सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

अष्टविनायकांना प्रार्थना !

स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः
बल्लाळस्तु विनायकस्तथ मढे चिन्तामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे
ग्रामे रांजणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ।।

अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महाड येथील वरदविनायक, थेऊर येथील चिंतामणी, लेण्याद्रिचा गिरिजात्मज, उत्तम वर देणारा ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा महागणपति सर्वांवर सदैव कृपा करो !

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक (मोरगाव येथील मयुरेश्वर, थेऊर येथील चिंतामणी, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, रांजणगाव येथील महागणपति, ओझर येथील विघ्नेश्वर, लेण्याद्री येथील गिरिजात्मज, महाड येथील वरदविनायक आणि पाली येथील बल्लाळेश्वर) यांचे दर्शन घ्यावे. या दौर्‍याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्‍यात पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील महागणपतीचे दर्शन घेतले आणि ११.१०.२०२२ या दिवशी रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेतले.

रांजणगाव येथील महागणपती
श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी रांजणगाव येथील महागणपतीचे घेतले दर्शन !

१. महागणपतीची आरती करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. मंदिराजवळ पोचल्यावर वादळी वारा आणि पाऊस येणे

श्री. विनायक शानभाग

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रांजणगाव येथील महागणपति मंदिराजवळ पोचल्यावर वादळी वारा सुटला आणि जणू आशीर्वादाचा पाऊस पडला.

२. महागणपतीची आरती आणि प्रार्थना !

मंदिरात गेल्यावर तेथील मुख्य पुजारी श्री. महेश कुलकर्णी यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून महागणपतीची आरती करून घेतली आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना केली.

३. देवस्थान मंडळाच्या वतीने सन्मान !

२. मंदिराचे मुख्य पुजारी श्री. महेश कुलकर्णी यांच्या समवेत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

यानंतर श्री. महेश कुलकर्णी यांनी देवस्थान मंडळाच्या वतीने त्यांच्या कार्यालयात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत दौर्‍यावर असलेले चारही साधक यांचा शाल देऊन सन्मान केला. त्यानंतर ते सर्वांना त्यांच्या घरी घेऊन गेले आणि सर्वांना फराळही दिला.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१४.१०.२०२२)

रांजणगाव येथील ‘महागणपति’ मंदिर आणि महागणपतीच्या स्थापनेचा इतिहास !

१. मंदिर आणि मंदिरातील श्री गणेशमूर्ती !

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील ‘महागणपति’ हा अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकांतील ‘चौथा गणपति’ म्हणून हा ओळखला जातो. येथील मंदिर पूर्वाभिमुख आहे. इंदूरचे सरदार किबे यांनी येथील मंदिराचा सभामंडप बांधला असून श्रीमंत माधवराव पेशवे यांनी गाभारा बांधला आहे. ‘दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील’, अशा प्रकारे या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना केली आहे. येथील मूळ मूर्तीला ‘महोत्कट’ असे नाव आहे.

सभामंडपातून आत गेल्यावर गाभार्‍यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून तिच्या दोन्ही बाजूंना ऋद्धिसिद्धि उभ्या आहेत. दारापाशी जय आणि विजय हे दोघे रक्षक आहेत. ‘हा गणपति नवसाला अगदी निश्चितच पावतो’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

२. श्री गणेशाचे स्मरण करून भगवान शंकराने युद्धात त्रिपुरासुराचा केलेला वध आणि ‘मणीपूर’ या गावी केलेली महागणपतीची स्थापना !

त्रिपुरासुराने उपासना करून गणपतीला प्रसन्न करून घेतले आणि ‘भगवान शंकराविना इतर कुणी आपला वध करू शकणार नाही’, असा वर मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. त्याचे दोन सेनापती ‘भीमकाय’ आणि ‘वज्रदंत’ यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास आरंभ केला. त्यामुळे त्रिपुरासुर आणि भगवान शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने ‘प्रणम्य शिरसा देवम् ।’ म्हणजे ‘या (विनायक) देवतेला विनम्रपणे वंदन करून’ या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुक्ल पौर्णिमेला ही घटना घडली; म्हणून या दिवसाला ‘त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले, ते मणीपूर गाव होय. तिथे शंकराने महागणपतीची स्थापना केली. या महागणपतीला मोती आणि पोवळे (मणी) अतिशय प्रिय आहेत; म्हणूनच या नगरीस ‘मणीपूर’ हे नाव पडले. आज तेच गाव ‘रांजणगाव’ म्हणून ओळखले जाते.

रांजणगाव येथे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (गणेशचतुर्थीला) मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो.