इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विद्यार्थ्यांपासून खरा इतिहास लपवला ! – डॉ. एस्.एल. भैरप्पा, ज्येष्ठ साहित्यिक

इतिहासाच्या विकृतीकरणाविषयी प्रश्‍न विचारल्यामुळे डॉ. भैरप्पा यांना  ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या समितीतून वगळले !

डॉ. एस्.एल. भैरप्पा, ज्येष्ठ साहित्यिक

नवी देहली – येथील ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ या संस्थेत कार्यरत असतांना थोर साहित्यिक डॉ. भैरप्पा यांनी काही आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात अभ्यासक्रमातून मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना खर्‍या इतिहासापासून वंचित ठेवण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ. भैरप्पा यांनी मांडलेली सूत्रे

१. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता नियम’ सिद्ध केले आणि त्याचा एक भाग म्हणून जी. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. पार्थसारथी हे इंदिरा गांधींचे धोरण सल्लागार होते आणि त्यांचे विश्‍वासू होते, तसेच ते जवाहरलाल नेहरू कुटुंबाच्याही जवळचे होते.

२. पार्थसारथी यांनी नंतर ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनरावृत्ती समिती’ स्थापन करून ५ सदस्यांची नियुक्ती केली. त्या ५ सदस्यांपैकी मी एक होतो. पहिल्याच बैठकीत पार्थसारथी यांनी आम्हाला इतिहास आणि सामाजिक अभ्यास यांची पाठ्यपुस्तके ‘स्वच्छ’ (खरा इतिहास वगळण्यास) करायला सांगितली.

३. मी विचारले की, पाठ्यपुस्तकांमधून नेमके काय वगळले पाहिजे ? त्यावर पार्थसारथी यांनी मला, ‘पाठ्यपुस्तकांमध्ये मोगल शासक औरंगजेबाने वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ मंदिरासह शेकडो मंदिरे नष्ट केल्याचा उल्लेख आहे. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये याची आवश्यकता आहे का ? अशा घटना विद्यार्थ्यांची मने कलुषित करतात’, असे सांगितले.

४. या उत्तराने मी आश्‍चर्यचकित होऊन पार्थसारथी यांना, ‘जर औरंगजेबाने वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ मंदिर नष्ट केले नाही, तर काशी विश्‍वनाथ मंदिर कुणी नष्ट केले ?’, असे विचारले. त्याचे पार्थसारथी यांच्याकडे याचे उत्तर नव्हते.

सत्य इतिहास मांडण्यास आग्रही असणारे डॉ. भैरप्पा यांना समितीतून वगळले !

राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनरावृत्ती समितीच्या बैठकीच्या कार्यवाहीचे वर्णन करतांना डॉ. भैरप्पा म्हणाले, ‘‘मी पार्थसारथी यांना विचारले की, वाराणसीच्या मशिदीकडे एकटक पहाणार्‍या नंदीकडे पाहून कोणता निष्कर्ष काढला जाऊ शकतो ? भविष्यात या विषयावर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्‍न विचारला, तर शिक्षक काय उत्तर देतील ? पार्थसारथी यांच्याकडे या प्रश्‍नांची उत्तरे नव्हती. पार्थसारथी यांनी मला त्यांच्या दालनात नेले आणि सांगितले, ‘तुम्ही कर्नाटकाचे आहात आणि मी तमिळनाडूचा आहे. आपण भावासारखे वागले पाहिजे. आपण भांडायला नको.’ पार्थसारथी यांचे म्हणणे ऐकून मी बाहेर पडलो. १५ दिवसांनी झालेल्या पुढच्या बैठकीत मी पुन्हा तेच प्रश्‍न विचारले. पार्थसारथी यांनी रागाने तेथेच बैठक संपवली. काही दिवसांनंतर ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनरावृत्ती समिती’ची पुनर्रचना करण्यात आल्याची सरकारी अधिसूचना प्रकाशित झाली. त्यामध्ये माझे नाव गायब झाले होते.’’

साम्यवादी इतिहासकारांची नियुक्ती करून खरा इतिहास लपवला !

राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनरावृत्ती समितीची ५ सदस्यीय रचना कायम ठेवण्यात आली होती; मात्र माझ्याऐवजी एका साम्यवादी विचारसरणीच्या इतिहासकाराची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने इतिहास आणि सामाजिक अभ्यास यांची पुस्तके पालटून विद्यार्थ्यांपासून खरा इतिहास लपवला. सर्व धडे साम्यवादी विचारसरणीला अनुकूल होते. अभ्यासक्रमात बाहेरील आक्रमकांना ‘नायक’ म्हणून दाखवण्यात आले होते. याउलट भारताचा खरा खजिना, इतिहास आणि ज्ञान यांना त्या पुस्तकांमध्ये स्थान नव्हते.

संपादकीय भूमिका

  • अभ्यासक्रमातून भारताचा विकृत इतिहास शिकवून काँग्रेसने युवा पिढीची मोठ्या प्रमाणात अपरिमित हानी केली. ती भरून काढण्यासाठी भाजप सरकार, भारतातील बुद्धीजीवी आणि विचारवंत यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक !
  • इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक. असे केले, तरच भविष्यात कुणी खोटा इतिहास शिकवण्याचे किंवा सांगण्याचे धारिष्ट्य करणार नाही !