ओमिक्रॉन विषाणूला नागरिकांनी घाबरू नये ! – बाळासाहेब पाटील, पालकमंत्री, सातारा

सातारा, ७ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अल्प झाले आहे. आता कोरोनाचा नवीन ‘व्हेरियंट’ ओमिक्रॉन आला आहे; मात्र या विषाणूला नागरिकांनी घाबरून न जाता शासन आणि प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये घेण्यात आलेल्या कोरोनाविषयी आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अजय बोर्‍हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ‘‘कोरोना अल्प झाला असला, तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी. विदेशातून येणार्‍या नागरिकांची माहिती केंद्रशासन राज्यशासनाला देत आहे. तरीही आपल्या घराजवळ एखादा नागरिक विदेशातून आला असेल, तर याविषयी तात्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, तसेच अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज ठेवावी.’’