आपल्या प्रीतीमय वागण्याने प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षून घेणारे अन् सुंदर बाललीलांनी सर्वांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

१७.९.२०२१ म्हणजेच ‘वामन जयंती’ या दिवशी सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा तिथीनुसार तिसरा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्यांची आई सौ. मानसी राजंदेकर यांना पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत. १७.९.२०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण पू. वामन यांच्या भेटीसाठी आतुरलेले प्राणी-पक्षी आणि पू. वामन यांची त्यांच्यावर असलेली प्रीती आणि प्रत्येक गुरुवारी होणार्‍या भाववृद्धी सत्संगाविषयी पू. वामन यांचा भाव यांविषयीची माहिती पाहिली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/511599.html

पू. वामन राजंदेकर

६. अखंड देवाच्या अनुसंधानात असणारे पू. वामन !

पू. वामन दिवसभर, तसेच खेळत असतांनाही वेगवेगळे नामजप करतात. काही वेळा ते वेगवेगळे श्लोकही म्हणत असतात. पू. वामन बाह्यतः खेळतांना दिसत असले, तरी ‘ते अंतर्मनातून अखंड देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे लक्षात येते.

६ अ. दिवसभरात बर्‍याच वेळा पू. वामन यांनी ‘ॐ’ चे दीर्घ उच्चारण करणे आणि त्यामुळे वातावरण शांत होणे : दिवसभरात बर्‍याच वेळा पू. वामन अकस्मात् मांडी घालून बसतात आणि ‘ॐ’ ‘ॐ’ असे म्हणतात. त्यांचे ‘ॐ’ चे उच्चारण पुष्कळ दीर्घ असते. आम्हालाही इतका वेळ तसे म्हणता येत नाही. त्यांनी ओंकाराचे उच्चारण केले की, घरातील वातावरण एकदम शांत आणि स्थिर होते. त्या वेळी माझ्या मनातील सर्व विचार आपोआप थांबतात.

६ आ. वाहनाने बाहेर जातांना पू. वामन यांनी जयघोष आणि श्लोक म्हणणे : आम्ही वाहनाने बाहेर जात असतांना पू. वामन जयघोष आणि श्लोक म्हणण्याची आठवण करून देतात अन् स्वतः म्हणायला आरंभ करतात. जयघोष आणि श्लोक म्हणून पूर्ण होईपर्यंत ते कुणाला काही बोलू देत नाहीत. ते त्यांच्या बाबांना गाडीला प्रार्थना करण्याचीही आठवण करून देतात.

अग्निहोत्रामध्ये भावपूर्ण आहुती देतांना पू. वामन राजंदेकर

६ इ. पू. वामन यांनी अग्निहोत्र करण्याची आठवण करून देणे आणि त्यासाठी साहाय्य करणे : आम्ही प्रतिदिन संध्याकाळी घरी अग्निहोत्र करतो. संध्याकाळ झाली की, पू. वामन आम्हाला अग्निहोत्र करण्याची आठवण करून देतात आणि त्याची सिद्धता करायला साहाय्य करतात. पू. वामन यांना अग्नीचे भय वाटत नाही. अग्नि प्रज्वलित झाल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. त्या वेळी ते भावपूर्ण प्रार्थना आणि श्लोक म्हणतात. पू. वामन यांना अग्निहोत्राची विभूती विशेष आवडते.

६ ई. पू. वामन यांनी खेळण्यातील साहित्य घेऊन घरी यज्ञ करतांना रामनाथी आश्रमात होणार्‍या यज्ञांतील सर्व बारकावे लक्षात ठेवून त्या क्रमाने आणि गांभीर्याने यज्ञ करणे अन् त्यांच्या या कृतीमुळे घरात पुष्कळ चैतन्य निर्माण होणे : पू. वामन खेळण्यातील साहित्य घेऊन यज्ञ करतात, तसेच मंत्र म्हणत ते आहुती देण्याची कृतीही करतात. त्या वेळी ‘ते प्रत्यक्ष यज्ञच करत आहेत’, असे जाणवते. यज्ञ झाल्यानंतर ते आरती करतात आणि शेवटी श्री गुरूंचा श्लोक म्हणतात. हा सर्व क्रम त्यांनी रामनाथी आश्रमात होणार्‍या यज्ञांच्या वेळी बघितला आहे. तो लक्षात ठेवून ते त्याप्रमाणे कृती करतात. (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी यज्ञस्थळी बसणे, पुरोहित साधकांनी मंत्र म्हणत आहुती देणे, आरती करणे, नंतर उभे राहून पूर्णाहुती दिली जाणे इत्यादी सर्वच गोष्टी त्यांना क्रमाने ठाऊक आहेत.) यातून ‘प्रत्यक्ष यज्ञांच्या वेळी पू. वामन किती बारकाईने सर्व कृतींचे निरीक्षण करतात’, याची आम्हाला जाणीव झाली. ते खेळतांनासुद्धा सर्व कृती तितक्याच गांभीर्याने करतात, जशा प्रत्यक्ष यज्ञाच्या वेळी केल्या जातात. त्यांच्या अशा खेळण्यामुळे घरातील वातावरणात पुष्कळ चैतन्य निर्माण होते. यातून लक्षात येते की, संतांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असते.

७. रामनाथी आश्रम आणि आश्रमाशी निगडित गोष्टी यांच्या प्रती असलेला पू. वामन यांचा उच्च कोटीचा भाव !

७ अ. दळणवळण बंदीमुळे रामनाथी आश्रमात जाता येत नसतांना पू. वामन यांनी आश्रमात जाण्यासाठी हट्ट करणे, तेव्हा दुरूनच आश्रम दाखवल्यावर त्यांनी हात जोडून नमस्कार करणे : कोरोनाच्या काळात गोव्यातील दळणवळण बंदी आणि शासन नियम यांमुळे मध्यंतरी आम्ही रामनाथी आश्रमात जाऊ शकत नव्हतो. पू. वामन यांना हे समजावून सांगण्याचा आम्ही पुष्कळ प्रयत्न केला, तरीसुद्धा ते कधी कधी आश्रमात जाण्यासाठी पुष्कळ हट्ट करायचे. त्या वेळी आम्ही त्यांना आश्रमाच्या समोरच्या डोंगरावरील रस्त्यावर घेऊन जायचो. तिथून रामनाथी आश्रम दिसला की, चारचाकी गाडीत बसूनच आम्ही आश्रमाचे दर्शन घ्यायचो. तेव्हा पूर्णवेळ पू. वामन हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत आश्रमाकडे बघत रहायचे. ते एकही शब्द बोलायचे नाहीत. त्यांचे आश्रमाकडे बघून समाधान झाले की, ते स्वतःच ‘आता आपण जाऊया’, असे म्हणायचे.

सौ. मानसी राजंदेकर

७ आ. आश्रमातील गाडी पाहिल्यावर पू. वामन यांना आनंद होऊन त्यांनी भावपूर्ण नमस्कार करणे : आमच्या सदनिकेच्या जवळ काही साधक रहातात. त्यांच्याकडे ‘आश्रमातील चारचाकी गाडी आली आहे’, हे वाहनाच्या आवाजावरूनच पू. वामन यांना समजते. ते लगेचच ती गाडी बघण्यासाठी आगाशीत जातात आणि ‘ही आपल्या आश्रमाची गाडी आहे’, असे सांगतात. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते हात जोडून गाडीला इतका भावपूर्ण नमस्कार करतात की, ते बघून आमचाही भाव जागृत होतो.

७ इ. रामनाथी आश्रमातून किंवा संतांकडून प्रसाद मिळाल्यावर पू. वामन यांनी भावपूर्ण नमस्कार करणे : काही वेळा रामनाथी आश्रमातून किंवा संतांकडून कु. श्रिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि पू. वामन यांच्यासाठी प्रसाद येतो. तो प्रसाद बघून पू. वामन यांच्या तोंडवळ्यावरील भाव पालटतात आणि ते डोके टेकून त्या प्रसादाला नमस्कार करतात.

