आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता : पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. अशा वेळी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार असेल. क्रमशः प्रसिद्ध होणार्‍या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, या विषयीच्या माहितीसह कुरडू आणि टाकळा या २ वनस्पतींची माहिती समजून घेऊया. लवकरच या विषयावर सनातनचा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. या ग्रंथात ‘औषधी वनस्पती गोळा करून साठवून ठेवणे’ याविषयी व्यावहारिक (प्रत्यक्ष करण्याच्या कृतींची) माहिती सविस्तरपणे दिली जाईल.

१. पावसाळ्यानंतर काही औषधी वनस्पती वाळून जात असल्याने त्या आताच गोळा करून ठेवा !

वैद्य मेघराज पराडकर

‘प्रतिवर्षी वरुणदेवतेच्या कृपेमुळे पावसाळ्यात निसर्गतः असंख्य औषधी वनस्पती उगवतात. यातील काही वनस्पती पावसाळा संपल्यावर साधारण १ – २ मासांत वाळून जातात. त्यानंतर पुन्हा पावसाळा येईपर्यंत या वनस्पती मिळत नाहीत. त्यामुळे अशा वनस्पती आताच गोळा करून ठेवायला हव्यात.

२. औषधी वनस्पती गोळा करून ठेवण्याचे लाभ

या लेखात दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी काही वनस्पती आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानांत विकतही मिळतात; परंतु अशा वनस्पती विकत घेण्यापेक्षा त्या निसर्गातून गोळा करणे कधीही चांगले असते. विकत मिळणार्‍या औषधी वनस्पती ताज्या असतीलच, याची निश्‍चिती नसते. वनस्पती जुन्या असल्यास त्यांची परिणामकारकता न्यून होते. बहुतेक वेळा पेठेत मिळणार्‍या औषधी वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते. त्यांच्यामध्ये धूळ, माती आणि इतर कचराही असतो. याउलट जेव्हा आपण स्वतः औषधी वनस्पती गोळा करतो, तेव्हा त्या ताज्या आणि निर्भेळ मिळतात. अशा वनस्पती आपण धुवून ठेवू शकतो. त्यामुळे त्या स्वच्छही रहातात. वनस्पती गोळा करून नीट वाळवून हवाबंद डब्यात सुरक्षित ठेवल्यास साधारण १ ते दीड वर्ष वापरता येतात.

३. वनस्पतींची ओळख होण्यासाठी गावातील जाणकार किंवा परिचित वैद्य यांचे साहाय्य घ्या !

खेडेगावातील बहुतेक वयस्कर व्यक्तींना बर्‍याच औषधी वनस्पतींची माहिती असते. अशा व्यक्तींना या लेखात दिलेल्या वनस्पतींची छायाचित्रे दाखवून त्या वनस्पती कुठे मिळू शकतील, हे विचारून या वनस्पतींची निश्‍चित ओळख करून घ्या. शक्य असल्यास आपल्या ओळखीच्या वैद्यांचेही साहाय्य घेता येईल. वैद्यांना औषधी वनस्पतींची ओळख तर असतेच, तसेच ती कशी वापरायची, याचेही ज्ञान असते. एखादा कुशल वैद्य एकाच औषधी वनस्पतीचा विविध रोगांत प्रभावीपणे वापर करू शकतो. या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त एखाद्या जाणकाराने अन्यही वनस्पती सांगितल्यास त्यांचाही योग्य त्या प्रमाणात संग्रह करून ठेवावा.

४. औषधी वनस्पती गोळा करण्यासंबंधी काही प्रायोगिक सूत्रे

अ. घरातून बाहेर पडण्यापूर्वी प्रार्थना करावी आणि घरी आल्यावर कृतज्ञता व्यक्त करावी.

आ. घाण, सांडपाणी, दलदल, स्मशानभूमी इत्यादी ठिकाणच्या वनस्पती गोळा करू नयेत. औषधी वनस्पती गोळा करणार असू, ती जागा स्वच्छ असावी.

इ. त्या परिसरात प्रदूषण निर्माण करणारे, विशेषतः हानीकारक रसायने सोडणारे कारखाने नसावेत.

