब्रह्मोत्सव जसा साजरा केला जातो. तसा वर्ष २०२३ मध्ये गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव सोहळा आम्हाला पहायला मिळाला. आम्हा साधकांसाठी ही अतिशय दुर्लभ गोष्ट होती; कारण इतक्या दूर तिरुपति येथे जाऊन अगदी सहजपणे बालाजीचे दर्शन करणे कठीण असते. तेव्हा ‘तेथील ब्रह्मोत्सव बघायला मिळणे’, हे तर फार दूरचे आहे.

श्री. अशोक रेणके

२. ब्रह्मोत्सवासाठी सनातनच्या १० सहस्रांहून अधिक साधकांचे आगमन झाले होते. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वहात आहे’, असे मला जाणवले.

३. सहस्रो साधक गुरुदेवांच्या केवळ दर्शनासाठी पुष्कळ दूरचा प्रवास करून आले होते, तरी ते प्रवासातील थकवा विसरून भावस्थिती अनुभवत होते.

४. साधकांना भेटल्यावर माझा कंठ दाटून येत होता.

५. एवढ्या मोठ्या संख्येने साधकांची उपस्थिती असूनही कुठेही गडबड किंवा गोंधळ नव्हता. शांततामय वातावरणात सर्व साधक गुरुदर्शनाचा आनंद घेत होते.

६. हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा होता.

७. ब्रह्मोत्सवासाठी आलेल्या साधकांना कार्यक्रमस्थळ सोडून घरी परतू नये, या वैकुंठातच रहावे’, असे वाटणे

कार्यक्रम संपल्यावर साधक अतिशय शांततेने परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांचे पाय तेथून निघत नव्हते. ते पुनःपुन्हा आत जाऊन कार्यक्रमस्थळ न्याहाळत होते. ‘येथेच गुरुदेवांच्या वैकुंठात रहावे’, असेच त्यांना वाटत असावे. हे सर्व दृश्य खरोखर अवर्णनीय असेच होते.

‘हे गुरुदेवा, या आपल्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत आणि माझी तेवढी पात्रताही नाही. केवळ कृतज्ञता म्हणून ही शब्दपुष्पे आपल्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे. ‘तुमच्या कृपेमुळे हे मी लिहू शकलो’, याबद्दल मी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– श्री. अशोक रेणके (वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (१३.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक