अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्‍या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद

वाळपई, १५ जुलै (वार्ता.) – म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेशबंदी असलेल्या जाळवणे धबधब्याकडे अनुमतीविना जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५ विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वन खात्याच्या माहितीनुसार हे विद्यार्थी अनुमती न घेता जाळवणे धबधब्याकडे गेले होते. दाट जंगलात ते मार्ग चुकल्याची माहिती मिळताच १९२६ या वन खात्याच्या हेल्पलाईनद्वारे त्यांचा शोध घेऊन त्यांना वाचवण्याची मोहीम त्वरित चालू करण्यात आली. वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी अनेक घंटे शोध घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना शोधून सुरक्षितरित्या बाहेर काढले. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत अनधिकृत प्रवेशाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जाळवणे धबधबा हा पर्यटकांसाठी नसून त्या परिसरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक अनुमती घेणे बंधनकारक आहे, असे वन खात्याने स्पष्ट केले आहे. सामाजिक माध्यमांतून हा धबधबा पर्यटनांसाठी असल्याच्या दिशाभूल करणार्‍या ‘पोस्ट’वर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन खात्याने केले आहे. वन्य जिवांचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता या दृष्टीने अभयारण्यातील नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी वन खात्याने दिली आहे.