नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या  

नागपूर, ४ जून (वार्ता.) – मूळची मध्यप्रदेशातील असणारी आणि नागपूर येथे ‘नीट’ (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) परीक्षेची सिद्धता करणारी विद्यार्थिनी कु. आकांक्षा चतुर्वेदी (वय १८ वर्षे) हिने २० मे या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीचे अन् गैरव्यवहाराचे सत्र, तसेच प्रशासनाने परीक्षा रहित केल्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

वडिलांनी कर्ज काढून केले होते साहाय्य !

आकांक्षा हिचे वडील कृष्णकुमार चौबे हे मध्यप्रदेशातील मऊगंज येथे अल्पभूधारक शेतकरी आहेत. स्वत:च्या कन्येला आधुनिक वैद्या (डॉक्टर) बनवण्यासाठी त्यांनी ‘किसान क्रेडिट कार्ड’द्वारे ३ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. एवढेच नव्हे, तर नागपूर येथील शिकवणीवर्गाचा खर्च भागवण्यासाठी तिचे वडील स्वतः नागपूर येथे आचार्‍याचे काम करत होते. आकांक्षाला परीक्षेत ६५० हून अधिक गुण मिळण्याची निश्चिती होती; मात्र भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेमुळे तिचा हा आनंद अल्पजीवी ठरला. आकांक्षाच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीत तिने, ‘आई आणि बाबा तुमची मुलगी मनापासून अभ्यास करून १ दिवस आधुनिक वैद्य बनेल, असा विश्वास तुम्हाला होता; पण आता माझ्यामध्ये पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत नाही, मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. पहिल्या प्रयत्नात मला चांगले गुण मिळत होते; पण आता पुन्हा चांगली कामगिरी करता येईलच, याची कोणतीही निश्चिती नाही. मला क्षमा करा आई बाबा’, अशी भावना व्यक्त केली आहे.

आकांक्षाचे काका जगदीश चतुर्वेदी म्हणाले की, परीक्षा देऊन जेव्हा आकांक्षा घरी परतली, तेव्हा तिचा आत्मविश्वास गगनात मावेनासा होता. परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याच्या आणि गैरव्यवहाराच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने जेवण-खाणे सोडले, ती कुणाशीही अधिक बोलत नव्हीत. सतत तणावाखाली असायची; पण या सगळ्याचा शेवट इतका भयानक होईल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती.

संपादकीय भूमिका

  • सध्याची शिक्षणपद्धती आणि परीक्षा यंत्रणा पूर्णपणे पोखरलेली आहे. प्रश्नपत्रिका फोडणे, भ्रष्टाचार आणि वारंवार पालटणारे निर्णय यांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. केवळ भौतिक शिक्षणामागे धावल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रसंगांचा सामना करण्याची क्षमता उरलेली नाही. सरकारने हे चित्र पालटण्याची आवश्यकता आहे !
  • अपयश किंवा तणावाच्या स्थितीत आत्महत्या करण्याऐवजी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचे आत्मबळ साधनेमुळेच निर्माण होते !