७ ई. खेळण्यातील प्रत्येक गाडीला ‘आश्रमाची गाडी’, असे संबोधणार्‍या पू. वामन यांचा भाव !

७ ई १. गाडीत वेगवेगळे साहित्य भरून ते आश्रमात पाठवण्याचा खेळ खेळणे : पू. वामन त्यांच्या खेळण्यातील प्रत्येक गाडीला ‘आश्रमाची गाडी’, असे म्हणतात. ते गाडीत वेगवेगळे साहित्य, उदा. भाजीपाला, खाऊ, सिमेंट, माती असे साहित्य खोटेखोटे भरून ते आश्रमात पाठवण्याचा खेळ खेळतात.

७ ई २. स्वतःकडील गाड्या ‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या आहेत अन् ‘मी नारायणांच्या गाडीत आहे’, असे आनंदाने सांगणारे पू. वामन ! : पू. वामन यांच्याकडे चार लहान चारचाकी गाड्या आहेत. त्यातील ‘मोठी गाडी नारायणांची (परात्पर गुरु डॉक्टरांची), दुसरी गाडी सद्गुरु मावशींची (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंची), तिसरी गाडी सद्गुरु काकूंची (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूूंची) आणि चौथी गाडी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांची’, असे ते सांगतात. ‘पू. वामन कोणत्या गाडीत आहेत ?’, असे विचारल्यावर ‘नारायणांच्या गाडीत आहेत’, असे म्हणून ते आनंदाने टाळ्या वाजवतात. पू. वामन यांच्या या खेळामुळे आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळतो. पू. वामन यांच्या तोंडवळ्यावरील आनंद बघून असे वाटते की, त्या गाड्यांमधून परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका खरोखरंच प्रवास करत आहेत.

८. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील ‘गुरुपरंपरा’ हे पान पहातांना पू. वामन यांनी सगळ्यांना ‘नारायण’ असे संबोधणे आणि त्या पानाला साष्टांग नमस्कार करणे

पू. वामन यांच्या उशीजवळ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला आहे. ते दिवसभरात कधीही हा ग्रंथ उघडून परात्पर गुरुदेवांची आणि अन्य संतांची छायाचित्रे बघतात. मध्यंतरी ते या ग्रंथातील ‘गुरुपरंपरा’ हे पान बघत होते. त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रावर बोट ठेवून ‘नारायणांचे नारायण’, असे म्हणून नमस्कार केला. नंतर ते प.पू. रामानंद महाराज आणि श्री अनंतानंद साईश यांना बघून ‘हेसुद्धा नारायण’, असे म्हणाले. त्यानंतर श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांना बघून म्हणाले, ‘‘हेसुद्धा नारायण आहेत.’’ आम्ही कुणीही काही न सांगता शेवटी ते म्हणाले, ‘‘ही गुरुपरंपरा आहे.’’ त्यांनी त्या पानाला साष्टांग नमस्कार केला. नंतर ते म्हणाले, ‘‘मी यांना बघितले आहे. हे मला ठाऊक आहेत.’’ नंतर कितीतरी वेळ शांत बसून ते त्या छायाचित्रांकडे बघत होते. पू. वामन दिवसभरात काही वेळा अकस्मात् असे कोड्यात बोलल्याप्रमाणे एखादे वाक्य बोलून जातात.

प्रार्थना

‘हे भगवंता, नारायणा ! पू. वामन आणि त्यांची प्रत्येक कृती यांविषयी लिहिण्यासारखे पुष्कळ आहे. परात्पर गुरुदेवा, वरील सर्व सूत्रे मागील काही मासांतील आहेत. परात्पर गुरु डॉक्टर, जसे तुम्हाला समजून घेणे आणि तुमच्याविषयी लिहिणे अशक्य आहे, तसेच पू. वामन यांच्याविषयी लिहितांनाही मला वाटत आहे. हे गुरुदेवा, आपणच हे लिखाण लिहून घेत आहात, नाहीतर माझ्यासारख्या सर्वसामान्य जिवाला हे अशक्यच आहे. ‘तुमची इच्छा आणि आज्ञा म्हणूनच हे लिहिले जात आहे’, याची अनुभूती मला सतत येते. ‘पू. वामन यांच्यासारख्या जिवाचे संगोपन करणे’, हे मोठे दायित्व आहे. तुम्ही दिलेले हे दायित्व तुम्हाला अपेक्षित अशा प्रकारे आमच्याकडून पार पाडले जाऊ दे, ही तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (१०.८.२०२१)

