Indo-Israeli Plan Attack Pak NuclearPlant : भारत आणि इस्रायल उद़्‍ध्‍वस्‍त करणार होते पाकिस्‍तानचा अणू प्रकल्‍प !

अमेरिकेमुळे योजना झाली रहित !

तेल अविव (इस्रायल) – गेल्‍या अनेक दिवसांपासून इस्रायलचे सैन्‍य लेबनॉनमध्‍ये जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाच्‍या विरोधात कारवाई करत आहे. याला विरोध करत इराणने इस्रायलवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे क्षेपणास्‍त्र आक्रमण केले. यानंतर इस्रायलने इराणवर प्रत्‍युत्तरादाखल आक्रमण करण्‍याची धमकी दिली आहे. काही तज्ञांचा असा अंदाज आहे की, इस्रायल इराणच्‍या आण्‍विक प्रकल्‍पांना लक्ष्य करू शकते; मात्र इस्रायलचा मुख्‍य मित्र अमेरिकेने तसे न करण्‍यास सांगितले आहे. इस्रायलने वर्ष १९८१ मध्‍ये इराकमधील ओसिराक येथे आण्‍विक प्रकल्‍प उद़्‍ध्‍वस्‍त केले होते. इस्रायलचे वायूदल ३ देशांच्‍या सीमा ओलांडून इराकमध्‍ये पोचले होते आणि कारवाई पूर्ण करून परतले होते. भारताने इस्रायलच्‍या साहाय्‍याने वर्ष १९८२ मध्‍ये पाकच्‍या अण्‍वस्‍त्र प्रकल्‍पावर आक्रमण करण्‍याची योजना बनवली होती; मात्र अमेरिकेने यात खोडा घातल्‍याने ती बारगळली. या संदर्भातील वृत्त ‘नवभारत टाइम्‍स’च्‍या संकेतस्‍थळावर देण्‍यात आले आहे.

इस्रायलने भारताला देऊ केले होते साहाय्‍य !

इस्रायलने पाकचा अण्‍वस्‍त्र कार्यक्रम उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यासाठी भारताला साहाय्‍यही देऊ केले होते आणि त्‍यासाठी योजनाही सिद्ध करण्‍यात आली होती. ही योजना का राबवली गेली नाही ? ती योजना काय होती ते जाणून घेऊया.

अ. इस्रायल आणि भारत यांच्‍यात औपचारिक राजनैतिक संबंध वर्ष १९९२ मध्‍ये प्रस्‍थापित झाले; परंतु दोन्‍ही देश दीर्घकाळापासून एकमेकांच्‍या संपर्कात होते.

आ. वर्ष १९८४ मध्‍ये भारत आणि इस्रायल यांनी पाकिस्‍तानमध्‍ये गुप्‍त कारवाईची योजना आखली होती. दोघांनाही पाकिस्‍तानच्‍या आण्‍विक कार्यक्रमापासून धोका होता. वर्ष १९६५ मध्‍ये पाकिस्‍तानचे तत्‍कालीन परराष्‍ट्रमंत्री आणि नंतर पंतप्रधान झालेले झुल्‍फिकार अली भुट्टो यांनी अणूबाँब बनवण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला होता. ते म्‍हणाले होते, ‘पाकिस्‍तान गवत किंवा पाने खाऊन जिवंत राहील; पण पाकिस्‍तान अणूबाँब मिळवेल.’ वर्ष १९७१ मध्‍ये भारतासमवेतच्‍या युद्धात पराभव झाल्‍यानंतर भुट्टो यांनी पाकिस्‍तानची कमान हाती घेतली, तेव्‍हा त्‍यावर काम चालू करण्‍यात आले.

भारत आणि इस्रायल यांची भीती

पाकिस्‍तानचा आण्‍विक कार्यक्रम युरोप आणि चीन येथून चोरलेली माहिती आणि तंत्रज्ञान यांवर अवलंबून होता. पाकिस्‍तान १९७० आणि १९८० च्‍या दशकाच्‍या उत्तरार्धात अण्‍वस्‍त्रे निर्माण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत होता. भारत आणि इस्रायल या दोघांसाठी ही चिंतेची गोष्‍ट होती. याच वेळी इस्‍लामाबादजवळील कहूता येथे पाकिस्‍तान अण्‍वस्‍त्रे बनवण्‍याचा प्रयत्न करत असल्‍याची माहिती भारताला मिळाली होती.

