जनतेला जागरूक करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी; म्हणून आपण सर्वांनी एक उत्तरदायी नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जनतेच्या मनातील असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते. ‘आज आपण सर्वांनी, तसेच विविध मंडळे, संस्था यांनीही कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी; म्हणून प्रयत्न करायला हवेत’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ‘वर्षा’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक गणरायाची प्रतिष्ठापना केली असून ‘अमंगल ते सर्व नष्ट होवो’ असे साकडे गणरायाला घातले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे अगदी परदेशातही श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसर्‍या वर्षीही आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आहोत. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असे चित्र असायचे. दोन वर्षांपासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असले, तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधने आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे, हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य आहे. गणरायाला ‘विघ्नहर्ता’ असे म्हणतात. तो हे संकट कायमचे दूर करेल, अशी मला खात्री आहे.