ई. बुरशी किंवा कीड लागलेल्या, तसेच रोगट वनस्पती घेऊ नयेत.

उ. विषारी वृक्षावरील औषधी वनस्पती घेऊ नयेत, उदा. कुचल्याच्या (काजर्‍याच्या) झाडावरील गुळवेल घेऊ नये.

ऊ. जिथे मनाला त्रासदायक स्पंदने जाणवतात, त्या जागेवरील वनस्पती घेऊ नयेत.

ए. वनस्पतीची निश्‍चित ओळख झाल्याविना वनस्पती काढू नये. चुकीच्या वनस्पतीचा वापर झाल्याने हानीकारक परिणामही होऊ शकतात. त्यामुळे जाणकाराकडून वनस्पतीची निश्‍चित ओळख करून घ्यावी.

ऐ. सूर्यास्तानंतर औषधी वनस्पती तोडू नयेत.

५. औषधी वनस्पती गोळा केल्यावर करण्याची प्रक्रिया

अ. गोळा केलेल्या वनस्पती सुतळीने एकत्र बांधून त्यांवर लगेच नाव लिहून पिशव्यांत भराव्यात.

आ. त्या घरी आणून स्वच्छ धुवून घ्याव्यात. वनस्पती धुतांना त्यांचे बी वाया जाऊ नये, यासाठी धुण्यापूर्वी ते वेगळे काढून ठेवावे. वनस्पती मुळापासून उपटून आणलेल्या असल्यास त्यांची मुळे कात्रीने कापून झाडापासून वेगळी करावीत. मुळांना माती लागलेली असल्याने ती माती वनस्पती धुतांना अन्य वनस्पतींना लागू नये, यासाठी मुळे वेगळी धुवावीत.

इ. वनस्पती स्वच्छ धुतल्या जाव्यात, यासाठी त्या आणल्यावर अर्धा ते एक घंटा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. यामुळे त्यांच्यावरील धूळ आणि अन्य मळ भिजून लवकर वेगळा होण्यास साहाय्य होते.

ई. वनस्पती ओल्या असतांनाच त्यांचे लहान तुकडे करून ठेवावे.

उ. वनस्पती धुवून झाल्यावर त्या उन्हात नीट वाळवाव्यात. वनस्पती सुगंधी असतील, तर त्या उन्हात न वाळवता सावलीत वाळवाव्यात. वाळलेल्या वनस्पतींवर पुढची प्रक्रिया लगेच करायची नसल्यास त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये नाव घालून सीलबंद करून ठेवाव्यात. वनस्पतींच्या सीलबंद केलेल्या पिशव्या हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

ऊ. वाळवून ठेवलेल्या वनस्पती किंवा त्यांची चूर्णे वापरात नसतील, तर ठराविक कालावधीने डबे उघडून ती सुस्थितीत आहेत ना, याची पहाणी करावी.

ए. वनस्पतीचे नीट वाळलेले लहान तुकडे मिक्सरमध्ये घालून त्यांची बारीक पूड करून ठेवावी. मिक्सरमध्ये केलेली पूड पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यावी. चाळणीत जो चाळ राहील, तो एकतर पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक करावा किंवा तसाच वेगळा पिशवीत ठेवून द्यावा. वनस्पतीच्या बारीक भुकटीला ‘चूर्ण’, तर चाळणीत जो चाळ रहातो, त्याला ‘यवकुट चूर्ण’ किंवा ‘भरड’ म्हणतात. चूर्ण पोटात घेण्यासाठी किंवा लेपासाठी, तर भरड काढ्यासाठी वापरता येते. सर्व चूर्ण एकत्र भरून ठेवण्यापेक्षा साधारण १५ चमचे चूर्णाच्या लहान लहान पिशव्या भराव्यात. प्रत्येक पिशवीवर चूर्णाचे नाव आणि उत्पादन दिनांक लिहून त्या सीलबंद करून हवाबंद डब्यात ठेवाव्यात. असे केल्याने चूर्ण जास्त सुरक्षित रहाते.

