कलेच्या संदर्भातील प्रयोग कलाप्रांताला सुदृढ करणारे असावेत !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील (कै.) भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.

पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२)

पू. किरण फाटक

१. मानवाच्या कल्याणासाठी प्रयोगांची आवश्यकता असणे

‘नाविन्याच्या शोधात असलेली व्यक्ती जेव्हा त्यासाठी निरनिराळे प्रयत्न करते आणि तर्कसंगत नवीन समीकरणे मांडते, त्यास ‘प्रयोग’ म्हणावे’, असे वाटते. प्रयोग हा तळमळीने केलेला एक प्रामाणिक आणि अभ्यासू प्रयत्न असतो. प्रयोगामागचा हेतू शुद्ध असतो; किंबहुना तो वास्तवातील एखाद्या अपूर्ण वाटणाऱ्या गोष्टीला पूर्णत्व देण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. जुन्या किंवा कालबाह्य; परंतु तत्कालीन लोकप्रिय गोष्टींना नवे परिमाण आणि आकृती देण्यासाठी जो अभ्यास केला जातो, त्यास ‘प्रयोग’ म्हटले, तर वावगे ठरणार नाही. ‘दोन किंवा अधिक वस्तूंच्या मिश्रणातून तिसरी उपयोगी वस्तू निर्माण करणे’, यासाठी प्रयोगाची आवश्यकता लागते. मानवाच्या कल्याणासाठी (शारीरिक अथवा मानसिक उन्नतीसाठी) निरनिराळ्या प्रयोगांची निकड भासते.

२. कला प्रवाही रहाणे अत्यंत महत्त्वाचे असले, तरी ‘समाजाच्या समवेत चालावे; पण समाजासह वहावत जाऊ नये’, हा  नियम प्रयोगकर्त्यांनी सांभाळणे आवश्यक असणे

मानसिक शांती आणि उन्नती हे मानवी जीवनाचे साध्य आहे. त्यासाठी ललित कलांचा जन्म झाला. संगीत, चित्रकला, स्थापत्य, शिल्प आणि काव्य या कला मानवाला मानसिक आनंद देतात. या कला प्रवाही रहाणे अत्यंत महत्त्वाचे असते. समाजजीवनाच्या समवेत कलेमध्ये परिवर्तन होत रहाणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणणे, हेसुद्धा कला, कलाकार आणि कला संशोधक यांचे काम असते. ‘समाजाच्या समवेत चालावे; पण समाजासह वहावत जाऊ नये’, हा नियम प्रयोगकर्त्यांनी सांभाळला पाहिजे.

३. संगीतात विविध शाखा असून स्वर सीमित असल्याने संगीताकृती टिकाऊ आणि आनंददायी होण्यासाठी प्रयोगकर्ते प्रयत्नशील असणे; मात्र त्यांना ‘त्या प्रयोगांतून काय निष्पन्न होईल ?’, याचा अंदाज बांधता न येणे

संगीतात अनेक शाखा आहेत, तसेच स्वर, ताल, सादरीकरण आणि वाद्ये, असे अनेक घटक आहेत. त्याचप्रमाणे देशोदेशींचे संगीत, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, असेही अनेक प्रकार आहेत. हे सर्व १२ स्वरांत सीमित आहेत. (७ शुद्ध स्वर, ४ कोमल स्वर आणि १ तीव्र स्वर असे १२ स्वर) संगीताचा प्रसार आणि प्रचार संपर्क माध्यमांच्या सामर्थ्यावर अवलंबून असतो. अनेक प्रकारचे संगीत ऐकल्याने जनरूची पालटत जाते. संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचे संक्रमण वेगाने होते. त्यामुळे संगीताचे आकृतीजन्य आयुष्य न्यून होते. आधीचे वेगाने मागे पडते आणि नवे नवे येत रहाते. त्यामुळे ‘संगीताकृती टिकाऊ आणि आनंददायी कशी होईल ?’, यासाठी प्रयोग होत असतात. यात सादरीकरणाच्या क्षेत्रात अधिक प्रयोग होतात. ‘१२ स्वरांतून नवनव्या आकृत्या निर्माण करून त्या अभिनव पद्धतीच्या सादरीकरणातून कशा सादर करता येतील ?’, यावर प्रतिभावंत विचार करत असतात, तसेच प्रयोग करत असतात. त्यांना ‘या प्रयोगांचे फलित काय असेल ?’, याचा विशेष अंदाज असेलच, असे नाही. लोकांसमोर हा प्रयोग ठेवल्यावर ‘त्याचे कौतुक होईल कि निंदा ?’, याचाही अंदाज त्यांना बांधता येत नाही; कारण प्रयोग हा एक कर्मयोग आहे. ‘त्याचे फळ गोड असेल कि कडू ?’, हेही सांगता येत नाही.