पू. वामन यांनी आईला टंकलेखन करतांना पाहून ‘हे लिखाण माझ्याविषयीचे आहे आणि नारायणांना पाठवायचे आहे ना ?’, असे विचारणे

‘या धारिकेचे टंकलेखन करतांना पू. वामन यांनी स्वतःच ओळखले की, ही त्यांची धारिका आहे. त्यांनी मला याविषयी विचारले, ‘‘आई, ही माझी धारिका आहे ना, नारायणांना (परात्पर गुरु डॉक्टरांना) पाठवायची आहे ना ? ही वाचून ते ‘गो गो (गोड गोड)’ हसतील ना !’’ प्रत्यक्षात पू. वामन यांना मी करत असलेल्या लिखाणाविषयी काहीच ठाऊक नव्हते आणि त्यांना वाचताही येत नाही, तरी त्यांना हे समजले होते.’

(समाप्त)

– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (१०.८.२०२१)

‘सनातनचे बालक संत पू. वामन राजंदेकर यांच्यासारखे संतच पुढे येणारे हिंदु राष्ट्र चालवतील’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाक्याची प्रचीती देणारा एक प्रसंग

१. सौ. मानसी राजंदेकर, फोंडा, गोवा.

१ अ. विमानातून उतरतांना हवाईसुंदरीने पू. वामन यांना हात हलवून ‘बाय बाय’ करणे, यावर पू. वामन यांनी हात जोडून नमस्कार केल्याने आश्चर्य वाटून तिनेही पू. वामन यांना नमस्कार करणे अन् नंतर येणार्‍या प्रवाशांनाही ती हात जोडून नमस्कार करू लागणे : ‘२८.२.२०२१ या दिवशी आम्ही ‘पुणे ते नागपूर’ असा विमानप्रवास करत होतो. विमानातून उतरतांना तेथे उपस्थित असलेल्या हवाईसुंदरीने पू. वामन (वय २ वर्षे ४ मास) आणि कु. श्रिया (पू. वामन यांची मोठी बहीण, वय १० वर्षे) यांनाही हात हलवून ‘अच्छा (बाय बाय)’ केले. त्यावर पू. वामन यांनी तिला हात जोडून नमस्कार केला. ते पाहून हवाईसुंदरीला इतके आश्चर्य वाटले की, तिने क्षमा मागून पू. वामन यांना हात जोडून ‘नमस्कार’, असे म्हटले. त्यानंतर आम्ही चालत पुढे निघालो. नंतर आमच्या मागून येणार्‍या प्रवाशांनाही ती हात जोडून नमस्कार करू लागली.’ (मार्च २०२१)

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२ अ. ‘बालवयापासूनच पू. वामन राजंदेकर यांचे समाजाला घडवण्याचे कार्य चालू आहे’, हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते ! : ‘समाजोद्धार हे संतांचे कार्य असते. संतांच्या चैतन्यामुळे समाज आपोआप कृतीशील होतो. ‘पू. वामन राजंदेकर यांचे बालवयापासूनच समाजाला घडवण्याचे कार्य कसे चालू आहे’, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट होते.

पू. वामन यांच्यातील चैतन्यामुळे हवाईसुंदरीलाही नमस्काराची धर्माचरणाची कृती करता आली. या प्रसंगातून ‘असे संतच पुढे येणारे हिंदु राष्ट्र चालवतील’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाक्याची प्रचीती येते.’ (२८.३.२०२१)