७. वनस्पती गोळा करतांना मिळणार्‍या बियाण्यापासून त्यांची लागवडही करा !

काही वनस्पती निसर्गतः अधिक प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी त्यांची लागवड करणेही इष्ट ठरते. लागवड केल्याने आपल्या आवश्यकतेनुसार पाहिजे त्या वेळी वनस्पती उपलब्ध होऊ शकते. औषधी वनस्पती गोळा करतांना त्या वनस्पतीचे बियाणेही वेगळे काढून ठेवावे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी या वनस्पतींची आपल्या परसात किंवा शेतात लागवड करावी. कोणत्या वनस्पतींची लागवड करायची, हे पुढे त्या त्या वनस्पतीच्या माहितीत दिले आहे.

८. रस्त्यातून येता-जाता दिसणार्‍या वनस्पतींचे निरीक्षण करण्याची सवय लावा !

आपण येता-जाता अनेक वनस्पती पहात असतो; परंतु त्या औषधी वनस्पती आहेत, हे आपल्याला ठाऊक नसते. या लेखात दिलेल्या वनस्पती सर्वत्र आढळणार्‍या आहेत. या वनस्पती रस्त्यात येता-जाताही सहज ओळखता येतील, अशा आहेत. या, तसेच अन्यही वनस्पतींचे निरीक्षण करण्याची आणि त्यांची ओळख करून घेण्याची आपण स्वतःला सवय लावून घेतली, तर भीषण आपत्काळात आपल्याला त्यांचा वापर करता येऊ शकेल.

९. वनस्पतींची माहिती वाचतांना उपयुक्त अशा काही सामाईक सूचना

अ. पुढे दिलेल्या वनस्पतींच्या माहितीमध्ये वनस्पतीचे लॅटिन नाव आणि कुळही दिले आहे. या आधुनिक वनस्पतीशास्त्रातील संज्ञा आहेत. यांद्वारे आंतरजालावर (इंटरनेटवर) या वनस्पतीसंबंधी अधिक माहिती शोधणे सोपे जाते.

आ. आरंभी औषधी वनस्पतींचे उपयोग दिले आहेत. प्रौढ व्यक्तींसाठी वनस्पतींचे चूर्ण इत्यादी साधारणपणे किती प्रमाणात वापरावे, हे त्याच्या पुढच्या उपसूत्रात दिले आहे. ३ ते ७ या वयोगटासाठी प्रौढ मात्रेच्या पाव प्रमाणात, तर ८ ते १४ या वयोगटासाठी प्रौढ मात्रेच्या अर्ध्या प्रमाणात औषध घ्यावे.

इ. औषधाच्या उपयुक्ततेनुसार ४ जणांच्या कुटुंबासाठी ताजी (वाळलेली नव्हे !) वनस्पती किती प्रमाणात गोळा करावी, हे येथे दिले आहे. हे केवळ दिशादर्शक अनुमान असून प्रत्येकाने आपापल्या आवश्यकतेनुसार वनस्पतींचा संग्रह करावा.

ई. जिथे औषधाचे प्रमाण चमच्यांमध्ये दिले आहे, तिथे मध्यम आकाराचा चमचा घ्यावा.

१०. पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवणार्‍या आणि त्यानंतर वाळून जाणार्‍या औषधी वनस्पती

१० अ. कुरडू

१० अ १. पर्यायी मराठी नावे : कुर्डू, हरळू

१० अ २. संस्कृत नाव : शितिवार

१० अ ३. लॅटिन नाव : Celosia argentea

१० अ ४. कुळ : Amaranthaceae

कुरडूचे रोप
कुरडूचा तुरा (फूल)

१० अ ५. उपयोग

अ. औषधी उपयोग

१. ही वनस्पती सर्व प्रकृतीच्या लोकांना मानवणारी आणि कोणताही अपाय न करणारी आहे.

२. मूतखडा आणि लघवीच्या समस्या यांवर हे नामी औषध आहे. मूतखड्यावर बी जास्त उपयुक्त आहे. मूतखड्यासाठी, तसेच अडलेली लघवी सुटण्यासाठी १ चमचा खडीसाखरेसह १ चमचा बी खावे.

३. ही वनस्पती थंड गुणधर्माची असून शरिरात कोणत्याही कारणाने वाढलेली उष्णता न्यून करणारी आहे. गोवर, कांजिण्या, नागीण यांसारख्या विकारांमुळे शरिरात निर्माण झालेली उष्णता, अ‍ॅलोपॅथी औषधांमुळे होणारी उष्णता, डोळे येणे, तोंडवळ्यावर मुरुमे येणे, अंगावर पुळ्या येणे, रक्ती मूळव्याध, मासिक पाळीच्या किंवा अन्य वेळी योनीमार्गातून जास्त रक्तस्राव होणे, लघवीची जळजळ होणे, तसेच चक्कर येणे यांसारख्या उष्णतेच्या विकारांत अतिशय उपयुक्त आहे.

४. ही रक्त (हिमोग्लोबिन) वाढवणारी आणि थकवा दूर करणारी आहे. हिच्यात लोह, चुना (कॅल्शियम), यशद (झिंक), पालाश (पोटॅशियम) इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हिची भाजी आहारात ठेवावी.

५. डोळ्यांचे विकार, अतीसार (जुलाब), अंगावर (योनीमार्गाद्वारे) पांढरे जाणे, त्वचा विकार, तसेच व्रण भरून येण्यासाठी पंचांगाचे चूर्ण पोटात घ्यावे.

६. धातूपुष्टतेसाठी (वीर्यवृद्धीसाठी) १ चमचा बी १ वाटी दूध आणि २ चमचे तूप यांसह घ्यावे.

७. भांग आणि गांजा यांच्यावर उतारा म्हणून या वनस्पतीची मुळे थंड पाण्यात उगाळून देतात.

८. रुग्णाईत स्थितीतून बाहेर आल्यावर (आजारपणातून उठल्यावर) अंघोळीचे पाणी गरम करतांना त्या पाण्यात ही वनस्पती घालावी आणि हे पाणी गरम झाल्यावर गाळून घेऊन त्याने अंघोळ करावी.

आ. आहारातील उपयोग

१. हिच्या कोवळ्या पानांची भाजी रुचकर आणि पौष्टिक असते. आपत्काळात अन्नधान्याच्या अभावी आहार म्हणून हिचा वापर करता येऊ शकतो.

२. बियांपासून खाद्य तेल काढले जाऊ शकते.

१० अ ६. वनस्पती ओळखण्याची खूण : पावसाळ्याच्या शेवटी रस्त्याच्या कडेला, तसेच माळरानांवर ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. कंबरेपर्यंत उंच वाढणार्‍या या वनस्पतीच्या शेंड्यावर पांढर्‍या अन् गुलाबी रंगाचे शंकूच्या आकारातील तुरे असतात. (छायाचित्र पहा.) या तुर्‍यांत काळ्या रंगाचे मोहरीपेक्षा लहान आकाराचे बी असते. ही माठाच्या (‘माठ’ नावाच्या भाजीच्या) कुळातील वनस्पती आहे.

१० अ ७. गोळा करण्याचे भाग

अ. साधारण ५ किलो मुळासकट पूर्ण वनस्पती गोळा करून तिचे चूर्ण करून ठेवावे.

आ. पोतेभर तुरे गोळा करावेत. तुरे गोळा करण्यापूर्वी काही तुरे हातांनी चुरगळून त्यातील बी परिपक्व झाले आहे ना, याची निश्‍चिती करावी. परिपक्व बी काळ्या रंगाचे असते. तुरे काढल्यावर ते न धुता उन्हात वाळवून हातांनी चुरगळून किंवा काठीने झोडपून त्यांच्यातील बी गोळा करून ठेवावे. आवश्यक वाटल्यास बी धुवून उन्हात वाळवून ठेवू शकतो.

इ. बी काढल्यावर राहिलेला तुर्‍यांचा चुरा वेगळा काढून ठेवावा आणि अंघोळीच्या पाण्यात घालून वापरावा.

१० अ ८. मात्रा

अ. १ चमचा पंचांग चूर्ण (पूर्ण वनस्पतीचे चूर्ण) दिवसातून २ – ३ वेळा वाटीभर पाण्यात मिसळून घ्यावे.

