अयोध्येच्या श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाची प्रतिष्ठापना हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ४९२ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर वर्ष २०२४ मध्ये श्रीरामप्रभूंचे जन्मस्थान मोकळे झाले ! अनेक पिढ्यांच्या लढ्याला यश आले आणि आपण ‘श्रीराम दिवाळी’ साजरी केली ! खरेतर ‘श्रीराम’ हा विषय एखाद्या पुस्तकाचा होईल, एवढा मोठा आहे. त्यामुळे अगदी १-२ सूत्रे घेऊन श्रीरामांच्या विशेषत्वाचे विवेचन करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
रामायणातील बालकांडातील श्लोकात महर्षि वाल्मिकींनी वर्णिलेली नारदमुनींची महती !
रामायणाचा आरंभ ज्या बालकांडाने होतो, त्याचे ७७ सर्ग आहेत. रामायणाचा प्रारंभच अतिशय उदात्त अशा भावनेतून झाला आहे. त्यावरून पुढचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास सहज लक्षात येतो. ब्रह्मर्षि नारदमुनी आणि महर्षि वाल्मीकि यांच्या संवादातून हा काव्येतिहास पुढे कसा आकाराला येणार आहे ? ते कळू शकते. त्या संवादातून महर्षि वाल्मिकींची मनोधारणा किती उच्च प्रतीची आहे, ते प्रतीत होते. रामायणातील बालकांडातील पहिला श्लोकच पहा !
‘ॐ तपःस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरम् ।
नारदं परिपप्रच्छ वाल्मिकिर्मुनीपुङ्गवं ।।’
अर्थ : व्रत-नियमांमध्ये, वेदाध्ययनरूपी तपस्वाध्यायात तत्पर, विद्वत्ता आणि वक्तृत्व यात (ज्ञानींमध्ये) श्रेष्ठ अन् मुनींमध्ये वरिष्ठ अशा नारदमुनींना तपस्वी वाल्मिकींनी प्रश्न केला.

नारदमुनींची महती !
या पहिल्याच श्लोकात नारदमुनींची महती महर्षि वाल्मिकींनी सांगितली आहे. हल्लीच्या काळात काहींनी नारदमुनी यांची ‘कळलाव्या’ असे संबोधून प्रतिमा मलीन केली आहे. हा त्यांचा एकप्रकारे अवमानच आहे. चित्रपट, नाटक, मालिका आदींमधूनही त्यांचे तसेच चित्रण केले जाते. त्यामुळे ब्रह्मर्षि नारदमुनींचा अवमान होऊन त्यांना पाप लागते. भगवंताचे श्रेष्ठ भक्त असलेल्या नारदमुनींचे चरित्र समजून घ्यायचे असेल, तर ‘श्रीमद्भागवत’ वाचायला हवे. तिन्ही लोकांत संचार करणारे आणि सर्व ठिकाणची वृत्ते जवळ असणारे नारद म्हणजे आद्य पत्रकार होत. अत्यंत निरासक्त, प्रेमळ, निर्मळ, निर्लेप असे हे महामुनी आहेत. त्यांनी दुष्टांच्या निर्दालनासाठी प्रयत्न केलेले दिसतात, तसेच असुरांना सुधारण्यासाठी ते उपदेश करतांनाही दिसतात. हेच त्यांचे मोठेपण आहे. केवळ ‘नारायण-नारायण’ करत देवांचे गोडवे गाणारे स्तुतीपाठक इतकेच त्यांचे कार्य नव्हे, हे लक्षात घ्यावे.
महर्षींना अभिप्रेत असलेला सर्वगुणसंपन्न रामायणाचा नायक – अर्थात् श्रीराम !
