आई-वडिलांना अपमानित व्हावे लागेल, अशी कृती करू नका ! – सौ. सुहानी गावडे, सरपंच, निरवडे

कार्यक्रमात बोलतांना डावीकडून सरपंच सौ. सुहानी गावडे, सौ. अर्चना घनवट आणि सौ. अंगारिका गावडे

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – जे आई-वडील आपली २० ते २५ वर्षे काळजी घेतात, त्यांचे आपण ऐकणार कि नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीचे ऐकणार ? आपले आई-वडील आणि त्यांनी घेतलेले निर्णय यांवर विश्वास ठेवा. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. आई-वडील अपमानित होतील किंवा निराश होतील, अशी चुकीची कृती करू नका. आई-वडिलांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. सायंकाळी दिवा लावणे, ‘शुभं करोती’ म्हणणे, धर्मपालन करणे यांसारख्या कृतींना प्राधान्य द्या, असे आवाहन निरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुहानी गावडे यांनी येथे केले. तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच सौ. सुहानी गावडे यांनी २७ मे या दिवशी महिलांसाठी मार्गदर्शन आयोजित केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अर्चना घनवट आणि ग्रामपंचायत सदस्या सौ. अंगारिका गावडे यांच्यासह अनेक महिला अन् मुली उपस्थित होत्या.

वैशिष्ट्यपूर्ण

सरपंच सौ. सुहानी गावडे यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या प्रसार मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करू’, असे आश्वासन दिले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. घनवट म्हणाल्या, ‘‘सध्या ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अशिक्षित नव्हे, तर उच्चशिक्षित सहस्रो हिंदु मुली आणि महिलाही ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात गोवल्या जात आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु युवती पाश्चात्त्य विकृतीचे आचरण करत आहेत. धर्मशिक्षण नसल्याने आज हिंदु युवतीच मोठ्या प्रमाणावर या षड्यंत्रामध्ये फसत आहेत. आपण सर्वांनी हिंदु धर्मानुसार आचरण करूया. प्रतिदिन कुंकू लावूया. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांच्या प्रती मनात कृतज्ञता ठेवूया. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांचे ऐकणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा.’’