हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कालिदासदिन कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, १६ जुलै (वार्ता.) – हवामान खात्याने ५ जूनपासून, तर पंचांगात २२ जूनपासून पाऊस चालू होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात पंचांगाचा अंदाज खरा ठरला. ५ जून या दिवशी किरकोळ पाऊस पडला, तर २२ जूनपासून चालू झालेला पाऊस सातत्याने पडला. पंचांगामध्ये पर्यावरणाशी संबंधित गणित आणि ‘एल् निनो’ (समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक वाढणे.) यांविषयीही उल्लेख आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे दिली. पुराभिलेख विभागाच्या वतीने ‘कालिदासदिना’च्या निमित्ताने पणजी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी पुराभिलेख खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर आणि संचालक बालाजी शेणवी यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कवी कालिदास यांनी त्यांच्या मूळ श्लोकांमध्ये पावसाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. आज आपण पावसाची अनिश्चितता अनुभवत आहोत आणि भविष्यात हवामन संकट ही मोठी चिंता बनली आहे. ई-युगात (इलेक्ट्रॉनिक युगात) संस्कृत शिकणार्‍यांची संख्या उणावत असली, तरी आजही काही जण संस्कृत अध्ययनाचा ध्यास घेत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. संस्कृत भाषेचे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. नवोपक्रम, गणित आणि संशोधन क्षेत्र यांमधील संस्कृतचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे.’’

कार्यक्रमात ‘संस्कृत साहित्याची सूची’ या पुस्काचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

मठ आणि मंदिरे यांमधील हस्तलिखिते जतन करण्यासाठी ती पुराभिलेख विभागाकडे सोपवा !

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘मठ आणि मंदिरे यांमधील हस्तलिखिते जतन करण्यासाठी ती पुराभिलेख विभागाकडे सोपवावी. ही हस्तलिखिते संबंधितांची मालमत्ता राहील; मात्र त्यांचे संवर्धन आणि संशोधन यांसाठी उपयोग होणार आहे, अन्यथा ही अमूल्य परंपरा काळाच्या ओघात नष्ट होण्याचा धोका आहे. विभागाकडे अनुमाने ३ कोटी हस्तलिखिते  आहेत आणि त्यांपैकी ५० लक्ष हस्तलिखितांचे ‘डिजिटायझेशन’ झालेले आहे.’’