नारदमुनींना तेवढेच अधिकारी असलेले महर्षि वाल्मीकि अत्यंत नम्रतेने विचारतात की,
‘को न्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ।
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रत: ।।२।।
चारित्रेण च को युक्त: सर्वभूतेषु को हित: ।
विद्वान् क: क: समर्थश्च कश्चैकप्रियदर्शन: ।।३।।
आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् कोऽनसूयक:।
कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ।।४।।
एतदिच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलं हि मे ।
महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुमेवंविधं नरम् ।।५।।’
– वाल्मिकी रामायण बाल-सर्ग १
अर्थ : सध्या या भूलोकावर गुणसंपन्न असा कोण आहे ? अर्थात् वीर्यवान, धर्मरहस्यवेत्ता, कृतज्ञ, सत्यवचनी, धर्माकरता स्वीकारलेल्या व्रताचा कठीण प्रसंगीसुद्धा त्याग न करणारा, सदाचारसंपन्न, प्राणिमात्रांच्या हितासंबंधी अत्यंत तत्पर, तत्त्ववेत्ता, समर्थ, केवळ दर्शनानेच लोकांना आनंद देणारा, मनोनिग्रही, क्रोधाचे संयमन करणारा, तेजस्वी, दुसर्याच्या उत्कर्षाचा मत्सर न करणारा, युद्धात क्रुद्ध झाला असता प्रत्यक्ष देवांनाही धडकी भरवणारा असा कोण आहे ? ते श्रवण करण्याची मला उत्सुकता आहे. इतकेच नव्हे, तर जाणूनही घेण्याची उत्सुकता आहे. हे महर्षि, अशा प्रकारचा पुरुष कोण आहे ? हे जाणण्यास आपण समर्थ आहात.
वरील श्लोकांतील १५ विशेषणे वाचली, तरी ‘महर्षि वाल्मिकींना त्यांचा नायक कसा हवा होता ?’, त्याची कल्पना येते. खरे तर या एकेका गुणांनी युक्त असलेली एकेक व्यक्ती असू शकते; तथापि हे सर्व गुण एकत्रित असलेला असा महामानव त्यांच्या दृष्टीसमोर होता. अशा कुणाचेच नाव त्यांनी अद्याप ऐकले नव्हते; किंबहुना ‘हे सर्व गुण एकत्रित असलेला कुणी मानव असेल का ?’, या शंकेनेही ते ग्रस्त असावेत. त्यामुळे शंका निरसनार्थ त्यांनी नारदमुनींना हा प्रश्न विचारला, हे सहज लक्षात येते.
नारदमुनींनी केलेले श्रीरामाचे अलौकिक वर्णन !
महर्षि वाल्मिकींच्या प्रश्नामुळे नारदमुनी आनंदी झाले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही विचारलेले गुण अनेक असून ते एकत्रित असणे दुर्लभच आहे, तथापि मी स्मरण करून सांगतो, ते नीट आणि सावधपणे ऐकावे.’’ नारदमुनींनी सांगितलेल्या पहिल्या सर्गातील ८ ते २० श्लोक हे निव्वळ श्रीरामाच्या वर्णनाचे आहेत. ते संपूर्ण न देता त्या श्लोकातील श्रीरामाची विशेषणे देत आहे. ते म्हणतात, ‘‘ईक्ष्वाकु कुळात जन्मलेला आणि ‘राम’ नावाने प्रसिद्ध असलेला पुरुष लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तो आत्मसंयमी, महावीर्यवान, तेजस्वी, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धीमान, नितीज्ञ, वक्ता, वैभवशाली, शत्रूनाशक, उन्नत स्कंध, महाबाहू, शंखासारखा कंठ असलेला, मांसल हनुवटी, विशाल वक्षस्थळ, मोठे धनुष्य धारण करणारा, अदृश्य स्कंधसंधि, अजानुबाहू, उत्कृष्ट मस्तक, उत्तम कपाळ, प्रशस्त गती, प्रमाणबद्ध देह, परस्परांशी समान आणि परस्परांपासून भिन्न असे नेत्रादी अवयव, आकर्षक रंग, प्रतापी, पुष्ट आणि उन्नत वक्षस्थळ असलेला, विशाल नेत्र, ऐश्वर्यवान, शुभलक्षणी, धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, प्रजाहितदक्ष, यशस्वी, ज्ञानसंपन्न, पवित्र, विनयी आणि समबुद्धीने युक्त आहे.’’