भारताला ठाऊक होते की, पाकिस्‍तानने कोणतीही अण्‍वस्‍त्रे आणली, तर त्‍याचे लक्ष्य प्रामुख्‍याने नवी देहलीवर असेल. त्‍याच वेळी ‘पाकिस्‍तानचा ‘इस्‍लामी अणूबाँब’ आपल्‍या अरब प्रतिस्‍पर्ध्‍यांसाठी मोठी शक्‍ती बनेल’, अशी भीती इस्रायलला वाटत होती. यानंतर पाकिस्‍तानच्‍या अणूबाँबविषयी भारताची गुप्‍तचर संस्‍था ‘रॉ’ आणि इस्रायलची ‘मोसाद’ यांच्‍यात सहकार्य चालू झाले.

पाकिस्‍तानमध्‍ये हवाई कारवाईची योजना

इस्रायलने भारतासमवेत एक योजना बनवली होती, असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. दोन्‍ही देश मिळून पाकिस्‍तानच्‍या आण्‍विक केंद्रांवर आक्रमण करून त्‍यांचा नाश करतील, अशी योजना होती. वर्ष १९८१ मध्‍ये इस्रायलने इराकमधील ओसिराक येथील अणुभट्टीवर आक्रमण करून ती नष्‍ट केली. लवकरच पाकिस्‍तानच्‍या गुप्‍तचर यंत्रणांनी त्‍यांच्‍या सरकारला चेतावणी दिली की, इस्रायल आणि भारत कहूता येथे अशाच प्रकारचे आक्रमण  करण्‍याची योजना आखत आहेत.

पाकिस्‍तानवर आक्रमण करण्‍यासाठी इस्रायली विमानांना गुजरातमधील जामनगर तळावरून उड्डाण करावे लागणार होते. यामध्‍ये एफ्-१५ आणि एफ्-१६ लढाऊ विमाने वापरण्‍यात येणार होती. तथापि या माहितीला कधीच दुजोरा मिळू शकलेला नाही. पत्रकार एड्रियन लेव्‍ही यांनी याविषयी लिहिले आहे की, ओसिराकवर इस्रायली आक्रमणानंतर भारतीय अधिकार्‍यांचे एक पथक इस्रायलला पोचले. त्‍यात सैनिकी आणि गुप्‍तचर असे दोन्‍ही अधिकारी होते.

अमेरिकेने खेळ कसा बिघडवला ?

वर्ष १९८२ मध्‍ये ‘वॉशिंग्‍टन पोस्‍ट’ आणि वर्ष १९८४ मध्‍ये अमेरिकेच्‍या ‘एबीसी न्‍यूज’ने पाकिस्‍तानच्‍या आण्‍विक केंद्रांवर भारत आणि इस्रायल दोघे मिळून आक्रमण करणार असल्‍याचे वृत्त दिले होते. या बातम्‍यांमुळे भारतावर थेट कारवाई न करण्‍याचा दबाव वाढला. याचवेळी इस्रायलने पुढे येऊन स्‍वतः आक्रमण करण्‍याची सिद्धता दर्शवली. यासाठी इस्रायली लढाऊ विमाने जामनगरच्‍या वायूदलाचा तळ वापरणार होते.

या योजनेनुसार इस्रायली विमानांना रडार टाळून काश्‍मीरच्‍या डोंगराळ भागात पुढे जायचे होते आणि इस्‍लामाबादजवळ आक्रमण करायचे होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मार्च १९८४ मध्‍ये या कारवाईला मान्‍यता दिली होती; परंतु अमेरिकेच्‍या गुप्‍तचर संस्‍था सीआयएने पाकिस्‍तानला या कारवाईविषयी सावध केले. यानंतर भारत आणि इस्रायल यांनी आक्रमण करण्‍याची योजना रहित करण्‍याचा निर्णय घेतला.

संपादकीय भूमिका

अमेरिका कधीही भारताचा मित्र नव्‍हता, आताही नाही आणि पुढेही असू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !