संपादकीय : इस्रायलचा बाणेदारपणा !

गेल्या एक वर्षाच्या युद्धात इस्रायलच्या आक्रमणात गाझातील ४० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने केलेल्या आक्रमणात १ सहस्र २०० इस्रायली नागरिक मारले गेले होते. याचा बदला म्हणून इस्रायलने ३६५ दिवसांत ४० सहस्र लोकांची हत्या केली. गाझा येथील युद्धात आतापर्यंत १६ सहस्र मुले मारली गेली, तर १८ सहस्रांहून अधिक मुले अनाथ झाली आहेत. प्रारंभी हा संघर्ष सीमा लागून असलेल्या २ देशांमधील वाटत होता. आता त्याने मोठे स्वरूप धारण केले आहे. इस्रायलने जणू अरब जगताला धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे आणि संघर्षाची व्याप्ती वाढतच आहे. या संघर्षाला ऐतिहासिक, राजकीय आणि वैचारिक संदर्भ आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध केवळ भूप्रदेशापुरते मर्यादित नाही. मध्यपूर्वेतील ओळख, अस्तित्व आणि प्रभाव यांविषयीचा हा संघर्ष आहे. इस्रायलने पॅलेस्टिनींची बाजू घेणार्‍या सर्वांनाच ठोकून काढणे चालू केले आहे आणि हे योग्यच आहे.

अरब आणि ज्यू असा संघर्ष चालू !

पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि पॅलेस्टाईन ब्रिटिशांच्या कह्यात गेले. या काळात ज्यू लोकांचे पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर चालू झाले. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने ज्यूंचा छळ आरंभला, तेव्हा हे स्थलांतर आणखी वाढले. यातून अरब आणि ज्यू असा संघर्ष चालू झाला. ब्रिटीश पॅलेस्टाईनच्या बाहेर पडले आणि निर्णयाचे दायित्व संयुक्त राष्ट्रांवर आले. संयुक्त राष्ट्रांनी ५५ टक्के भूभाग इस्रायलला, ४४ टक्के भूभाग पॅलेस्टाईनला आणि जेरुसलेम आंतरराष्ट्रीय संघटनांकडे, असा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव इस्रायलने मान्य करत स्वातंत्र्य घोषित केले, तर पॅलेस्टाईनने मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावला. याच वेळी अरब राष्ट्रांनी इस्रायलवर आक्रमण केले. वर्ष १९४८ मध्ये इस्रायलच्या स्थापनेसमवेतच पहिले अरब-इस्रायली युद्ध पेटले. त्या युद्धात आणि त्यानंतर सातत्याने इस्रायलने विरोधकांना धूळ चारली. त्यामुळे भक्कम प्रादेशिक शक्ती म्हणून इस्रायलचे स्थान निश्चित झाले; परंतु या युद्धांमुळे विस्थापित झालेल्या आणि शेजारच्या अरब देशांमध्ये निर्वासित म्हणून रहाणार्‍या पॅलेस्टिनींसमवेतचा संघर्ष अनिर्णित राहिला. हे युद्ध इस्रायलने जिंकले. वर्ष १९६७ मध्ये पुन्हा युद्ध झाले. हेही युद्ध इस्रायलने जिंकले.

इस्रायल निकराने का पेटला ?

डावीकडून हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला व इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू

इस्लामी कट्टरपंथियांच्या वाढत्या कारवायांमुळे एकूणच अरब जगतातील शांततेला नख लागले आहे. लेबनॉन हे त्याचे उदाहरण आहे. हिजबुल्ला केवळ लेबनीज गट म्हणून नव्हे, तर इराणचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि अरब जगतात स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतो. हमास आणि हिजबुल्ला यांना पाठिंबा देणारा इराण स्वत:ला इस्रायलविरोधी गटाचा नेता मानतो. त्यामुळे इस्रायलला हमास आणि हिजबुल्ला या दोघांनाही समान धोक्याच्या दृष्टीने पहाणे भाग आहे. ज्यू लोकांचा देश कमकुवत किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या आतंकवादी गटांचे हे नेटवर्क आहे, असे इस्रायलला या दोघांच्याही संदर्भात वाटते आणि ते खरेही आहे. त्यामुळेच इस्रायल या वेळी निकराने पेटलेला दिसत आहे.

पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि येमेन यांचा उदोउदो नको !

२० व्या शतकाच्या मध्यापासून मध्यपूर्व हा जगातील सर्वांत अस्थिर आणि अशांत भाग आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष, तसेच शेजारी देशासमवेतचा संघर्ष हा अनेक दशके जुना आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. इस्रायलने वर्ष १९४८ ते १९७३ या कालावधीत इजिप्त, सिरिया आणि जॉर्डन यांसह शेजारील अरब राष्ट्रांशी ४ मोठी युद्धे केली. वर्ष १९६० च्या मध्यात ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ची निर्मिती झाल्यापासून तिला इतर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. त्यात लेबनॉनमधील हिजबुल्ला, पॅलेस्टाईन प्रदेशातील हमास आणि येमेनमधील हुती यांचाही समावेश होता. यांच्यावर इस्रायलने जोरदार आक्रमणे करून त्यांची कटकारस्थाने उधळून लावली. त्यामुळे लेबनॉन, पॅलेस्टाईन आणि येमेन या देशांत कहर पसरला आहे. तेथे अराजकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेबनॉन आणि पॅलेस्टाईनची गाझापट्टी येथील लोकांना अन्न मिळेनासे झाले आहे. तेथे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. या सर्वांचे वृत्तांकन करण्यासाठी भारतातील काही वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमे यांचे प्रतिनिधी लेबनॉन अन् पॅलेस्टाईन येथे जाऊन तेथील प्रत्यक्ष परिस्थिती दाखवत आहेत. युद्धामुळे अपघातग्रस्त झालेले लोक, मुले आणि मृत्यूमुखी पडलेले लोक यांची माहिती देत आहेत. मुळात या तिन्ही देशांचा उदोउदो करण्याची आवश्यकता नाही; कारण या तिन्ही देशांत हमास, हिजबुल्ला आणि हुती हे आतंकवादी गट मोठ्या प्रमाणात असून ते जगात विध्वंस घडवून आणत आहेत. पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि गाझा येथील लोकांना हे ठाऊक असतांनाही त्यांनी या आतंकवाद्यांना आश्रय दिला. त्यामुळे या विध्वंसाला हे लोकही उत्तरदायी आहेत. येथे हे आतंकवादी गट लपूनछपून इस्रायलवर आक्रमणे करून ज्यू म्हणजे यहुदी लोकांना ठार मारत असतांना इस्रायलने त्याकडे नुसते पहात बसायचे का ? गेल्या वर्षी इस्रायलच्या १ सहस्र २०० लोकांना या आतंकवाद्यांनी अतिशय क्रूरपणे मारले, त्या वेळी किती प्रसारमाध्यमांनी ‘ग्राऊंड रिपोर्ट’ (प्रत्यक्ष परिस्थिती) दाखवला ? इस्रायलच्या लोकांना ठार मारणे, ही हमास आणि हिजबुल्ला यांची सर्वांत मोठी चूक होती. त्यामुळे हमास आणि हिजबुल्ला यांना धडा शिकवून त्यांचे अस्तित्व नष्ट करणे, हे इस्रायलचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य इस्रायल मोठ्या अभिमानाने पार पाडत आहे, असे ठामपणे म्हणता येईल. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानातील आतंकवादी आणि सैनिक यांनी सहस्रो हिंदु पंडितांची हत्या केली अन् ४ लाख ५० सहस्र हिंदूंना तेथून हुसकावून लावले. अनेक हिंदूंचे धर्मांतर केले, त्यांची संपत्ती लुटली, तेव्हा किती प्रसारमाध्यमांनी असा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ जगाला दाखवून दिला ? उलट जम्मू-काश्मीर येथे घडणार्‍या घटना दाबून ठेवण्यात आल्या. कोणत्याही पत्रकाराने जाऊन तेथील सत्य माहिती आणली नाही.

इस्रायलकडून भारताने बाणेदारपणा शिकावा !

छत्रपती शिवाजी महाराजांनी नगण्य मावळ्यांना हाताशी धरून मोगलांचा पाडाव करून त्यांना जेरीस आणले, तशाच पद्धतीने इस्रायलही गनिमी काव्याने जगाला धोकादायक असलेले हमास, हिजबुल्ला आणि हुती आतंकवादी यांना नष्ट करत आहे.  यातून इस्रायलचा बाणेदारपणा वाखाणण्यासारखा आहे. छोटासा इस्रायल हे करू शकतो, तर भारत का करत नाही ? यातून भारताने बोध घेऊन चीन, पाकिस्तान, बांगलादेश या देशांना अशीच धूळ चारून बाणेदारपणा दाखवून दिला पाहिजे.

आतंकवाद्यांना आश्रय दिल्यामुळेच पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि गाझा येथील लोक त्यांच्या विध्वंसाला उत्तरदायी होत !