नारदमुनी म्हणतात, ‘‘तो ब्रह्मदेवाप्रमाणे ऐश्वर्यसंपन्न, प्रजापालक, शत्रूनाशक, प्राणिमात्रांचे रक्षण करणारा, धर्मरक्षक, स्वधर्मरक्षक, स्वजनरक्षक, वेद आणि वेदांगे यातील तत्त्व जाणणारा, धनुर्वेदप्रवीण, सर्व शास्त्रांचे तत्त्व जाणणारा, स्मृती आणि समयस्फूर्ती असलेला, सर्व लोकांना आवडणारा, सौम्य तथा सज्जन, उदार, सर्व कर्मांमध्ये कुशल असलेला, सुसंस्कृत, सर्वांशी समान वागणारा, लोकांना सदैव त्याचे दर्शन प्रिय असते, नद्या ज्याप्रमाणे समुद्राकडे येतात. त्याप्रमाणे सज्जन त्याच्याकडे जातात, सर्वगुणसंपन्न, कौसल्येचा आनंद द्विगुणित करणारा, समुद्रासारखा गंभीर, हिमालयाप्रमाणे धैर्यवान, पराक्रमात विष्णूशी बरोबरी करणारा, चंद्राप्रमाणे त्याचे दर्शन सर्वांना प्रिय आहे, क्रोधात प्रलयकारी अग्नीशी साम्य असलेला, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील, धनाचा व्यय करण्यात कुबेरासमान असलेला, सत्यवचनाविषयी तर दुसरा मूर्तीमंत धर्मच असलेला, बहुगुणसंपन्न, अमोघ पराक्रमी, श्रेष्ठ गुणांनी युक्त, प्रजाजनांच्या हिताची कृत्ये करण्यास अत्यंत तत्पर असलेला असा श्रेष्ठ पुरुष आहे.’’
राजा दशरथाचा ‘रामराज्या’विषयीचा उपदेश ही ‘रघुकुलाची परंपरागत राज्यव्यवस्था’च !
रामायणातील पुढच्या भागातील एक वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राजा दशरथाचा श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा मनोदय ऐकून सर्व राजे, मान्यवर, सर्व वर्णांतील जनपुढारी आदी समस्त लोकांनी एका सुरात श्रीरामाच्या नावाला पाठिंबा दिला. या वेळी सर्वांनी श्रीरामाचे गुणगान करून यौवराज्याभिषेक करण्यास तेच योग्य असल्याचे सांगितले. ते ऐकताच हर्षभरित होऊन राजा दशरथाने श्रीरामाला जो उपदेश केला आहे, तो खरेतर सर्व राजांनी अथवा राजकारणातील लोकांनी ध्यानात घेण्यासारखा आहे. त्यावरून ‘रामराज्य’ ही संकल्पना मुळातच वास्तवातील ‘रघुकुलाची परंपरागत राज्यव्यवस्था’ होती, हे लक्षात येईल !
राजा दशरथ म्हणतो –
कामतस्त्वं प्रकृत्यैव विनीतो गुणवानसि ।
गुणवत्यपि तु स्नेहात्पुत्र वक्ष्यामि ते हितम् ।।४२।।
भूयो विनयमास्थाय भव नित्यं जितेन्द्रियः ।
कामक्रोधसमुत्थानि त्यजस्व व्यसनानि च ।।४३।।
परोक्षाया वर्तमानो वृत्त्या प्रत्यक्षया तथा ।
अमात्य प्रभृतीः सर्वाः प्रजाश्चैवानुरञ्जय ।।४४।।
कोष्ठागारायुधागारैः कृत्वा सन्निचयान्बहून् ।
तष्टानुरक्तप्रकृतिर्यः पालयति मेदिनीम् ।।४५।।
तस्य नन्दन्ति मित्राणि लब्ध्वामृतमिवामराः ।
तस्मात्त्वमपि चात्मानं नियम्यैवं समाचार ।।४६।।
(सर्ग – ३)
अर्थ : हे पुत्रा, यद्यपि तू स्वभावत:च अत्यंत गुणवान आहेस आणि अत्यंत विनयशील आहेस, तथापि पुत्रप्रेमामुळे मी तुला हिताची गोष्ट सांगतो. तू विनयशील जरी असलास, तरी आणखी विनयाचे अवलंबन करून नेहमी जितेंद्रिय असत जा. काम आणि क्रोध यांपासून उत्पन्न होणार्या व्यसनांपासून दूर रहा. हेरादिकांद्वारे स्वपरराष्ट्रातील वृत्तांत समजून घेऊन त्याचा सभेमध्ये प्रत्यक्ष स्वत: विचारपूर्वक निर्णय करून प्रजांना न्याय देण्याचा परिपाठ ठेव. धान्य आणि शस्त्रास्त्रे यांची कोठारे, तसेच स्वर्णरत्नादिकांची भांडारे यांत अधिक भर घालून अमात्य प्रभृती अन् आपल्या प्रजाजनांना संतुष्ट ठेव. जो प्रजेवर प्रेम करतो आणि प्रजेचेही ज्याच्यावर प्रेम असते, अशा राजाचा त्याच्या मित्रांना, अमृत प्राप्त झालेल्या देवांप्रमाणे आनंद होत असतो. तस्मात हे पुत्र, तू आत्मसंयमन करून याप्रमाणे वागत जा.
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, डोंबिवली. (लेखक रामायणाचे अभ्यासक आणि प्रवचनकार असून ‘राममन्दिरच का ?’ या पुस्तकाचे लेखक आहेत.) (साभार : मासिक ‘नवप्रभा’)
बहुगुणसमुच्चयामुळे आदर्श नायक ठरलेला श्रीराम !
हे सर्व गुण नीट वाचले आणि समजून घेतले, तरी श्रीरामाचे महत्त्व पटावे. खरेतर या एकेका गुणावर स्वतंत्र लेख लिहावे लागतील. क्वचित काही ठिकाणी पुनरुक्ती वाटेल तथापि नीट विचार केला, तर त्यांचे महत्त्व पटावे. जगात होऊन गेलेले अनेक श्रेष्ठ लोक एखाद्या गुणवैशिष्ट्यामुळे मोठे झाल्याचे लक्षात येईल. अर्थात् त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेले असते. येथे ७० च्या वर गुण एका श्रीरामामध्ये एकवटले आहेत, हे पाहिले की श्रीरामाचे विभूतीत्व लक्षात येते. हे गुण वाचतांना ‘यांतील किमान एखादा गुण तरी आपल्यात यावा’, अशी इच्छा आणि जिद्द निर्माण झाली, तरी पुष्कळ झाले. या गुणसमुच्चयामुळे श्रीराम हा जगातील एक आदर्श नायक ठरतो !
– डॉ. सच्चिदानंद शेवडे
श्रीराम सर्वतोपरी आदर्श असल्याने राममंदिर हे राष्ट्रमंदिरच !

राज्यप्राप्तीमुळे श्रीराम हा क्षणात हुरळून गेलेला दिसत नाही आणि लगेच राज्यत्यागाच्या आपत्तीमुळे खचून गेलेलाही दिसत नाही. हाच त्याचा मोठेपणा आहे; किंबहुना यशामुळे हवेत न उडणे आणि अपयशामुळे खचून न जाणे, या गोष्टी आपल्याला रामायणातून शिकता येतात. रामायण हे सर्व प्रकारच्या आदर्शांसाठी वाचायचे असते. रामकथेमधून वैयक्तिक आयुष्यात पुष्कळ काही शिकता येते. त्यामुळेच राममंदिर हे केवळ एक मंदिर नसून ते ‘राष्ट्रमंदिर’ आहे, ही प्रेरणा घ्यायला हवी !
– डॉ. सच्चिदानंद शेवडे