अपमानास्पद वागणूक देणे बंद करा !

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिकत असलेले आणि तेथील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीला उभे राहिलेले हिंदुत्वनिष्ठ तरुण विद्यार्थी करण कटारिया यांना इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय षड्यंत्राला सामोरे जावे लागले आहे. त्या विद्यापिठात त्यांचा ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ म्हणून अपमान आणि वैचारिक छळ झाला आहे. अंतिमतः त्यांना विद्यार्थ्यांच्या निवडणुकीतून बाहेर काढण्यात आले आहे. लंडन येथील प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापिठात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा निवड झालेली भारतीय विद्यार्थिनी रश्मी सामंत यांची घटना ताजी असतांनाच ही त्याच प्रकारची दुसरी घटना घडली आहे. त्यांना ‘फॅसिस्ट’ ((हिटलरने निर्माण केलेला) कट्टर राष्ट्रवादाचा अनुयायी), ‘इस्लामोफोबिक’ (इस्लामविषयी घृणा असलेला), ‘ट्रान्सफोबिक’ (तृतीय पंथीय समाजाचा तिरस्कार करणारे), ‘रेसिस्ट’ (वंशवादी) अशा प्रकारे हिणवले गेले. त्यांनी भरलेला निवडणुकीचा अर्ज ‘एक हिंदु’ म्हणून नाकारण्यात आला. याविरोधात विद्यापिठात तक्रारी करूनही त्यांची नोंद घेतली गेलेली नाही वा त्या विरोधात विद्यापिठाने कोणतीही कृती केलेली नाही, हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांच्या विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले आहे. याचा सामाजिक माध्यमांतून ते जोरदार; परंतु संयमित प्रसार करत आहेत. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय विद्यापिठामध्ये एका हिंदु विद्यार्थ्याला केवळ तो हिंदुत्वनिष्ठ असल्यावरून ‘लक्ष्य’ केले जात आहे, जणू काही तो ‘आतंकवादी’ किंवा जगाचा अक्षम्य अपराधी असल्याप्रमाणे त्याला वागणूक दिली जात आहे. करण आणि त्यांचे सहकारी तेथील विद्यार्थ्यांकडून ‘हिंदु’ म्हणून हिणवले जाण्याचा हा अवमान सहन करत आहेत; परंतु विद्यापिठाने त्यांच्या विरोधातील अफवा अन् तक्रारी यांवर विश्वास ठेवून उलट त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवले आहे. विद्यापिठाने दाखवलेल्या या लोकशाहीविरोधी प्रकाराचा करण यांनी जोरदार निषेध केला आहे. भारताच्या विरोधातील सूत्रांचा करण हे सातत्याने प्रतिवाद करत असल्याने हिंदुद्वेष्ट्यांनी त्यांच्या विरोधात हे षड्यंत्र रचले आहे; परंतु ‘या हिंदुद्वेषाला मी सामोरे जाणार’, असा निर्धार त्यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे. हरियाणातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील या विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मोठा पाठिंबा मिळत असतांनाही त्यांना विद्यार्थ्यांच्या निवडणुकीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. का ? तर तो केवळ हिंदुत्वनिष्ठ आहे म्हणून. स्वतःला आधुनिक लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणवणार्‍या ब्रिटिशांच्या देशातील एका मोठ्या विद्यापिठात ‘लोकशाहीची हत्या केली जात आहे’, असे म्हटले, तर वावगे होणार नाही.

हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय कट

वरील घटना हे एक निमित्त म्हणून पुढे आले आहे; मात्र ‘याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणूनबुजून निर्माण केल्या जात असलेल्या हिंदुविरोधी वातावरणात आहेत’, असे म्हणण्यास वाव आहे. सध्या मोदी शासनाच्या काळामध्ये हिंदूंचा गौरवशाली इतिहास आणि परंपरा यांचे पुनरुज्जीवन वेगाने होत आहे अन् हिंदूंच्या युवा पिढीला ‘त्यांचा प्राचीन इतिहास जगात सर्वश्रेष्ठ आहे’, हे लक्षात येत आहे. त्यामुळे त्यांच्यात त्याविषयी अभिमान निर्माण होत आहे. यामुळे ‘इतकी वर्षे इंग्रजांनी लिहिलेला आणि साम्यवादी अन् समाजवादी यांनी भारतावर थोपवलेला, हिंदूंना तुच्छ लेखणारा, अपमानित करणारा इतिहास तद्दन खोटा आहे’, याची भांडाफोड होत आहे. ‘हे इंग्लंडच्या गोर्‍या साहेबाने भारतातील ‘तपकिरी (गद्दार) साहेबा’ला हाताशी धरून केलेले ‘आयडिऑलॉजिकल सबव्हर्जन’, म्हणजे ‘एखादी सामाजिक व्यवस्था छुप्या पद्धतीने नष्ट करण्याचे रचलेले षड्यंत्र होते’, हे आता उघड होत आहे. भारतातील हिंदुत्वनिष्ठ युवकांमध्ये त्यांच्या विज्ञाननिष्ठ सर्वाेच्च परंपरेची आणि पराक्रमाच्या इतिहासाची अस्मिता जागृत झाल्याने कुठेतरी या विचारांच्या युवकांचे नकळत संघटन होत आहे. याचाच नेमका राग जगभरातील हिंदुद्वेष्ट्यांना असल्याने मुसलमान, साम्यवादी आणि ख्रिस्ती हे सारे या हिंदुत्वनिष्ठांवर विविध माध्यमांतून चिखलफेक करण्यास सज्ज झाले आहेत. ते जागतिक स्तरावर आपापसांत कितीही भांडत असले, तरी हिंदूंच्या विरोधात मात्र एकत्र येत आहेत. नुकतेच जर्मनी आणि अमेरिका यांनी राहुल गांधी यांच्या संसदेतील निलंबनाच्या सूत्रावरून भारतातील लोकशाहीवर टिपण्या करत सुनावले. हे देश तेवढ्याच जोरकसपणे आता ब्रिटनमधील हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी काही बोलणार का ? या देशांसह ब्रिटनही भारतात मुसलमानांवर अन्याय होत असल्याचे तथाकथित आरोप मधून मधून करत असतो. विदेशात कृष्णवर्णियांवर होणारा अन्याय आणि आता ब्रिटनच्या विद्यापिठांतून हिंदु विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय यांविरोधात टिपणी करण्याचे धैर्य या देशांचे प्रतिनिधी दाखवणार का ? या सगळ्या देशांतील मानवाधिकारवाले आणि त्यांचा लाळघोटेपणा करणारे भारतातील मानवाधिकारवाले यांच्यापर्यंत हिंदु विद्यार्थ्यांचा अन्याय पोचणार का ?

भारत सरकारने हस्तक्षेप करावा !

अशा घटनांना आरंभ झाला असतांनाच ‘प्रतिदिन कणखर होत चाललेल्या भारत सरकारच्या परराष्ट्रीय मंत्र्यांनी या विद्यापिठाला आणि देशाला खडे बोल सुनावले पाहिजेत’, असे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला वाटत आहे. यामुळे विदेशातील हिंदूंना ‘भारत त्यांच्या पाठीशी आहे’, असा आधार वाटेल. ‘तेथील विद्यार्थी आणि हिंदू यांना त्रास देतांना विदेशी हिंदुद्वेष्टे विचार करतील’, असे वातावरण तिथे निर्माण होण्यासाठी अन् ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’च्या (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) संकल्पनेला हाणून पाडण्यासाठी मोदी शासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘अनअपोलोजेटिक हिंदु’ (‘आम्ही चुकीचे नाही’, ही जाणीव असणारे हिंदु) या चळवळीला जोर मिळण्यास चालना मिळेल. अशा घटनांना योग्य वळण दिले गेले, तर पुढे एक दिवस हिंदूंचा डंका विश्वभर वाजणार आहे, हे निश्चित !

विश्वभर हिंदूंना अपमानास्पद वागणूक देण्याचे चालू असलेले षड्यंत्र वैचारिक स्तरावर हाणून पाडा !