आ. १ चमचा बी वाटीभर पाण्यासह घ्यावे.

इ. उपलब्ध असेल, तेव्हा हिच्या पानांची भाजी आहारात ठेवावी.

१० अ ९. लागवड : ‘ही वनस्पती नेहमी उपलब्ध होण्यासाठी आपल्या परसात किंवा गच्चीवरील बागेत हिची लागवड करता येते. हिचे बी रुजत घातल्यापासून ५ ते ७ दिवसांत रुजून येते. ३० ते ४० दिवसांत उत्तम पालेभाजी मिळते. ८० ते ९० दिवसांमध्ये बी परिपक्व होते. कोवळी पाने खुडत राहिल्यास बी उशिरा मिळते. पालेभाजीसाठी या वनस्पतीची लागवड करायची असल्यास चांगले खतपाणी दिल्यास चांगल्या प्रतीची पाने मिळतात. १०  × १० मीटरच्या परिसरात लागवड केल्यास एका वेळी १० ते १५ किलो पालेभाजी मिळते.

१० अ १०. वनस्पती कुणी वापरू नये ? : या वनस्पतीच्या बिया पोटात घेतल्यावर डोळ्यांच्या बाहुल्या काही प्रमाणात विस्फारित होतात. त्यामुळे ज्यांना काचबिंदूचा (ग्लॉकोमाचा) त्रास आहे, त्यांनी याचे बी घेऊ नये.’

(संदर्भ : http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Celosia+argentea (१६.११.२०२०))

१० आ. टाकळा

१० आ १. पर्यायी मराठी नावे : तरोटा, टाकळी, टायकिळा

१० आ २. संस्कृत नावे : चक्रमर्द, एडगज

१० आ ३. लॅटिन नावे : Senna tora, Senna obtusifolia

१० आ ४. कुळ : Fabaceae

टाकळ्याचे रोप आणि त्यावरील शेंगा

१० आ ५. उपयोग

अ. औषधी उपयोग

१. याचे संस्कृत नाव ‘चक्रमर्द’ आहे. ‘चक्र’ म्हणजे ‘गजकर्ण’. ते ‘मर्द’ म्हणजे नष्ट करणारी वनस्पती म्हणून हिला ‘चक्रमर्द’ म्हणतात. खरूज, नायटा, गजकर्ण या बुरशीजन्य त्वचाविकारांमध्ये (फंगल इन्फेक्शनमध्ये) याचा रस दिवसातून ३ – ४ वेळा त्वचेवर चोळल्यास हे विकार बरे होतात.

२. ‘टाकळ्याचा रस अंगाला (विशेषतः पोट, कुल्ले, स्तन, गळा या भागांवर) चोळल्याने किंवा पंचांगाचे (पूर्ण वनस्पतीचे) चूर्ण उटण्याप्रमाणे अंगाला रगडल्याने अनावश्यक मेद (चरबी) न्यून होऊन शरीर सुडौल बनते. अधिक लाभासाठी प्रतिदिन सूर्यनमस्कार घालावेत.

३. टाकळ्याचा रस आणि बेसन हे मिश्रण त्वचेवर चोळून लावावे. यामुळे त्वचा सुकुमार आणि कांतीमान होते. अनावश्यक तेलकटपणा, काळपटपणा, सैलपणा अल्प होतो. रसाच्या अभावी टाकळ्याचे चूर्ण आणि बेसन यांचे मिश्रण वापरावे.

४. जंत होण्याची प्रवृत्ती असणार्‍यांनी २ चमचे टाकळ्याचे बी चावून खावे आणि एक घंट्याने २ चमचे एरंडेल पिऊन त्यावर अर्धी वाटी गरम पाणी प्यावे. याने जंत पडून जातात.

