डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !

  • मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील धक्कादायक घटना

  • अन्वेषण करण्याचा मुख्य आरोग्य अधिकार्‍यांचा आदेश

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – एका १४ वर्षीय मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलीच्या पायावर शस्त्रक्रिया केल्यानंतर उर्वरित रक्कम न मिळाल्याने डॉक्टरांनी तिचा गुडघा बलपूर्वक वाकवून हाड पुन्हा मोडल्याचा आरोप मुलीच्या आईने केला. या प्रकरणी मुलीच्या आईने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असून मुख्य आरोग्य अधिकार्‍यांनी प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे.

मुलीची आई म्हणाली, ‘‘दीड मासांपूर्वी सरकारी रुग्णालयात माझ्या मुलीच्या उजव्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेसाठी माझ्याकडे २५ सहस्र रुपयांची मागणी करण्यात आली. रुग्णालयाच्या प्रशासनाला मी विधवा असल्याचे सांगून एवढी रक्कम भरू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी मुलीवर उपचार करण्यास नकार दिला. यावर मी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली. जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित रुग्णालयाला मुलीवर विनामूल्य उपचार करण्याचा आदेश दिला. तरीही तेथील डॉक्टरांनी माझ्याकडून ८ सहस्र रुपये घेऊन मुलीच्या पायावर शस्त्रक्रिया केली आणि ‘उर्वरित रक्कम नंतर द्यावी लागेल’, असे सांगितले. तसेच काही दिवसांनंतर मुलीला तपासणीसाठी पुन्हा घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार काही दिवसांनंतर मी मुलीला घेऊन शस्त्रक्रिया करणारे डॉ. चतुर्वेदी यांच्याकडे गेले असता त्यांनी मुलीचा गुडघा बलपूर्वक वाकवला. यावर मुलगी वेदनेने जोरात ओरडली. यानंतर तिच्या पायाचा एक्स-रे काढला असता त्यामध्ये पायाचे हाड मोडल्याचे दिसून आले. यावर मी वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली; पण कुणीही माझे ऐकले नाही.’’

गांभीर्याने अन्वेषण करणार ! – मुख्य आरोग्य अधिकारी

यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुजफ्फरनगरचे मुख्य आरोग्य अधिकारी सुनील तेवतिया म्हणाले, ‘‘या प्रकरणी दोन्ही (डॉक्टर आणि रुग्ण) बाजू ऐकून घेतल्याविना काहीही सांगू शकणार नाही. तथापि या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्याने अन्वेषण केले जाईल. जर अन्वेषणात संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर किंवा कर्मचारी दोषी आढळले, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल.’’

संपादकीय भूमिका

‘अशा डॉक्टरांना डॉक्टर म्हणायचे कि कसाई ? सरकारने याचे अन्वेषण करून अशांचे डॉक्टरकीचे प्रमाणपत्र रहित करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !