पुणे येथील दळणवळण बंदीच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

प्रतीकात्मक चित्र

पुणे, ८ एप्रिल –  राज्य सरकार पाठोपाठ पुणे महापालिकेने शहरात घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या निर्णयाचा येथील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. २५ दिवसांच्या दळणवळण बंदीमुळे व्यापार्‍यांच्या होणार्‍या हानीचा विचार सरकारने करावा अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. तसेच शहरातील सर्व दुकाने चालू करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघासह पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. शहरात अनेक कारखाने, पेट्रोल पंप, रिक्शा, खाद्यपदार्थ स्टॉल्सवर गर्दी आहे. तेथे नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने घालायला हवी त्यांच्यावर न घालता केवळ व्यापार्‍यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे. सरकारचा आदेश योग्य नाही, असे वाटत असेल तर त्या विरोधात आंदोलन करता येऊ शकते. त्या आदेशाचे उल्लंघन सद्यस्थितीत करणे योग्य होणार नाही, असे व्यापारी संघटनांनी म्हटले होते.