यासीन मलिक याला जन्मठेप

यासीन मलिक याला जन्मठेप

नवी देहली – काश्मीरमधील पूर्वीचा आतंकवादी, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिक याला पटियाला हाऊस न्यायालयाने पाकच्या साहाय्याने आतंकवादासाठी अर्थपुरवठा आणि शस्त्रे पुरवणे यांच्या संदर्भातील २ गुन्ह्यांच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच अन्य ४ गुन्ह्यांच्या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. त्याला १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मलिक याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. यासीन मलिक याला शिक्षा सुनावण्याच्या पूर्वी श्रीनगर येथे त्याच्या समर्थकांकडून सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आली.


(सुरक्षादलांवर दगडफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश सरकारने द्यावा ! – संपादक) त्या वेळी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या हिंसाचारामुळे तेथील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. मलिक याने यापूर्वीच त्याच्यावरील आरोप स्वीकारले होते. त्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

पाकच्या आजी-माजी पंतप्रधानांचा थयथयाट

१. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील राजकीय कैद्यांशी भारत सरकारच्या वागणुकीकडे जगाने लक्ष दिले पाहिजे. प्रमुख काश्मिरी नेता यासीन मलिक याला आतंकवादाच्या खोट्या आरोपात दोषी ठरवणे, हा भारत करत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर टीका करणार्‍यांना शांत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मोदी सरकारला उत्तरदायी धरले पाहिजे. (जिहादी आतंकवाद्यांवर आणि त्यांना होणार्‍या अर्थपुरवठ्यावर पाकने कोणतीच कारवाई न केल्याने त्याला ‘एफ्.ए.टी.एफ्.’ने करड्या सूचीत घातले आहे, त्याविषयी शाहबाज शरीफ का बोलत नाहीत ? – संपादक)

२. पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मलिकच्या शिक्षेला विरोध करतांना म्हटले की, काश्मिरी नेता यासिन मलिक याच्या विरोधात मोदी सरकारच्या ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) रणनीतीचा मी तीव्र निषेध करतो. मलिक यांना खोट्या आरोपाखाली कारावासाची शिक्षा दिली जात आहे. (पाकने एकातरी ‘खर्‍या’ आतंकवाद्याला शिक्षा दिली आहे का ? हे इम्रान खान सांगतील का ? – संपादक)

३. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी यासिन मलिक याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत त्याच्या विरोधात उठलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या हाती अपयशच येईल. यासीन मलिकवरील मनमानी आरोपांमुळे काश्मीरच्या स्वातंत्र्यलढ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. (आफ्रिदी यांनी काश्मीरऐवजी बलुचिस्तानमधील लोकांच्या स्वातंत्र्यलढ्यावर बोलावे ! – संपादक) मी संयुक्त राष्ट्रांना काश्मिरी नेत्यांविरुद्ध चालू असलेल्या अवैध खटल्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती करतो. (भारताच्या अंतर्गत प्रश्नात तोंड खुपसण्याला संयुक्त राष्ट्र मूर्ख आहे ?, असे आफ्रिदी यांना वाटते का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा आतंकवाद्यांना जन्मठेप नाही, तर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !