अतिक्रमणांच्या विरोधात व्यापक जागरण आणि कायदेशीर लढा यांची आवश्यकता ! – उमेश गायकवाड, माजी प्रांत संयोजक, बजरंग दल

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

उमेश गायकवाड

मुंबई – माहीम येथील समुद्रातील अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे. अनेक ठिकाणी अवैध दर्गे, मजारी, बांधकामे उद्ध्वस्त करण्याचा विषय आला की, प्रशासन कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करते. हे म्हणजे ‘प्रशासन धर्मांधांना घाबरते’, असा त्याचा अर्थ होतो. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अवैध मशिदी, दर्गे, मजारी, कब्रस्ताने यांचे झालेले अतिक्रमण हा ‘लँड (भूमी) जिहाद’च आहे. सध्याच्या सरकारने प्रतापगडावरील अफझलखानाची कबर जरी तोडली असली, तरी सर्वपक्षीय नेत्यांची राज्यातील अतिक्रमणे तोडण्याची अजूनही मानसिकता नाही. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००२ मध्ये कुर्ला (मुंबई) येथील २ अवैध मशिदी तोडण्याचा आदेश दिलेला असतांनाही त्या अजूनही तोडल्या गेल्या नाहीत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अतिक्रमणांच्या गंभीर विषयाचे समाजात व्यापक जागरण करून कायदेशीर लढा देणे निरंतर चालू राहिले, तर नक्की चांगले परिणाम दिसून येतील, असे उद्गार ‘बजरंग दला’चे माजी प्रांत संयोजक श्री. उमेश गायकवाड यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

मुंबईतील समुद्रात अवैध मजार बनणे हे प्रशासनाचे अपयश ! – अधिवक्ता संतोष दुबे, जिल्हा सहमंत्री, विश्व हिंदु परिषद

अधिवक्ता संतोष दुबे

मुंबईतील समुद्रात अवैध मजार बनणे, हे प्रशासनाचे अपयश आहे. हा विषय फक्त मुंबईपुरता नसून हा देशाचा विषय आहे. संपूर्ण देशात विविध ठिकाणी हे चालू आहे; मात्र या अतिक्रमणांना पाठिंबा देण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा प्रत्येक चुकीच्या, समाज आणि कायदा विरोधी गोष्टींना पाठिंबा देते. जोपर्यंत सामान्य माणूस ही यंत्रणा समजून याला विरोध करत नाही, तोपर्यंत अवैध अतिक्रमणे होत रहातील.

‘लँड जिहाद’च्या विरोधात लढा देण्यासाठी हिंदूंनी जागृत होऊन संघटित होणे आवश्यक ! – सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. सतीश कोचरेकर

देशात ‘लँड जिहाद’च्या प्रकरणांविषयी महामंडळाची निर्मिती आणि कायदे करून त्यातील दोषींवर सरकारने कारवाई केली पाहिजे. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना शिधापत्रक बनवून देणारे राजकीय नेते अन् अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मुंबईतील मालाड येथील मालवणी भागात २०० मशिदी उभारल्या आहेत. तेथून हिंदूंचे स्थलांतरही झाले आहे. त्यामुळे हिंदूंनी जागृत होऊन याविरोधात लढा देण्यासाठी आता एकत्र आले पाहिजे.

राज्य सरकारने ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमणविरोधी विशेष कायदा करावा ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, संस्थापक, हिंदु टास्क फोर्स

अधिवक्ता खुश खंडेलवाल

सरकारी भूमींवर ताबा घेऊन तिथे मजारी, दर्गे आदी बांधून त्याला धार्मिक स्वरूप देऊन त्या वास्तूंना मुसलमान समाजाच्या भावना जोडल्या जातात. मग तेथील आजूबाजूच्या परिसरात वस्ती बसवली जाते. असे अपप्रकार देशात अनेक ठिकाणी पद्धतशीरपणे चालू असून उत्तन गाव, भाईंदर (जिल्हा ठाणे) येथेही सरकारी भूमीवर अवैध दर्गा निर्माण करून ‘लँड जिहाद’चा प्रयत्न करण्यात आला आहे. येथील सत्ताधारी पक्षाने हा अवैध दर्गा तोडण्याविषयी काहीच केले नाही. याविषयी आम्ही कायदेशीर लढा देत आहोत. राज्य सरकारने ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमणविरोधी विशेष कायदा करून त्याविषयीच्या प्रकरणांचे वेगाने निकाल लावणे आवश्यक झाले आहे.