India Pakistan Ceasefire : (म्हणे) ‘भारत-पाक संघर्षामध्ये आम्ही मध्यस्थी केली !’ – चीनचा दावा

भारताने दावा फेटाळला !

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

बीजिंग (चीन) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकसमेवत चालू असलेल्या संघर्षात मध्यस्थी करून तो थांबवल्याचा दावा यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला; मात्र भारताने तो नेहमीच फेटाळला आहे. आता जवळपास ७ महिन्यांनंतर चीननेही या संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. भारताने चीनचा दावाही पूर्णपणे फेटाळून लावला असून शस्त्रविरामाच्या निर्णयामध्ये कोणत्याही तिसर्‍या पक्षाचा हस्तक्षेप नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर १० मे या दिवशी दोन्ही देशांच्या सैन्याधिकार्‍यांमध्ये थेट चर्चा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घोषित करण्यात आला, असे भारताकडून वारंवार सांगण्यात आले आहे. भारताने आताही म्हटले की, आम्ही यापूर्वीच असे दावे फेटाळले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय सूत्रावर तिसर्‍या पक्षाची कसलीही भूमिका नाही. दोन देशांच्या सैन्याधिकार्‍यांमध्ये झालेल्या थेट चर्चेनंतर युद्धविरामावर एकमत झाले, ही आमची भूमिका यापूर्वीही अनेकदा स्पष्ट करण्यात आलेली आहे.

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला दावा

भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी चीनने मध्यस्थी केल्याचा दावा चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी चीनच्या परराष्ट्र संबंधांवरील परिसंवादात बोलतांना केला. ते म्हणाले की,  जगात संघर्ष आणि अस्थिरता यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक वस्तूनिष्ठ आणि तर्कसंगत दृष्टीकोन स्वीकारला आहे. संघर्षाचे प्रश्न सोडवण्यासाठी चीनच्या या दृष्टीकोनाचा अवलंब करून आम्ही उत्तर म्यानमार, इराणचा आण्विक प्रश्न, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव यासारखे प्रश्न सोडवले. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील समस्या आणि कंबोडिया आणि थायलंडमधील संघर्षात मध्यस्थी केली.

संपादकीय भूमिका

७ मासांनंतर चीनला आता याविषयी जाग कशी आली ? इतके महिने चीन झोपला होता का ? कि ट्रम्प यांचा श्रेय लाटण्याचा आजार चीनलाही झाला आहे ?