India Pakistan Conflict : (म्हणे) ‘आम्हाला हवे असते, तर आम्ही युद्ध चालू ठेवले असते !’ – पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार

पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांचा फुकाचा दावा

पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे युद्धात वर्चस्व होते. जर आम्हाला वाटले असते, तर आम्ही हे युद्ध चालू ठेवू शकलो असतो; पण युद्धविराम झाल्यामुळे आम्ही ते थांबवले. भारतीय सैनिकी तळ आणि दारूगोळा यांना लक्ष्य केल्यामुळे अंततः पाकिस्तान जिंकला आहे. मला वाटत नाही की, भारत आता हे सहन करू शकेल, असा फुकाचा दावा पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी अमेरिकेची वृत्तवाहिनी ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

पहलगामच्या आक्रमणात पाकचा हात नाही

अताउल्ला तरार पुढे म्हणाले की, पहलगाम येथील आक्रमणाच्या घटनेचा संबंध पाकिस्तानशी जोडण्यात भारत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आमच्या देशात आतंकवाद्यांचे कोणतेही तळ नाहीत; कारण पाकिस्तान स्वतः आतंकवादाचा सर्वांत मोठा बळी आहे. (याहून मोठा विनोद नाही ! जे संपूर्ण जगाला ठाऊक आहे, तरीही ते निर्लज्जपणे नाकारण्याचे काम केवळ पाकिस्तानच करू शकतो ! – संपादक)

(म्हणे) ‘सिंधु जल करार थांबवणे, युद्ध मानले जाईल !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

युद्धविरामानंतरही पाकचे परराष्ट्रमंत्री महंमद इशाक डार यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी देतांना म्हटले की, सिंधू जल करार थांबवणे ‘ॲक्ट ऑफ वॉर’ (युद्धाची कृती) समजले जाईल.’ ते एका अमेरिकी वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

पाककडून २० दिवसांत भारतावर १५ लाख सायबर आक्रमणे

पाकमधील ‘हॅकर्स’कडून (संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवणारे) २२ एप्रिलपासून आतापर्यंत भारताच्या सरकारी संकेतस्थळांवर १५ लाख सायबर आक्रमणे केल्याची माहिती समोर आली आहे. यांतील केवळ १५० आक्रमणांचा परिणाम झाला, असे सांगण्यात आले आहे. केवळ पाकचे नव्हे, तर बांगलादेश आणि मध्य-पूर्वेकडील इस्लामी देशांतूनही ही आक्रमण करण्यात आली आणि अजूनही करण्यात येत आहेत. यामध्ये एपीटी ३६ (पाकिस्तानस्थित), पाकिस्तान सायबर फोर्स, टीम इन्सेन पीके, मिस्ट्रियस बांगलादेश, इंडो हॅक्स सेक, सायबर ग्रुप एचओएक्स १३३७ आणि नॅशनल सायबर क्रू या सायबर आक्रमण करणार्‍या गटांचा समावेश आहे.

पाकचे ११ सैनिक ठार

भारताने पाकमध्ये केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकचे ३५ ते ४० सैनिक ठार झाल्याची माहिती भारतीय संरक्षण दलांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. आता पाकच्या सैन्याने या आक्रमणात त्याचे केवळ ११ सैनिक ठार झाल्याची माहिती दिली आहे. त्याच वेळी पाकमधील दैनिक ‘डॉन’च्या वृत्तानुसार पाकचे ४० सैनिक ठार, तर ७८ सैनिक घायाळ झाल्याचे म्हटले आहे. तसेच १२१ नागरिक घायाळ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ठार झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच घायाळांना १० ते २० लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाणार आहे.

पाकिस्तान प्रत्येक वर्षी १० मे या दिवशी उत्सव साजरा करणार

भारतावर कथित विजय मिळवल्यानिमित्त पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्येक वर्षी १० मे या दिवशी उत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. भारताच्या विरोधात राबवलेल्या कारवाईवरून त्यांनी ही घोषणा केली.

पाकला शस्त्र पाठवल्याचे वृत्त खोटे ! – चीनचा दावा

चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, चीनन पाकला मालवाहू नौकेद्वारे शस्त्रे पाठवल्याचे वृत्त  पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. इंटरनेट कायद्याच्या वर नाही. जो कुणी सैन्याशी संबंधित अफवा पसरवेल, त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

चीनने कितीही दावा केला, तरी ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार वर्ष २०२० ते २०२४ या काळात पाकने खरेदी केलेल्या शस्त्रांपैकी ८१ टक्के शस्त्रे चीनमधून आली आहेत. चीनने पाकिस्तानला लढाऊ विमाने, रडार, युद्धनौका, पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे विकली आहेत.

आम्ही भारत-पाक यांच्यातील अणूयुद्ध थांबवले ! – डॉनल्ड ट्रम्प यांचा दावा  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील अणूयुद्ध थांबवले आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणण्यास अमेरिकेने साहाय्य केले आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केला. ते म्हणाले की, मला निश्चिती आहे की, ही युद्धबंदी कायमस्वरूपी असेल. दोन्ही देशांमध्ये भरपूर अण्वस्त्रे आहेत, यामुळे भयंकर अणूयुद्ध होऊ शकले असते. लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकला असता. मी दोघांनाही सांगितले की, चला हे थांबवूया. जर तुम्ही हे थांबवले, तर आम्ही व्यापार करत आहोत. जर तुम्ही हे थांबवले नाही, तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही. लोकांनी माझ्यासारखा व्यापार कधीच केला नाही.

संपादकीय भूमिका

  • पाकची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि युद्ध पुन्हा चालू होऊन जगाच्या नकाशावरून त्याचे अस्तित्व नष्ट होईल !
  • मार खाल्ल्यानंतर सुधरणारा पाक नसल्याने भारतासमवेतच्या ४ युद्धांत दारूण पराभव झाल्यानंतर आणि आताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तोंडघशी पडल्यानंतरही त्याची खुमखुमी जिरलेली नाही, हे यातून लक्षात येते. त्यामुळे त्याला मुळासकट संपवणेच आता योग्य ठरणार आहे !