Shankaracharya Avimukteshwarananda : बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर उमेदवार उभे करणार !

  • शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची घोषणा !

  • लवकरच बिहारमध्ये गोरक्षा संकल्प यात्रा प्रारंभ करणार !

  • गोहत्येविरुद्ध काम करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार !

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

पाटलीपुत्र (बिहार) : ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने ते लवकरच बिहारमध्ये ‘गोरक्षा संकल्प यात्रा’ चालू करणार आहेत. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, ते बिहार विधानसभा निवडणुकीत गोहत्येविरुद्ध काम करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या अपक्ष उमेदवारांनाही पाठिंबा देतील.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणाले की,

१. ७ दशके आणि अनेक आश्वासनांनंतरही कोणताही पक्ष गोहत्येविरुद्ध कारवाई करण्याचे वचन देत नाही. बिहार निवडणुकीत आम्ही गोरक्षण आणि सनातन धर्म यांसाठी मतदान करणार आहोत.

२. बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ, तसेच निवडणुकीत २४३ जागांवर उमेदवार उभे करू; पण त्यांची नावे आम्ही आताच उघड करणार नाही. आम्ही प्रत्येक मतदारसंघात किमान एक उमेदवार उभा करू, जो गोरक्षणासाठी समर्पित असेल.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की,

त्यांचा पक्ष गोरक्षणासाठी काम करतो आणि दुसरीकडे देशात गोमांसाची निर्यात वाढत आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे आहे.

– शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

३. आम्ही मतदारांना आता अशा उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करू, जे गोहत्या पाप मानतात आणि या देशातील हिंदूंच्या व्यापक भावनांशी सुसंगत राहून त्यांच्या संरक्षणासाठी काम करतात.