बांगलादेशी धर्मांध तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात !

सीमा सुरक्षा दल सतर्क !

तालिबानमुळे भारतासमोर उभे राहिलेले आणखी एक संकट ! या बांगलादेशी धर्मांधांनी भारतात घुसखोरी करून प्रथम भारतात भारतविरोधी कारवाया केल्या आणि नंतर अफगाणिस्तान गाठल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक ! – संपादक

मध्यभागी पोलीस आयुक्त शफिकुल इस्लाम

नवी देहली – अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर काही बांगलादेशी धर्मांध भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व जण तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले आहे.

१. बांगलादेशची राजधानी ढाकाचे पोलीस आयुक्त शफिकुल इस्लाम यांनी सांगितले की, या तरुणांना कोणत्याही मार्गाने अफगाणिस्तान गाठायचे आहे; मात्र ते एकूण किती जण आहेत, याची माहिती नाही. २० वर्षांपूर्वीदेखील तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी बांगलादेशी युवक मोठ्या संख्येने अफगाणिस्तानला गेले होते.

२. सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरचे पोलीस उपमहानिरीक्षक एस्.एस्. गुलेरिया यांनी याविषयी सांगितले की, आमचे सैनिक सतर्क आहेत. आतापर्यंत आम्ही तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या एकाही तरुणाला अटक केली नाही. बांगलादेशमधील अधिकार्‍यांनी भारतातील अधिकार्‍यांना आधीच कळवले होते की, तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतल्यामुळे बांगलादेशातील काही जिहादी अत्यंत उत्साहित आहेत.

३. तालिबाननेही बांगलादेशी तरुणांना त्यांच्या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावर ‘अफगाणिस्तानमधील घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहेत’ असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.