नवी मुंबई विमानतळासाठी धोकादायक असणार्‍या दर्ग्यावर कारवाई करावी !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना मनसेचे कार्यकर्ते

पनवेल – नवी मुंबई विमानतळासाठी धोकादायक असणार्‍या पारगाव-दापोली गावाच्या जवळील दर्ग्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे पनवेल शहर अध्यक्ष योगेश चिले यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की,

१. पारगाव-दापोली गावाच्या जवळ जे.एन्.पी.टी. महामार्गाच्या डाव्या बाजूला एका टेकडीवर दर्गा बांधण्यात आला आहे. दर्ग्याच्या बाजूला ६ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. काही अंतरावर सिमेंट-काँक्रीट आणि लोखंड यांच्या साहाय्याने बुलंद दरवाजाही बांधला आहे.

२. दर्ग्याच्या ठिकाणाहून निर्माणाधीन नवी मुंबई विमानतळ आणि भाभा अणुशक्ती केंद्र यांची टेहाळणी करता येते. तसेच तेथून आक्रमण होऊ शकते. टेकडीजवळील पोलीस चौकी अनेक मासांपासून बंद आहे.

टेकडीजवळ बांधण्यात आलेला दर्गा

३. काही मासांपूर्वी दर्ग्यावर संशयित व्यक्ती मोठ्या दुर्बिणी घेऊन टेहाळणी करत होत्या. तेव्हा त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलीस ठाण्यात नेले होते.

४. उत्तरप्रदेशातून आलेल्या काही मौलवींचा येथे सातत्याने वावर दिसून येतो. विमानतळाच्या सुरक्षेविषयी येथे बाहेरून येणार्‍यांचा वावर संशय निर्माण करणारा आहे.

५. या प्रकरणी त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी.

संपादकीय भूमिका

अनधिकृत दर्गा राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांना दिसतो, तर सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ? हे संबंधित यंत्रणेचे अपयश म्हणायचे कि अकार्यक्षमता ? शासकीय भूमींचे संरक्षण करण्याच्या कामात कुचराई करणारे वनविभाग आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई केल्यास कामचुकारपणा करण्याचे धाडस अन्य अधिकारी करणार नाहीत !