Rahul Kaul MahaAbhiyan Ahvan : काश्मिरी हिंदूंच्या ३५ वर्षांच्या संघर्षातील सर्वांत निर्णायक चळवळ !

‘यूथ फॉर पनून कश्मीर’ची पत्रकार परिषदेतून ‘महाअभियान आव्हान २०२६’ची घोषणा

जम्मू : ३५ वर्षे होत आली, तरी काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मूळ भूमीत, म्हणजेच काश्मीर खोर्‍यात सुरक्षित पुनर्वसन होऊ शकलेले नाही. यामुळे ‘यूथ फॉर पनून कश्मीर’ या संघटनेने पुढील पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे.

पत्रकार परिषदेत संबोधित करतांना राहुल कौल आणि इतर

संघटनेच्या शीर्ष समितीचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी सांगितले की, १६ जानेवारी २०२६ पासून ‘महाअभियान आव्हान २०२६’ चालू होईल. निर्वासित काश्मिरी हिंदूंच्या ३५ वर्षांच्या संघर्षातील ही सर्वांत निर्णायक चळवळ असेल, अशी माहिती श्री. कौल यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. १९ नोव्हेंबरला जम्मूत संघटनेकडून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कौल बोलत होते.

१. कौल पुढे म्हणाले की, महाअभियान म्हणजे ‘नरसंहारामुळे मायभूमीतून उखडलेल्या परंतु आत्म्याने या भूमीशी जोडलेल्या लोकांचे ठाम पुनरुत्थान.’ भारत सरकारने आतातरी विस्थापित हिंदूंशी गांभीर्याने, तातडीने आणि घटनात्मक दायित्वाने संवाद साधावा.

२. संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी म्हणाले की, ही चळवळ साडेतीन दशकांपासून आपल्या हृदयात आग धगधगती ठेवणार्‍या समुदायाचा एकसंधपणा असणार आहे.

३. ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे सरचिटणीस दिगंबर रैना यांनी स्पष्ट केले की, जम्मूतील ‘जगती नरसंहार बचाव शिबिरा’पासून चालू होणारी ही चळवळ पुरखू, मुठी, नगरोटा आणि त्यापलीकडील हिंदूंना संघटित करणारी आहे.

४. संघटनेचे सचिव राजेश कचरू यांनी सांगितले की, हिंदूंचा नरसंहार नाकारता येत नाही, त्याविषयी वाटाघाटी करता येणार नाहीत कि हा विषय सौम्य करता येणार नाही. त्यास मान्यता देऊन हिंदूंना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाच्या ठोस कार्ययोजनेची आवश्यकता आहे.

५. या वेळी समन्वयक साहिल पंडिता, तसेच निर्वासित छावण्यांमधील प्रमुख प्रतिनिधी पिंटू जी पंडिता, विजय पंडिता, अनिल भान आणि अश्वनी भट हेही उपस्थित होते.

‘यूथ फॉर पनून कश्मीर’चा भारत सरकारला स्पष्ट संदेश !

संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, ‘महाअभियान आव्हान २०२६’ हा भारत सरकारला एक स्पष्ट संदेश आहे की, जर काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मायभूमीत औपचारिक पुनर्वसन करण्याची दीर्घकाळापासून प्रलंबित प्रक्रिया त्वरित चालू झाली नाही, तर न्याय, प्रतिष्ठा आणि योग्य परतफेडीच्या संघर्षात महाअभियान वेगवेगळ्या अन् अधिक ठाम परिमाणांमध्ये विकसित होईल.