५. पुष्कळ खोकला येणे, छातीत कफ वाजत रहाणे, दम लागणे, अंग जड लागणे, ग्लानी रहाणे या अवस्थेत टाकळ्याच्या बियांचे २ चमचे चूर्ण ४ कप पाण्यात उकळून १ कप काढा करावा. काढा करतांना त्यात तुळशीची २ पाने आणि मिर्‍यांचे २ दाणे ठेचून घालावे. हा काढा गरम असतांना घोट घोट प्यावा. याने पांढरट, फेसकट कफ पडून जातो.

६. अंगावर पांढरे डाग दिसणे, अंगास कंड येणे, वारंवार सर्दी, खोकला येणे, ही लक्षणे असतांना टाकळ्याच्या पानांची भाजी आणि भाजणीची भाकरी खावी.

७. टाकळ्याचे तेल : टाकळ्याचा रस १ लिटर, गोमूत्र २ लिटर, हळद चूर्ण २५ ग्रॅम, ज्येष्ठमध चूर्ण २५ ग्रॅम आणि तिळाचे तेल १ लिटर हे सर्व घटक एकत्र करून केवळ तेल शेष राहीपर्यंत मंद आचेवर उकळावे. तेल थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे आणि त्यात २ ग्रॅम ‘ओव्याचे फूल’ बारीक पूड करून घालून बाटलीचे झाकण घट्ट लावावे अन् बाटली हालवून ओव्याचे फूल तेलात विरघळू द्यावे. (ओव्याचे फूल आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानात मिळते. ते न मिळाल्यास त्याऐवजी तेवढाच भीमसेनी कापूर वापरावा.) हे तेल बाह्योपचारासाठी वापरावे.

अ. सर्व प्रकारच्या त्वचाविकारांत, विशेषतः ज्या त्वचाविकारांत लस जास्त वहाणे, ओलसरपणा आणि खाज ही लक्षणे असतील, त्या विकारांत हे अतिशय उपयुक्त आहे.

आ. योनीमार्गाची खाज, तसेच त्याच्यातून येणारा चिकट स्राव यांमध्ये या तेलात कापसाचा बोळा बुडवून तो रात्री झोपतांना योनीमार्गात ठेवावा.

इ. आग, गरम पाणी, वाफ, विजेचा धक्का इत्यादींमुळे भाजून झालेल्या व्रणांमध्ये हे तेल अप्रतिम लाभदायक आहे. भाजलेल्या जागी पाणी लागू देऊ नये.

ई. खरचटणे, खोक पडणे इत्यादी या व्रणांच्या (जखमांच्या) प्रकारात हे तेल लावल्याने लाभ होतो.

उ. मेदाचे प्रमाण अल्प करण्यासाठी या तेलाने मर्दन (मालीश) करावे.’

(संदर्भ : आहार रहस्य (भाग ३ आणि ४), लेखक : वैद्य रमेश मधुसूदन नानल)

आ. आहारातील उपयोग

१. बिया भाजून केलेली पूड कॉफीचा पर्याय म्हणून वापरता येते. हिची चव हुबेहुब कॉफीप्रमाणे लागते. कॉफीमुळे होणारे दुष्परिणाम या पुडीमुळे होत नाहीत. ही पूड कफ आणि श्‍वसनसंस्थेचे विकार न्यून करणारी आहे. त्यामुळे चहा किंवा कॉफी यांच्याऐवजी टाकळ्याच्या बीचे चूर्ण वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.

२. कोवळ्या पानांची भाजी चांगली होते. आपत्काळात अन्नधान्याच्या अभावी आहार म्हणून हिचा वापर करता येऊ शकतो.

१० आ ६. वनस्पती ओळखण्याची खूण : ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे. पावसाळ्यात मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला ही झाडे उगवतात. यांच्या कोवळ्या पानांची भाजी करून खातात. ही झाडे कंबरेएवढी उंच होतात. यांना पिवळ्या रंगाची फुले असतात. या झाडांना विळ्याप्रमाणे साधारण अर्धवर्तुळाकृती शेंगा येतात. पावसाळ्यानंतर या शेंगा वाळून मातकट रंगाच्या होतात. या शेंगांमध्ये मेथीच्या दाण्यांप्रमाणे बिया असतात.