४. गायनाविषयीचे काही नवीन प्रयोग यशस्वी ठरणे आणि काही प्रयोग रसिकांनी न स्वीकारणे

फार पूर्वी काव्यगायन आणि काव्यवाचन यांचे कार्यक्रम होत असत; परंतु निवडक गेय कवितांना सुंदर चाली लावून त्या मधाळ आवाजात सर्वांसाठी खुल्या (जाहीर) कार्यक्रमात सादर करणे, हा प्रयोग प्रथम स्व. गजाननराव वाटवे यांनी केला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला. त्यांनीच मराठीत ‘भावगीत’ या प्रकाराला ऊर्जितावस्था दिली. मराठीत स्व. सुधीर फडके (बाबूजी) यांचा ‘गीतरामायणा’चा एकल गायनाचा प्रयोग सफल झाला. यात बाबूजीच सीता, श्रीराम, लक्ष्मण, भरत, दशरथ, हनुमान, विश्वामित्र इत्यादींची गाणी गात असत आणि ओघवते निवेदनही करत असत. चरित्रगायनाचा हा त्यांचा अभिनव प्रयोग होता आणि तो यशस्वीही झाला. डॉ. सलील कुलकर्णी (मराठी गायक आणि संगीतकार) आणि कविवर्य संदीप खरे यांचा काव्य अन् संगीत यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा प्रयोगही पुष्कळ यशस्वी ठरला. माझ्या माहितीत यापूर्वी असा प्रयत्न कुणीही केला नव्हता.

उपशास्त्रीय संगीतात ‘बैठकीची लावणी’ हा प्रयोग श्री. अशोक रानडे यांनी सादर केला आणि त्याचेही रसिकांनी स्वागतच केले; मात्र ‘फ्युजन’ (टीप १) या प्रयोगाचे म्हणावे तितके स्वागत झाले नाही; किंबहुना त्यावर मान्यवरांकडून बरीच टीका झाली. प्रस्थापित गाण्यात (ठेक्यात अथवा मधल्या संगीतात) पालट करून ते नवे म्हणून स्वीकारणे रसिकांना रुचले नसावे. प्रस्थापित गाणी श्रोत्यांच्या हृदयात एक वेगळे प्रेम लेऊन स्थानापन्न झालेली असतात. त्याला धक्का लावलेला त्यांना रुचत नाहीत; म्हणून प्रयोग करतांना शक्यतो प्रस्थापित गाण्यांना हात न लावलेलाच बरा !

टीप १ – दोन किंवा अधिक वस्तू अथवा कला एकत्र करून एकसंध परिणाम साधणे

५. शास्त्रीय संगीतात करता येण्यासारखे विविध अभिनव प्रयोग

शास्त्रीय संगीतात नवरागनिर्मिती हा एक प्रयोगच ठरतो; परंतु या नवीन रागांचे प्रमाणीकरण होणे पुष्कळ आवश्यक आहे, तसेच चित्रपट गीतातील बंदीशसदृश गीते निवडून ती शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायली, तर तो एक अभिनव प्रयोगच होईल. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत चतुरंग (टीप २), त्रिवट (टीप ३), सरगमगीत (टीप ४) यांचे विधिवत् विस्तारपूर्वक गायन हासुद्धा एक प्रयोग होईल.

टीप २ – चतुरंग किंवा चतरंग म्हणजे ज्यात चार प्रकारचे रंग, म्हणजेच गीतप्रकार एकत्रित केलेले असतात, असे गीत. यात छोटा ख्याल, सरगमगीत, तराणा आणि त्रिवट हे गीतप्रकार एकत्रित केलेले असतात.

टीप ३ – हा एक अर्थहीन शब्दरचना असलेला गीतप्रकार आहे. यात मृदंगाचे अथवा तबल्याचे बोल गायले जातात.

टीप ४ – रागाची कल्पना आणि चलन लक्षात येण्यासाठी एखाद्या रागात, तसेच तालात बसवलेल्या स्वररचनेस ‘सरगमगीत’ किंवा ‘स्वरमालिका’, असे म्हणतात. या गीतात केवळ स्वरच गायले जातात. यात शब्द नसतात.

 ६. पू. किरण फाटक यांनी केलेला प्रयोग

शास्त्रीय संगीतातील रागातील बंदिशी (टीप ५) सर्वसाधारणपणे हिंदी, उर्दू या भाषांत असतात; परंतु या बंदिशी इंग्रजी आणि मराठी या भाषांत रचून त्या विस्तारपूर्वक गाण्याचा प्रयोग डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील पू. किरण फाटक (मी) यांनी केला. या प्रयोगाला काही लोकांनी विरोधही केला; पण बऱ्याच प्रतिभावंत कलाकारांनी या प्रयोगाला पाठिंबाही दिला.

टीप ५ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. ही मध्यलय किंवा द्रुतलय यांत गातात.

७. प्रयोग कसा असायला हवा ?

प्रत्येक प्रयोगामागे एक तर्कशुद्ध विचार हवा. त्यामागील हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असावा. प्रयोगामागे एक सौंदर्यदृष्टी हवी. प्रयोग सादरीकरणाची एक विशिष्ट वेगळी पद्धत हवी. उगाच तोडमोड, आदळआपट नसावी.

प्रयोग हा सवंग लोकप्रियतेसाठी करणे उचित नव्हे. ‘आपल्या प्रयोगामुळे जनमानसात उच्च अभिरुची निर्माण व्हावी आणि तो प्रयोग कलाप्रांताला सुदृढ करणारा असावा’, असे माझे प्रांजळ मत आहे.’

– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (जून २०२१)