साधकांना विविध विद्यांच्या मायेत अडकू न देता थेट ईश्वरापर्यंत नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सर्व साधकांना मोक्षपथ दाखवणारे  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. राम होनप

‘गेल्या ३ – ४ मासांत अनेक संतांना भेट देण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. त्यांपैकी बर्‍याच संतांकडे विविध विद्या अथवा सिद्धी आहेत. यांद्वारे त्यांना समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार ओळखता येणे, व्यक्तीच्या मागील, तसेच पुढील जन्मात जाता येणे, विविध वस्तू आपोआप प्रकट करता येणे, प्राणी-पक्षी यांचे संभाषण ऐकता येणे इत्यादी गोष्टी साध्य होतात.

हे सर्व पाहून मनात पुढील विचार आले, ‘या विद्यांमुळे साधक मायेत अडकण्याची शक्यता असते, तसेच त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटू शकते. या विद्यांचा उपयोग समाजात केल्यावर पैसा, प्रसिद्धी, लोकेषणा यांत साधक अडकू शकतो, तसेच वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊ शकतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना त्यांचे एकच ध्येय सांगितले, ते म्हणजे साधना करून मोक्षाला जाणे. त्यामुळे साधक कुठलीही विद्या अथवा सिद्धी यांत न अडकता झपाट्याने या मायेतून पलिकडे जातो, म्हणजे साधनेत प्रगती करतो आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते. यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना विविध विद्या न शिकवता एकमेव ‘मोक्षविद्या’ शिकवली आहे’, असे म्हणता येईल.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.