श्री गणेशमूर्तीचे विसर्जन बाराही मास पाणी असलेल्या जलस्रोतात करावे !

हिंदु जनजागृती समितीची सोलापूर महापालिकेकडे मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर, १६ सप्टेंबर (वार्ता.) – तात्पुरते पाणी असलेल्या जलस्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यास कालांतराने पाणी न्यून झाल्याने मूर्ती उघड्या पडून त्यांची विटंबना होण्याची शक्यता असते, त्यामुळे महापालिकेकडून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन बाराही मास पाणी असलेल्या जलस्रोतात करावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विनोद रसाळ यांनी येथील महापालिका उपायुक्त विजय खराटे यांना दिले. येथील महापालिकेने संकलन केंद्राकडे श्री गणेशमूर्ती सोपवण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या…

१. पालिकेच्या कर्मचार्‍यांनी श्री गणेशमूर्ती पाण्यात फेकून न देता त्या हळूवारपणे पाण्यात समर्पित कराव्यात.

२. श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनस्थळी ‘सी.सी.टी.व्ही. कॅमेरा’चे नियोजन करावे, जेणेकरून सर्व कृती सुयोग्य होण्यास साहाय्य होईल.

३. श्री गणेशमूर्तींच्या वाहतुकीसाठी कचरा संकलन करणारी वाहने वापरली जाऊ नये.

४. पालिकेच्या प्रत्येक वाहनासमवेत गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी एका पुरोहिताची नियुक्ती करावी.