‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन

सिंधुदुर्ग – वीज वापराची तासागणिक माहिती भ्रमणभाषवर उपलब्ध होणे, अचूक देयक, वीज बचतीला चालना आणि शॉर्टसर्किटसारख्या प्रसंगी आपोआप वीजपुरवठा खंडित करून सुरक्षितता वाढवणे, अशा अनेक सुविधांमुळे ‘स्मार्ट मीटर’ ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत आहे. स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नसून ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नाही. या मीटरमध्ये केवळ वीज वापराची डिजिटल नोंद केली जाते. स्मार्ट मीटरविषयी पसरवल्या जाणार्‍या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत भोसले बोलत होते. या वेळी महावितरणच्या कुडाळ विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमारे उपस्थित होते.

विश्वजित भोसले यांनी दिलेली माहिती

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ सहस्र ३५२ सरकारी कार्यालयांपैकी ७ सहस्र ८५३ कार्यालयांमध्ये (९३.७९ टक्के) स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, तसेच जिल्ह्यातील ४ लाख ग्राहकांपैकी १ लाख ग्राहकांकडेही स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.

२. या मीटरमधील नोंदींमुळे वापरलेल्या विजेचे अचूक देयक तयार होते आणि मानवी चुकीची शक्यता न्यून होते. प्रत्येक तासाचा वीज वापर भ्रमणभाषवर पहाता येत असल्याने ग्राहकांना विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवून बचत करणे शक्य होते.

३. घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ८५ पैशांची सवलत दिली जात आहे, तसेच घरामध्ये शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाड झाल्यास स्मार्ट मीटर आपोआप वीजपुरवठा बंद करतो. त्यामुळे संभाव्य जीवित आणि वित्त हानी टाळण्यास साहाय्य होत.

४. १ जून ते १३ जुलै २०२६ या कालावधीत वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणेची मोठी हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत महावितरणची सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांची हानी झाली आहे.