१० आ ७. गोळा करण्याचे भाग आणि बनणारी औषधे

अ. साधारण २ किलो मुळासकट पूर्ण वनस्पती गोळा करून तिचे चूर्ण करून ठेवावे. याचा उपयोग बाह्य उपचारांसाठी करावा.

आ. झाडावरील वाळत आलेल्या शेंगा कात्रीने अलगद कापून गोळा कराव्यात. शेंगा हालवल्यास त्यांच्यातील बी सांडू शकते. साधारण २ ते ४ किलो (किंवा वर्षभरात आपल्याला जेवढी चहा किंवा कॉफी यांची पूड लागते तेवढे किलो) शेंगा गोळा करून उन्हात चांगल्या वाळवाव्यात आणि त्यांच्यातील बी वेगळे काढावे. शेंगांची टरफले टाकून द्यावीत आणि बी उन्हात नीट वाळवावे. वाळलेले बी कढईत मंद आचेवर भाजून ते थंड होत आल्यावर याचे चूर्ण बनवून ठेवावे.

इ. तेल बनवायचे असल्यास पुरेसा रस येईल, एवढी मुळासकट पूर्ण वनस्पती गोळा करावी. पावसाळ्यात पाने ताजी असतांना जास्त रस निघतो. पावसाळा संपल्यावर वनस्पती वाळत असल्याने थोडे अधिक पाणी घालून रस काढावा.

१० आ ८. मात्रा : बियांचे चूर्ण १ ते २ चमचे (कॉफी बनवण्याच्या प्रमाणानुसार)

१० आ ९. लागवड : लागवड करण्याची आवश्यता नसते. निसर्गात पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळते; परंतु काही देशांमध्ये बियांसाठी या वनस्पतीची लागवड केली जाते. लागवड करायची असल्यास एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये टाकळ्याचे वाळलेले बी घालावे आणि ते तसेच १२ घंटे भिजू द्यावे. त्यानंतर ते रुजत घालावे. असे केल्याने बी रुजून येण्याचे प्रमाण वाढते.

१० आ १०. वनस्पती कुणी वापरू नये ?

अ. टाकळ्याचे बी एका वेळी अतीप्रमाणात वापरू नये. याने उलट्या किंवा अतीसार (जुलाब) होऊ शकतो.

आ. काही ठिकाणी टाकळ्याच्या बीचे तेल काढतात; परंतु ते आहारात वापरू नये. याने आतड्यांना हानी पोचून विविध विकार उत्पन्न होऊ शकतात.

इ. टाकळ्याची जुनी पाने पचण्यास जड असल्याने ती खाऊ नयेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२०)

वनस्पती गोळा करण्याची सेवा एकमेकांमध्ये योग्य समन्वय साधून नियोजनपूर्वक आणि तातडीने पूर्ण करा !

साधकांनी आपण कोणत्या वनस्पती किती प्रमाणात गोळा केल्या आहेत, याची एकत्रित नोंद ठेवावी. यामुळे एखाद्याला एखादे औषध हवे असल्यास ते मिळवून देणे सोपे जाईल. एखाद्या केंद्रात काही वनस्पती अधिक प्रमाणात मिळाल्यास त्या ज्या केंद्रांना आवश्यकता आहे, अशा शेजारील केंद्रांतील साधकांना पाठवता येऊ शकतील. ज्यांना शक्य आहे, त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी औषधी वनस्पती गोळा करत असतांनाच केंद्रातील जे साधक औषधी वनस्पती गोळा करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी किंवा जवळचे आश्रम किंवा सेवाकेंद्र यांच्यासाठी वनस्पती गोळा कराव्यात. असे करण्यापूर्वी उत्तरदायी साधकांशी बोलून घ्यावे, म्हणजे औषधांच्या प्रमाणाविषयी समन्वय साधणे सोपे जाईल. शहरांमध्ये या वनस्पती मिळतीलच असे नाही. अशा वेळी शहरांच्या जवळच्या गावात जाऊन या वनस्पती आणता येतील किंवा गावांत आपले कुणी परिचित रहात असतील, तर त्यांना हा लेख पाठवून आपल्यासाठी औषधी वनस्पतींचा संग्रह करण्यास सांगता येईल.