बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

मागील काही दिवसांपासून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी (बीबीसी) ही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी भारतासह जगभरात अधिक चर्चेला आली आहे. वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवर आधारित इंडिया-द मोदी क्वेश्‍चन हा माहितीपट आणि नुकतीच प्रसारित केलेली द शमीमा बेगम स्टोरी ही वृत्तमालिका बीबीसीविषयीच्या चर्चेचे मुख्य कारण आहे. हे दोन्ही कार्यक्रम बीबीसीकडून नुकतेच प्रसारित करण्यात आले. हे दोन्ही कार्यक्रम पाहिल्यास बीबीसीचा हिंदुद्वेष आणि आतंकवाद्यांविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न लपून रहात नाही. गुजरात दंगलीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेविषयी इंडिया-द मोदी क्वेश्‍चन या माहितीपटातून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच्या दुसर्‍या भागात वर्ष २०१४ नंतर भारतातील अनेक शहरांमधील अल्पसंख्यांकांवरील आक्रमणाला केंद्र सरकारला उत्तरदायी धरण्यात आले आहे. एका बाजूला बीबीसीने गुजरात दंगलीवरून हिंदूंना लक्ष्य केले आहे; मात्र दुसर्‍या बाजूला द शमीमा बेगम स्टोरी या मुलाखतीतून घरदार सोडून आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या शमीमा बेगम या धर्मांध युवतीविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी बीबीसी ही स्वत:ला निष्पक्षपाती वृत्तप्रसारण करणारी संस्था म्हणवून घेते, हेच मुळात हास्यास्पद आहे. मूळची बांगलादेशातील रहिवासी असलेली शमीमा बेगम वर्ष २०१५ मध्ये २ मैत्रिणींसह इसिस या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी सीरिया येथे पळून गेली. तेथे जिहाद्यांच्या आतंकवादी कारवायांमध्ये तिचा सक्रीय सहभाग असल्याचे लक्षात आल्यावर वर्ष २०१९ मध्ये ब्रिटनने शमीमा बेगम हिचे नागरिकत्व रहित केले. धर्मांध जिहाद्यांपासून तिला ३ मुले झाली. सध्या शमीमा बेगम २३ वर्षांची असून आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियामध्ये गेल्याविषयी पश्‍चात्ताप व्यक्त करत आहे. शमीमा हिच्या पश्‍चात्तापाच्या अश्रूंनी व्यथित होऊन बीबीसीने तिची ९० मिनिटांची प्रदीर्घ मुलाखत प्रसारित केली. सीरिया येथे गेल्याचे मला दु:ख होत आहे. माझी कथा अन्यांमध्ये जागरूकता निर्माण करील, असे नक्राश्रू शमीमा आता ढाळत आहे आणि हे नक्राश्रू पुसण्याचे काम बीबीसी करत आहे. एकीकडे सर्वोच्च न्याययंत्रणेकडून निर्दोषत्व घोषित झाल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे आणि दुसरीकडे शमीमा बेगम हिच्या आतंकवादी कारवायांवर मात्र पांघरूण घालत तिच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत दाखवायची ही कसली पत्रकारिता ?

आतंकवादी शमीमा बेगम

बीबीसीचे वृत्तांकन नेमके कशासाठी ?

शमीमा हिचे अश्रू पुसणार्‍या बीबीसीला गुजरात दंगलीपूर्वी साबरमती रेल्वेमध्ये जिवंत जाळण्यात आलेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांचे अश्रू का दिसत नाहीत ? या अत्याचारात मृत्यू झालेल्या एकाही हिंदूच्या कुटुंबियांची प्रदीर्घ मुलाखत बीबीसीला इतक्या वर्षांत घ्यावीशी वाटली नाही; मात्र याच प्रकरणात हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न बीबीसी करत आहे. शमीमा जर खरोखरच पश्‍चात्तापाचे अश्रू ढाळत असेल, तर ती ज्या जिहादी आतंकवादाला बळी पडली, त्याचे खरे स्वरूप जगापुढे आणण्यासाठी खरेतर बीबीसीने तिला प्रेरित करायला हवे होते आणि त्या दृष्टीने मुलाखत घ्यायला हवी होती. शमीमा हिने सीरियामध्ये काही वर्षे इसिसच्या आतंकवाद्यांसमवेत घालवली आहेत. त्यामुळे या आतंकवाद्यांच्या क्रौर्याविषयी तिला माहिती झाली आहे. खरेतर शमीमासारख्या युवती इस्लामी आतंकवादाच्या कशा प्रकारे मोहरा होतात ? आणि स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त करतात, या अंगाने बीबीसीला मुलाखत घेता आली असती. जर शमीमा हिलाही खरोखरच पश्‍चात्ताप झाला असता, तर तिने स्वत:हून या जिहादी आतंकवाद्यांचे खरे स्वरूप मुलाखतीमध्ये मांडले असते; परंतु तसे का झाले नाही ? याच्या मुळापर्यंत जायला हवे. जगाला डोईजड झालेला इस्लामी आतंकवाद हा मुलाखतीचा मुख्य विषय सोडून त्यात होरपळलेल्या युवतीला सहानुभूती मिळण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. यातूनच बीबीसीची तुष्टीकरण करणारी पत्रकारिता उघड होते. यातून बीबीसीचे वृत्तांकन कशासाठी चालू आहे ? त्याच्यामागे कुणाचा अर्थपुरवठा होत आहे ? हे खरे चौकशीचे विषय आहेत.

ही हिंदुद्वेषी पत्रकारिता नव्हे का ?

ब्रिटनमधून आतंकवादी कारवायांसाठी इसिसमध्ये जाणारी शमीमा ही एकमेव मुसलमान युवती नाही. गेल्या काही वर्षांत ब्रिटनमधून इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्‍या मुसलमान युवतींचे प्रमाण वाढत आहे. ब्रिटनपुढे ही एक मोठी समस्या आहे. असे असतांना शमीमाविषयी सहानुभूती निर्माण करणारी मुलाखत प्रसारित केल्यामुळे ब्रिटनमधील नागरिकांनीही बीबीसीचा निषेध केला आहे. काही ब्रिटीश नागरिकांनी बीबीसीने दाखवलेल्या या मुलाखतीला पेड न्यूज (पैसे घेऊन वृत्त दाखवणे) म्हटले आहे. वर्ष २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर ब्रिटनमधील लिसेस्टर शहरात हिंदु अन् मुसलमान यांच्यामध्ये दंगल उसळली. या वेळीही बीबीसीने हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. बीबीसीचे वृत्तांकन हिंदूंना हिंसक आणि धर्मांध ठरवणारे होते. विविध हिंदी चित्रपट आणि वेब सिरीज यांमधून हिंदूंच्या देवतांना अवमानकारक पद्धतीने दाखवण्यात आले. त्या विरोधात हिंदूंनी आवाज उठवला; मात्र हिंदूंच्या भावना समजून न घेता त्यांच्या श्रद्धेचा अवमान करणार्‍यांची तळी उचलून घेणार्‍यांमध्ये सर्वांत पुढे बीबीसीच होती. बीबीसीचा हा हिंदुद्वेष काही नवीन नाही. हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने वृत्तांकन कसे करावे ? हा तिचा प्रश्‍न आहे; परंतु हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !

जिहादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या युवतीची मुलाखत घेणे, हा बीबीसीचा इस्लामधार्जिणेपणा !