देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू.(सौ.) माला संजीव कुमार यांचे संतपद घोषित होण्यापूर्वी साधकांना आठवण येऊन भावजागृती होणे

पौष शुक्ल पक्ष सप्तमी (९.१.२०२२) या दिवशी देहली येथील सनातनचे ११५ वे संत पू. संजीवकुमार यांचा ७१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

२३ डिसेंबर या दिवशी श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे संतपद घोषित होण्याच्या काही दिवस आधीपासून आनंद जाणवणे, त्यांची आठवण येऊन भावजागृती होणे अशा प्रकारच्या साधकाला आलेल्या अनुभूती येथे पाहूया.

पू. संजीव कुमार यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार

१. श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार रामनाथी आश्रमात आल्याचे समजल्यावर आनंद होणे

श्री. वैभव आफळे

‘मागील सप्ताहात देहली येथून श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार रामनाथीला आल्याचे समजले. तेव्हापासून मला आनंद जाणवत होता आणि ‘त्यांच्याशी कधी बोलू ?’, असे वाटत होते. २२.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी पुन्हा मला त्या दोघांची आठवण आली, तसेच परात्पर गुरुदेवांचे स्मरण होऊन माझी भावजागृती होऊ लागली. माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन माझ्या उत्साह वाढला. ‘मला असे का जाणवले ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. ‘मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती बरी नसल्याने भगवंताने मला ही अनुभूती दिली’, असे वाटून मी कृतज्ञता व्यक्त केली.

२. दुसर्‍या दिवशी सकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार यांची आठवण येऊन भावजागृती होणे

२३.१२.२०२१ या दिवशी सकाळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले, श्री. संजीवभैय्या आणि सौ. मालादीदी यांची आठवण येऊन भावजागृती होऊ लागली. धर्मप्रसारानिमित्त मी काही वर्षे त्यांच्या घरी राहून सेवा केली होती. ‘देव मला त्याविषयीचे स्मरण करून देत आहे’, असा भाव ठेवून मी कृतज्ञता व्यक्त केली. ही स्थिती सकाळी साधारण ११ वाजेपर्यंत होती.

३. त्याच दिवशी सायंकाळी श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार यांनी संतपद गाठल्याचे समजल्यावर वरील गोष्टींचा उलगडा होणे

सायंकाळी जेव्हा श्री. संजीवभैय्या आणि सौ. मालादीदी संतपदी विराजमान झाल्याचे मला समजले, तेव्हा ‘देव मला भावावस्थेत का ठेवत होता ? तो मला श्री. संजीवभैय्या आणि सौ. मालादीदी यांचे स्मरण का करून देत होता ?’, याचा उलगडा होऊन माझी भावजागृती झाली.

३. कृतज्ञता

काही वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी सांगितले होते, ‘आपण विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप झाल्यास आपल्याला त्यांतील स्पंदने जाणवतात’, हे आठवून माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

‘हे गुरुमाऊली, ही आपलीच कृपा आहे. या जिवाला आपणच या प्रसंगातून भावावस्था अनुभवण्यास दिली आणि कृतज्ञतेच्या भावात ठेवून सकारात्मक केलेत’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता ! संतद्वयींच्या चरणी साष्टांग नमस्कार !’

(टीप – हे लिखाण संतपद घोषित होण्यापूर्वीचे असल्यामुळे सर्वत्र त्यांचा उल्लेख श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार असा केला आहे. –  संपादक)

– श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), फोंडा, गोवा. (२३.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक