कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातून पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव वगळले !

पुणे – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अन्वेषणाच्या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांना गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगास लेखी पत्राद्वारे दिली. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधातील गुन्ह्याच्या अन्वेषणात प्रगती नसल्याविषयी मुंबईतील मानव हक्क आयोगाचे काम करणारे अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी राज्य मानव हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर त्यांना वरील उत्तर देण्यात आले.

१. १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाजवळ मानवंदनेचा कार्यक्रम चालू असतांना दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या प्रकरणात शिक्रापूर पोलीस ठाण्यात पू. संभाजीराव भिडेगुरुजी, समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे यांच्यासह ४० जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणी काही मासांपूर्वी दोषारोपत्र प्रविष्ट करण्यात आले होते.

२. या प्रकरणी शहरी नक्षलवाद्यांचा हात असल्याचे आढळून आल्यानंतर आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, कवी वरवरा राव, स्टेन स्वामी, सुधा भारद्वाज आणि व्हर्नन गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली होती.

३. मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्तांत्तर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘कोरेगाव-भीमा प्रकरणी उसळेल्या हिंसाचारास मिलिंद एकबोटे आणि पू. संभाजीराव भिडेगुरुजी हेच उत्तरदायी असून त्यांनी तेथील वातावरण बिघडवले’, असे म्हटले होते. या प्रकरणी राज्य सरकारकडून विशेष अन्वेषण समिती स्थापन करण्यात येणार होती; मात्र त्याआधीच हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.)कडे सोपवण्यात आले.

४. या प्रकरणी सांगली येथे पू. भिडेगुरुजी यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात ते त्या वेळी घटनास्थळी नसल्याचे, तसेच या प्रकरणी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.

संपादकीय भूमिका

पू. भिडेगुरुजी यांच्यावर वारंवार खोटे आरोप करणार्‍या पुरोगाम्यांचे पितळ उघडे !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर गेली ४ वर्षे जे खोटे आरोप झाले, त्याची भरपाई कोण देणार ? पू. भिडेगुरुजी यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसतांना पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद केले गेले. असे खोटे गुन्हे नोंद करणार्‍या पोलिसांवर शासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !