मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यावर होणारे शारीरिक लाभ

ऋतूनुसार बहुतेक लोक गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करतात. पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने अनेक समस्या दूर होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो, तसेच तणावही न्यून होतो. या व्यतिरिक्त  मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने आणखी कोणते लाभ होतात, हे पुढे देत आहोत.

१. सांधेदुखी न्यून होणे

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास सांधेदुखी न्यून होते. अंघोळ करतांना पाण्यात चिमूटभर मीठ टाकले, तर हाडांमधील किरकोळ दुखणे दूर होते. जर तुमचे पाय पुष्कळ दुखत असतील, तर कोमट पाण्यात मीठ घालून पाय धुतल्यास लाभ होतो.

२. संसर्ग न्यून होणे

कोणत्याही प्रकारचे संसर्ग दूर करण्यासाठी मिठाचे पाणी पुष्कळ उपयुक्त आहे. वास्तविक मिठात असलेली खनिजे अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करतात. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरिरातील सर्व छिद्रे उघडतात. त्यामुळे शरिरातील संसर्गाचा धोका न्यून होतो.

३. पुरळ न होणे

मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी मिठाचे पाणी पुष्कळ लाभदायी आहे. शरिराची सर्व छिद्रे उघडल्याने ‘बॉडी डिटॉक्स’ (शरिरातील घाण बाहेर टाकण्याची प्रक्रिया) झाल्यामुळे चेहर्‍यावरील डाग आणि पुरळही न्यून होतात, तसेच हे पाणी त्वचा हायड्रेट (सजलीकरण) करण्यासाठी पुष्कळ लाभदायी आहे.

४. ताण न्यून होऊन मेंदूला चांगले वाटणे

जर स्वतःला कोणत्याही गोष्टीचा पुष्कळ ताण येत असेल, तर मिठाच्या पाण्याने अंघोळ जरूर करावी. मिठाच्या पाण्यात असलेली खनिजे शरिरात शोषली जातात. ‘सोडियमचा मेंदूवरही परिणाम होतो’, असे मानले जाते. ‘बॉडी डिटॉक्स’ झाल्याने त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो आणि स्वतःला बरे वाटते.

(पाण्यात मीठ घालून अंघोळ केल्याने आध्यात्मिक स्तरावरही उपाय होतात. यामुळे स्वतःभोवती आलेले त्रासदायक आवरणही न्यून होते, तसेच शरिरातील त्रासदायक (काळी) शक्तीही न्यून होण्यास साहाय्य होते. – संकलक)

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)