जळगाव येथील विविध भागांतून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता !

महाराष्ट्रातून तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र चालूच !

प्रतिकात्मक चित्र

जळगाव – रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून १, तर एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून २, अशा एकूण ३ अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी फूस लावून पळवून नेले आहे. ही घटना ९ ऑगस्ट या दिवशी उघडकीस आली आहे. त्यानंतर संबंधित मुलींच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. यातील एका मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यास ६ दिवस शिल्लक आहेत. तिची आई घरकाम करण्यासाठी बाहेर गेली असतांना त्याच परिसरात रहाणार्‍या तरुणाने तिला फूस लावून पळवून नेले आहे.

एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रहाणारी एक मुलगी १५, तर दुसरी १७ वर्षांची आहे.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रातून १ लाख महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. अशा पद्धतीने प्रतिदिन यामध्ये वाढ होत असतांना पोलीस यंत्रणा झोपली आहे का ? गुन्हेगारांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई का करत नाहीत ? उद्या अशीच वेळ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मुलींवरही येऊ शकते, हे कधी लक्षात घेणार ?