युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील गुण आपल्यात बाणवण्याचा प्रयत्न करावा ! – आदित्य शास्त्री, हिंदु जनजागृती समिती

दानोळी (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने पकडल्यावर त्यांनी धर्मपरिवर्तन करावे; म्हणून त्यांचा अतोनात शारीरिक छळ करण्यात आला. त्यांनी ३० दिवस असह्य छळ सोसूनही धर्मपरिवर्तनास नकार दिला आणि अखेर हिंदु धर्मासाठी प्राणत्याग केला. तरी युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील गुण आपल्यात बाणवण्याचा प्रयत्न करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी केले.

श्री. आदित्य शास्त्री

दानोळी गावातील धर्मप्रेमी सर्वश्री धनंजय यादव आणि संतोष शिंदे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने १४ मार्च २०२२ या दिवशी गावातील लोकांना विषय सांगण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले होते. त्या वेळी श्री. शास्त्री बोलत होते.

या प्रसंगी अनेक जिज्ञासूंची उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांनी विषय आवडल्याचे सांगून यापुढे धर्मकार्य करण्यासाठी प्रत्येक १५ दिवसांनी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला.