बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !

ढाका (बांगलादेश) – बंगालच्या बांगलादेशाच्या सीमेवरील जयंतीपूर चौकी येथून सीमा सुरक्षा दलाने १० ते १२ घुसखोर बांगलादेशींना सीमेपलीकडे ढकलले होते; मात्र विरोधामुळे त्यांना परत आणावे लागले आहे. या घटनेच्या एक दिवसानंतर ‘बॉर्डर गार्ड बांगलादेशा’च्या (‘बीजीबी’च्या) विरोधामुळे भारतीय अर्धसैनिक दलाच्या स्थानिक तुकडीला त्या लोकांना परत आणावे लागले आहे.

बॉर्डर गार्ड बांगलादेशाचे म्हणणे आहे की, ७ मे २०२५ ते २६ जानेवारी २०२६ पर्यंत, म्हणजेच ८ महिन्यांत भारताकडून २ सहस्र ४७९ बांगलादेशी लोकांना बांगलादेशात पाठवण्यात आले. यांपैकी किमान १२० जणांची ओळख नंतर भारतीय नागरिक म्हणून झाली, तर काही रोहिंग्या शरणार्थी होते. बांगलादेशाने अशा घटनांचा कडाडून निषेध केला आहे.

बांगलादेशाच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा ओबैद यांनी नुकतेच म्हटले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत लोकांना अशा प्रकारे सीमापार ढकलले जाणे स्वीकारणार नाही.

बांगलादेश आणि भारत यांच्यात महासंचालक स्तरीय चर्चा

८ ते ११ जून या काळात नवी देहलीमध्ये बीजीबी आणि सीमा सुरक्षा दल यांच्यात   महासंचालक स्तरावरील बैठक होणार आहे. बांगलादेशात नवीन सरकार आल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत बांगलादेशाकडून सीमापार ढकलल्या जाणार्‍या बांगलादेशींचे सूत्र उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.