पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर केलेल्या निरीक्षणात पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे

श्राद्धविधींविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘श्राद्ध म्हटले की, सध्याच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते. पूजा, श्राद्धपक्ष यांवर विश्वास न ठेवणारे किंवा ‘समाजकार्यच श्रेष्ठ आहे’, असे समजणारे, ‘पितरांसाठी श्राद्ध न करता त्याऐवजी गरिबांना अन्नदान करू किंवा शाळेला साहाय्य करू’, असे म्हणतात ! भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. ‘पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध केल्याचा श्राद्धविधीतील पिंडांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २७.९.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत श्राद्धविधी करण्यापूर्वी आणि केल्यानंतर या विधीतील घटक असलेल्या पिंडांची (टीप) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – पिंड म्हणजे काय ? : ‘भातात तिळाचे पाणी, वडा आणि खीर घालतात. त्यानंतर भात मळून साधारणतः लिंबाएवढे गोल, न फुटतील असे, चांगले घट्ट पिंड करतात. पितृत्रयीकरता जरा मोठे पिंड करण्याची पद्धत कृतज्ञतामूलक आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)

श्राद्धविधीच्या वेळी पिंडदान विधी करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सनातनचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझे (संग्रहित छायाचित्र)

१ अ. पिंडांमध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळणे : पिंडांमध्ये श्राद्धविधी करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

१ आ. श्राद्धविधीच्या पूर्वीही पुष्कळ प्रमाणात असलेली पिंडांमधील सकारात्मक ऊर्जा श्राद्धविधीनंतर आणखी वाढणे : श्राद्धविधीचा आरंभ करण्यापूर्वीही पिंडांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ १.७० मीटर होती. श्राद्धविधी केल्यानंतर पिंडांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २ मीटर झाली, म्हणजे तिच्यात ०.३० मीटर वाढ झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत
डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२ अ. श्राद्धविधीमध्ये पिंडदानाचे (पिंडपूजेचे) असलेले महत्त्व : ‘श्राद्धविधीमध्ये पिंडदानाला (पिंडपूजेला) पुष्कळ महत्त्व आहे. पिंड भाताचा केला जातो. तांदुळाचा जेव्हा भात केला जातो, त्या वेळी त्यातील रजोगुण वाढतो. या रजोगुणी पिंडाच्या वातावरणकक्षेत मृतात्म्याच्या लिंगदेहाला प्रवेश करणे सोपे गेल्याने मंत्रोच्चारणाने भारलेल्या वायुमंडलाचा त्याला लाभ होऊन सूक्ष्म बळ प्राप्त झाल्याने पुढची मार्गक्रमणा करणे सोपे जाते.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’)

२ आ. श्राद्धविधीमुळे पितरांच्या लिंगदेहाभोवती सुरक्षाकवच निर्माण होऊन त्याला पुढची गती मिळण्यास साहाय्य होणे : ‘श्राद्धाच्या मंत्रांनी निर्माण होणार्‍या लहरी, ब्राह्मणांचे आशीर्वाद, नातेवाइकांच्या सदिच्छा आणि पिंडदान यांसारख्या कर्मकांडाच्या विधींनी अलौकिक परिणाम होतात. यामुळे पितरांच्या लिंगदेहाभोवती सुरक्षाकवच निर्माण होऊन, त्याला पुढची गती मिळण्यास साहाय्य होते. नरक, भुवलोक, पितृलोक आणि स्वर्ग यांत या विधींचे लाभ होतात.

२ इ. पितृपक्षात पितरांचे महालय श्राद्ध केले असता, ते संतुष्ट होऊन वर्षभर तृप्त रहातात, तसेच त्यांचे कुटुंबियांना आशीर्वाद लाभतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)

२ ई. श्राद्धविधी केल्यानंतर पितरांचा आशीर्वाद लाभल्यामुळे पिंडांतील सकारात्मक ऊर्जा वाढणे : सूत्र ‘२ अ’ ते ‘२ इ’ यांमधून श्राद्धविधी आणि पिंडदान (पिंडपूजन) यांचे महत्त्व लक्षात येते. श्राद्धविधी केल्यानंतर पिंडांच्या केलेल्या निरीक्षणांतून पिंडांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढल्याचे आढळून आले. याचा अर्थ श्राद्धविधीमुळे पिंड सकारात्मक ऊर्जेने भारित झाले. श्राद्धापूर्वीची निरीक्षणे दुपारी ३.५० वाजता केली होती, तर नंतरची रात्री ८.१५ वाजता केली होती. या साडेचार घंट्यांच्या कालावधीत पिंड तसे शिळे झाले होते. पिंड भातापासून बनवलेले असतात. ताजे अन्न सात्त्विक असते. अन्न जसे शिळे होत जाईल, तशी त्यातील सात्त्विकता न्यून होत जाते. त्यामुळे साडेचार घंट्यांचा वेळ उलटल्यावर पिंडांमधील सकारात्मक ऊर्जा न्यून होणे अपेक्षित होते; पण तसे न होता, त्यांतील सकारात्मक ऊर्जा वाढणे, हे श्राद्धविधीमुळे पिंडांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे स्पष्ट करते. पिंडांवर झालेला हा सकारात्मक परिणाम श्राद्धविधीमुळे पितरांचा आशीर्वाद लाभल्यामुळे झाला, हे लक्षात येते.

२ उ. श्राद्धविधी परिणामकारक होण्यामध्ये साहाय्यभूत असलेले इतर घटक

१. श्राद्ध सनातनच्या आश्रमातील सात्त्विक वातावरणात करण्यात आले.

२. श्राद्धविधी करणारे पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी साधना करत असून, त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.

३. श्राद्धाचे यजमान श्री. आदित्य कासकर हे सनातनचे पूर्णवेळ साधक आहेत. त्यांच्याकडून श्राद्धविधी भावपूर्ण झाला.

वरील सर्व सूत्रांमुळे श्राद्धविधीनंतर पिंडांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झालेली आढळली. या वैज्ञानिक प्रयोगावरून श्राद्धविधी हा थोतांड नसून त्यामागे अध्यात्मशास्त्र आहे, हे सिद्ध होते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.१०.२०१८)

ई-मेल : [email protected]